कोल्हापूर : कृष्णा योजनेची जलवाहिनी बदलणे, सुळकूड योजनेची सद्यस्थिती, रस्त्यांवरील निकृष्ठ पॅचवर्क, घंटागाड्या बंद असल्याने कचरा उठावात आलेला विस्कळीतपणा, शहरातील वाढते अतिक्रमण, सर्वच उद्यानातील खेळण्यांची दूरवस्था आदी प्रलंबित प्रश्‍नांवरुन महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी महापालिका प्रशासनावर प्रश्‍नांची सरबत्ती करत धारेवर धरले. त्यावर प्रशासनाकडून लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्‍वासन देण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महानगरपालिकेच्या वतीने इचलकरंजी शहरातील विविध प्रलंबित कामांची लेखी स्वरुपात माहिती मिळावी अशा मागणीचे पत्र महाविकास आघाडीच्या वतीने आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांना देत त्या संदर्भात बैठक घेण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने  उपायुक्त सोमनाथ आढाव यांच्या उपस्थितीत मंगळवारी महापालिकेत बैठक झाली.

हेही वाचा >>> सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या; एका माजी नगरसेवकाच्या खूनाचाही होता प्लॅन?

प्रारंभी कृष्णा पाणी योजनेच्या तिसर्‍या टप्प्यातील जलवाहिनी बदलास विलंब का होत आहे या संदर्भात मविआ च्या पदाधिकार्‍यांनी जाब विचारला. त्यावर 30 जूनपर्यंत हे काम पूर्ण करण्याच्या सूचना मक्तेदारास दिल्या असून त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. जर वेळेत काम पूर्ण न झाल्यास मक्तेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

सध्या शहरात विविध रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचे काम सुरु असून ते निकृष्ठ पध्दतीने केले जात असल्याचा आरोप करत पॅचवर्कबाबतही जाब विचारण्यात आला. हे काम दर्जेदार होण्यासाठी प्रत्यक्ष जावून पाहणी करण्यात येईल, असे शहर अभियंतामहेंद्र क्षिरसागर यांनी सांगीतले. शहरातील गतीरोधक काढण्यात येत आहेत. त्याकडेही यावेळी लक्ष वेधण्यात आले.

शहरात कचराच कचरा

बंद असलेल्या घंटागाड्यांबाबत विचारणा करण्यात आल्यानंतर त्यांचे स्पष्टीकरण आरोग्य अधिकारी डॉ.सुनिलदत्त संगेवार यांनी दिले. कचरा संकलीत करण्याबाबत विस्कळीत पणा आल्याच्या तक्रारी यावेळी करण्यात आल्या. आचारसंहिता संपल्यांनतर कचरा संकलीत व वाहतूक करण्याच्या कामाची निविदा काढली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा >>> महिला कारकूनने ३० हजाराची लाच स्वीकारली; कागल तालुक्यात कारवाई

पाणी प्रशनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार

इचलकरंजी शहरासाठी कागल तालुक्यातील दूधगंगा नदीतून पाणी आणण्याची योजना शासनाने मंजूर केली आहे. सुळकूड योजनेच्या सद्यस्थीतीबाबत यावेळी चर्चा झाली. 25 मे पर्यंत तांत्रिक अहवाल जिल्हाधिकारी शासनाला अहवाल सादर करणार आहेत. या वेळेत अहवाल सादर न केल्यास जिल्हाधिकारी यांना भेटण्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला.

फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर

शहरात फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाचा प्रश्‍न नियंत्रणाबाहेर गेल्याचे यावेळी प्रशासनाला सांगण्यात आले. पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे. त्यांचा बंदोबस्त न मिळाल्यास सुरक्षा रक्षकांच्या मदतीने फेरीवाल्यांची धडक मोहिम राबविण्यात येईल, असे आढाव यांनी यावेळी सांगीतले. उद्यानातील खराब झालेल्या खेळण्यांबाबतही चर्चा झाली. आमदार सतेज पाटील यांच्या फंडातून खेळणी बसविण्याच्या तातडीने प्रस्ताव तयार करण्याच्या कामाला गती देण्याचा निर्णय झाला. तर विवाह नोंदणी करतांना येणा-या तांत्रिक अडचणीवर यावेळी चर्चा करण्यात आली. चर्चेत जलअभियंता सुभाष देशपांडे, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, आरोग्याधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार यांच्यासह महाविकास आघाडीचे शशांक बावचकर, मदन कारंडे, सागर चाळके, प्रकाश मोरबाळे, सयाजी चव्हाण, सुहास जांभळे, महेश बोहरा, नंदा साळुंखे, मंगेश कांबुरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maha vikas aghadi officials raise ichalkaranji pending issue infront of municipal administration zws