कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीवर रविवारपासून केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून संवर्धन प्रक्रिया सुरू झाली. पितळी उंबर्‍याच्या बाहेर उत्सवमूर्ती आणि कलश भाविकांना दर्शनसाठी खुला ठेवण्यात आला आहे. महालक्ष्मी देवीच्या मूर्तीवर सन २०१५ मध्ये केलेली संवर्धन प्रक्रिया कुचकामी ठरली असल्याचा अहवाल मार्चच्या दुसर्‍या आठवड्यात केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या निवृत्त अधिकार्‍यांनी दिला होता. दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार विलास मांगीराज आणि आर. एस. त्र्यंबके यांनी सादर केलेल्या अहवालात अनेक गंभीर बाबींवर बोट ठेवले होते.

हेही वाचा : मुख्यमंत्री शिंदे आज पुन्हा कोल्हापुरात; मंडलिक, माने यांचा अर्ज भरताना प्रकाश आवाडेंची उपस्थिती!

दोन दिवस प्रक्रिया

मूर्तीवर पुन्हा एकदा संवर्धन प्रक्रिया केली जावी, अशी शिफारस केली होती. त्यानुसार आजपासून मूर्तीवरील संवर्धन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मूर्तीचे नुकसान झाले अशा ठिकाणी ही प्रक्रिया दोन दिवस चालणार आहे. प्रक्रिया कालावधीतील दोन दिवस भाविकांना उत्सव मूर्ती , कलश दर्शनावरच समाधान मानावं लागणार आहे.

हेही वाचा : “खलनायक नव्हे नायक!”, इचलकरंजीच्या पाणी योजनेवर राजू शेट्टी यांची मार्मिक टिप्पणी

संवर्धन प्रक्रियेवर आक्षेप

दरम्यान, या संवर्धन प्रक्रियेच्या निमित्तानं प्रजासत्ताक सामाजिक संघटनेनं काही प्रश्नचिन्हं उपस्थित केली आहेत. सध्या सुरू असणारी संवर्धन प्रक्रिया कायमस्वरूपी व्हावी. संबंधितांवर त्याची जबाबदारी निश्चित करावी. मूर्ती संवर्धन करताना ती मूळ स्वरूपात आणि देवीच्या मस्तकावरील नाग प्रतिमेसह करावी, अशी मागणी संघटेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी केली आहे.