भारतीयांच्या आरोग्यासंदर्भात एका नवीन अभ्यासात चिंताजनक गोष्ट स्पष्ट झाली आहे. देशभरात कर्करोगाची प्रकरणे वाढत आहेत. परिणामी, असंसर्गजन्य रोगांचे (NCDs) प्रमाणही वाढत आहे. अपोलो हॉस्पिटल्सने प्रसिद्ध केलेल्या अहवालात भारताचं वर्णन ‘कॅन्सर कॅपिटल ऑफ द वर्ल्ड’ असं केलं आहे. भारताला ‘कॅन्सर कॅपिटल ऑफ द वर्ल्ड’ का म्हटले जात आहे? याबाबत तज्ज्ञांची मतं काय आहेत हे जाणून घेऊ या.

आकडेवारीनुसार, एक तृतीयांश भारतीय प्री-डायबिटीज आहेत, दोन तृतीयांश प्री-हायपरटेन्सिव्ह आहेत आणि दहापैकी एक नैराश्याचा सामना करत आहे. कर्करोग, मधुमेह, हृदयविकार आणि मानसिक आरोग्य समस्यांसह या दीर्घकालीन आजारांची स्थिती गंभीर पातळीवर पोहोचत आहेत आणि देशातील लोकांच्या आरोग्यावर लक्षणीय परिणाम करत आहेत.

विशेष चिंतेची बाब म्हणजे कर्करोगाच्या प्रकरणांची वाढती संख्या ही जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे. प्री-डायबेटिस, प्री-हायपरटेन्शन आणि मानसिक आरोग्य विकारांचे निदान तरुण वयोगटांमध्ये होत असल्याने संभाव्य आरोग्यविषयक संकटाचा इशाराही अहवालात दिला आहे.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज इन्फॉर्मेटिक्स अँड रिसर्च (NCDIR) च्या मते, “गेल्या काही वर्षांपासून भारतात कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.”

हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटल्सच्या मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि हेमॅटो-ऑन्कॉलॉजिस्ट विभागाचे वरिष्ठ सल्लागार आणि मेडिकल ऑन्कोलॉजी विभागाचे संचालक डॉक्टर निखिल एस. घड्याळपाटील (Ghadyalpatil) यांनी द इंडियन एक्स्प्रेसला याबाबत माहिती देताना सांगितले की, “या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सरकारी संस्था, आरोग्य सेवा पुरवणारे, स्वयंसेवी संस्था (एनजीओ) संशोधक आणि समुदाय यासह विविध घटकांचा समावेश असलेल्या बहुआयामी दृष्टिकोनाची आवश्यकता आहे.”

हेही वाचा – ऐकावं ते नवलच! भारतीयांपेक्षा पाकिस्तानी जास्त आनंदी, सर्वात सुखी देश कोणता? वाचा यादी…

कर्करोगाचे प्रमाण वाढण्याचे काय आहे कारण?

तंबाखू, धूम्रपान करणे आणि कर्करोगजन्य पदार्थांच्या संपर्कात येणे

विविध जीवनशैली आत्मसात करणे, पर्यावरणीय, सामाजिक आर्थिक आव्हाने, भारतात कर्करोगाचे प्रमाण वाढण्याला कारणीभूत ठरतात. तंबाखूचा सर्रास वापर, धूम्रपान अशा दोन्ही प्रकारांमुळे फुफ्फुसाचा, तोंडाचा आणि घशाचा कर्करोग होण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. शिवाय, वाहने आणि उद्योगांमधून होणारे वायू प्रदूषण लोकसंख्येच्या मोठ्या भागाला कर्करोगजन्य पदार्थांच्या संपर्कात आणते, ज्यामुळे विविध कर्करोगांचा धोका वाढतो आहे”, असे डॉ. चिन्नाबाबू सुंकवल्ली यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना स्पष्ट केले. डॉ. सुंकवल्ली हे हैदराबादच्या यशोदा हॉस्पिटल्स सर्जिकल ऑन्कोलॉजी आणि रोबोटिक सर्जिकल ऑन्कोलॉजी विभागाचे वरिष्ठ सल्लागार आणि सर्जिकल ऑन्कोलॉजी विभागाचे क्लिनिकल संचालक(Clinical Director) आहेत.

बदलती जीवनशैली

त्याच विभागातील ज्येष्ठ कर्करोगतज्ज्ञ आणि रोबोटिक सर्जन डॉ. सचिन मर्दा यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना आरोग्यासाठी हानिकार आहाराच्या सवयींवर भर दिला. “प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन करणे आणि शारीरिक हालचाल किंवा व्यायामाचे प्रमाण कमी होण्यामुळे लठ्ठपणाचे प्रमाण वाढते आहे, ज्याचा स्तन, कोलोरेक्टल (colorectal) आणि एंडोमेट्रियल कर्करोगाशी संबंध असल्याचे अनेक प्रकरणांमध्ये समोर आले आहे.”

कर्करोगाचे लवकर निदान करण्याची संधी गमावणे

“कर्करोगाच्या लक्षणांबद्दल जागरूकता नसणे आणि व्यापक प्रमाणात स्क्रीनिंग प्रोग्रामच्या अभावामुळे कर्करोगाचे लवकर निदान होत नाही. याचा परिणाम बहुतेक वेळा कर्करोगाचे शेवटच्या टप्प्यामध्ये निदान होते, ज्यामुळे यशस्वी उपचारांची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होते. विशेषत: ग्रामीण भागात जिथे दर्जेदार आरोग्य सेवा मर्यादित आहे.” हैदराबाद केअर हॉस्पिटल्सचे सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि रोबोटिक सर्जन विभागाचे सल्लागार, डॉ. नरेन बोलिनेनी यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना कर्करोगाचे लवकर निदान न होण्याच्या प्रभावावर भर दिला.

हेही वाचा – K-Popसाठी त्यांनी घर सोडलं, पण…मुर्शिदाबादमध्ये त्यावेळी काय घडले?

सामाजिक-आर्थिक विषमता

सामाजिक-आर्थिक असमानता ही समस्या आणखी वाढवते. डॉ. घड्याळपाटील यांनी निदर्शनास आणल्याप्रमाणे, ” आर्थिक असमानतेमुळे विशेषतः उपेक्षित समुदायांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळवण्यात अडथळे निर्माण करते. पुरेश्या प्रमाणात जागरूकता नसणे आणि कर्करोगाला सामाजिक कलंक म्हणून पाहणे अशी कारणेदेखील कर्करोगाचे उशिरा निदान आणि उपचारांमध्ये भूमिका बजावतात.

उज्ज्वल भविष्यासाठी बहुआयामी दृष्टिकोन आवश्यक

या गुंतागुंतीच्या समस्येचा सामना करण्यासाठी बहुआयामी धोरण आवश्यक आहे. तंबाखूच्या सेवनाचे धोके आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व याविषयी लोकांना शिक्षित करण्यासाठी देश पातळीवर जनजागृती मोहिमांची आवश्यकता आहे, असा सल्ला डॉ. सुनकवल्ली यांसारख्या तज्ज्ञांनी सुचविला आहे. याव्यतिरिक्त, नियमित तपासणीस प्रोत्साहन देणे, विशेषत: ग्रामीण भागात कर्करोगाचे लवकर निदान आणि उपचारांचे परिणाम सुधारणे शक्य होईल.

डॉ. सचिन मर्दा यांनी जास्त कर लागू करणे आणि सार्वजनिक धूम्रपानावर बंदी यांसह कडक तंबाखू नियंत्रण धोरणांची गरज अधोरेखित केली. “संतुलित आहार आणि नियमित व्यायामाला प्रोत्साहन देणाऱ्या सार्वजनिक शैक्षणिक मोहिमा आखल्यास कर्करोगाशी संबंधित धोका वाढवणारे घटक लक्षणीयरीत्या कमी करू शकतात.”

हेही वाचा – गरोदर आईच्या ध्रूमपानामुळे मुलीला वेळेआधीच मासिक पाळी येण्याचा धोका? संशोधनातून समोर आलेली माहिती

आरोग्य सेवा पुरवण्यासाठी पायाभूत सुविधा आणि संशोधनात गुंतवणूक

विशेषत: ग्रामीण भागात आरोग्य सेवा पुरवण्यासाठी पायाभूत सुविधा वाढवणे हे महत्त्वाचे आहे. डॉ. बॉलिनेनी यांनी अधिक कर्करोग विशेषज्ज्ञ, कर्करोगाचे वेळीच निदान करण्यासाठी सुविधा, उपचार केंद्रे आणि स्वस्त औषधांच्या गरजेवर भर दिला. तर डॉ. घड्याळपाटील यांनी कर्करोगाचा प्रतिबंध, निदान आणि उपचारांमध्ये आणखी संशोधन आणि नावीन्यपूर्णतेचे महत्त्व नमूद केले.

कर्करोगाविरुद्धचा भारताचा लढा हा एक आव्हानात्मक आहे, परंतु बहुआयामी दृष्टिकोनाने त्याला दिशा देता येईल. या समस्यांचे मूळ कारण ओळखून, आरोग्य सेवा पुरवण्यासाठी पायाभूत सुविधा आणि संशोधनामध्ये गुंतवणूक आणि जनजागृती केल्यास, भारत वाढत्या कर्करोगाची संख्या कमी करून आणि निरोगी लोकसंख्येच्या भविष्याकडे वाटचाल करू शकतो.