लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा १ जून रोजी पार पडणार आहे. ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात जोरदार प्रचार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आध्यात्मिक प्रवासाला निघणार आहेत. पंतप्रधान तामिळनाडूतील कन्याकुमारीच्या किनार्‍यावरील स्वामी विवेकानंद स्मारकाला भेट देणार आहेत आणि या ठिकाणी तीन दिवस ध्यानधारणा करणार आहेत. २०१९ सालीदेखील निवडणुकीच्या अंतिम टप्प्यापूर्वी पंतप्रधान मोदी केदारनाथ दर्शनाला गेले होते. त्याआधी २०१४ च्या निवडणुकीत ते प्रतापगडावर गेले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० मे रोजी स्वामी विवेकानंदांना समर्पित या स्मारकाला भेट देतील आणि १ जूनपर्यंत या स्मारकातील ध्यान मंडप येथे ध्यान करतील, असे वृत्त ‘द हिंदू’ने दिले आहे. पंतप्रधान मोदींच्या या दौर्‍याची व्यवस्था करणार्‍या उच्च सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, पंतप्रधान आधी तिरुवनंतपुरमपर्यंत विमानाने जातील आणि त्यानंतर एमआय-१७ हेलिकॉप्टरने कन्याकुमारीसाठी रवाना होतील. ते १ जून रोजी परततील आणि तिरुवनंतपुरम विमानतळावरून दुपारी ४.१० वाजता आयएएफ विमानातून दिल्लीला जातील. स्वामी विवेकानंद स्मारकाला विशेष महत्त्व आहे, त्यामुळे पंतप्रधान मोदींनी या जागेची निवड केली असल्याचे सांगितले जात आहे. या वास्तूचे वैशिष्ट्य काय? याविषयी जाणून घेऊ या.

कन्याकुमारीतील स्वामी विवेकानंद स्मारकाला विशेष महत्त्व आहे. (छायाचित्र-पीटीआय)

हेही वाचा : मान्सून आला हे नक्की कसे समजते? मान्सून ऑनसेट म्हणजे काय? जाणून घ्या…

स्वामी विवेकानंद स्मारकाचे वेगळेपण

-स्वामी विवेकानंद स्मारक कन्याकुमारीतील वावथुराईच्या मुख्य भूमीपासून सुमारे ५०० मीटर अंतरावर वसलेले आहे आणि हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. एका विशाल शिळेवर या भव्य स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे. हे स्मारक अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर या तीन जलसंस्थांनी वेढलेले आहे.

-देशभर भटकंती करून स्वामी विवेकानंद इथे आले. त्यांनी या विशाल शिळेवर बसून ध्यानधारणा केली आणि त्यांना लक्ष्यप्राप्तीचा मार्ग सापडला असे म्हटले जाते. याच विशाल शिळेवर विवेकानंदांचे भव्य-दिव्य स्मारक बांधण्यात आले आहे. एक दिवस पोहत जाऊन ते या शिळेवर पोहोचले, असे सांगण्यात येते.

-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि प्रख्यात वास्तुविशारद एकनाथ रानडे यांनी हे स्मारक उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ते स्वामी विवेकानंदांच्या कार्याने प्रभावित होते. हे स्मारक उभारण्यासाठी विवेकानंद स्मारक समिती स्थापन करण्यात आली होती. १९७० मध्ये हे स्मारक पूर्ण झाले. भारतासह जगभरातील लोक या स्मारकाला भेट देतात. या ठिकाणी एप्रिल महिन्यातील चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आणि सूर्य एकाच क्षितिजावर दिसतात.

-स्मारकामध्ये दोन प्राथमिक संरचना आहेत : पहिले म्हणजे विवेकानंद मंडपम; ज्यामध्ये पूज्य स्वामी विवेकानंदांची चार फुटांपेक्षा जास्त उंचीच्या चौथऱ्यावर कांस्यने (ब्राँझ) घडवण्यात आलेली मूर्ती आहे. दुसरे म्हणजे श्रीपाद मंडपम; ज्यामध्ये देवी कन्याकुमारीच्या पायाचे ठसे आहेत. शिवाची प्रार्थना करणाऱ्या कन्याकुमारी देवीच्या पौराणिक कथेने या ठिकाणाला आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

एका विशाल शिळेवर या भव्य स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे. (छायाचित्र-पीटीआय)

-या स्मारकाचे प्रवेशद्वार अजिंठा वेरूळ येथील लेण्यांप्रमाणे आहे. स्मारकाचा सभामंडप हा कर्नाटकातील बेलुर येथील रामकृष्ण मंदीरासारखा आहे. हे स्मारक स्थापत्यकलेचाही उत्कृष्ट नमूना आहे.

-विवेकानंदांचे नयनरम्य स्मारक तामिळ कवी आणि तत्त्वज्ञ तिरुवल्लुवर यांच्या एका विशाल अखंड पुतळ्याच्या शेजारी आहे. ही मूर्ती भारतीय शिल्पकार व्ही. गणपती स्थानपती यांनी तयार केली असून ती ४१ मीटर उंच आहे.

भाजपा कार्यकर्त्यांच्या मते, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या आध्यात्मिक वास्तव्यासाठी कन्याकुमारीची ही जागा निवडण्याचा निर्णय विवेकानंदांच्या देशासाठीच्या दूरदृष्टीला प्रत्यक्षात आणण्याची त्यांची वचनबद्धता अधोरेखित करते. “पंतप्रधान मोदी कन्याकुमारीला जाऊन राष्ट्रीय एकात्मतेचा संकेत देत आहेत. याच ठिकाणाची निवड केल्याने पंतप्रधान मोदींची स्वामीजींची विकसित भारताची दृष्टी प्रत्यक्षात आणण्याची वचनबद्धता दिसून येते,” असे पक्षाच्या एका नेत्याने सांगितले.

हेही वाचा : राम रहीम हत्याप्रकरणात निर्दोष, तरीही तुरुंगात; कारण काय? त्याच्याविरोधात कोणकोणते गुन्हे? जाणून घ्या…

पंतप्रधान मोदी गुरुवारी दुपारी ४.३५ वाजता कन्याकुमारीत येतील आणि विवेकानंद केंद्रात राहतील. या आध्यात्मिक प्रवासात पंतप्रधान तीन दिवसांतील जास्तीत जास्त वेळ ध्यानात घालवतील. पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एसपीजी कमांडोंचे पथक कन्याकुमारी येथे पोहोचले आहे. “आमचा अंदाज आहे की, सुमारे हजार पोलिस कर्मचारी तैनात केले जातील, तसेच तटरक्षक दलाच्या जहाजांसह विवेकानंद शिळेभोवती तटीय पोलिस गस्त घालतील,” असे एका उच्च अधिकाऱ्याने सांगितले. पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान स्मारकात पर्यटकांना परवानगी दिली जाणार नाही. जवळपासच्या सर्व लॉज आणि हॉटेल्सचे बुकिंग बंद असतील. त्यासह दुकानेदेखील बंद असतील.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi meditate in vivekanand rock memorial kanyakumari rac