मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी भगवा ध्वज जीव की प्राण होता. पण आज उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून, प्रचारातून, मिरवणुकांमधून भगवा ध्वज गायब झाला आहे. विशिष्ट समाजाची मते मिळविण्यासाठी त्यांना हिंदुत्व नकोसे झाले आहे. अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या राष्ट्रविचाराने प्रेरित असलेल्या संघटनेवर टीका करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. तेव्हा आता मुंबई, ठाणेकर त्यांना त्यांची जागा दाखवतील, अशी सणसणीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘महाराष्ट्रात महायुतीला विरोधक कडवी लढत देत आहेत असे वातावरण जाणीवपूर्वक तयार केले गेले. ठरावीक वर्ग नाराज असल्याचा अपप्रचार विरोधकांकडून केला गेला. राज्यातील काही मतदारसंघात महायुतीला आव्हान आहे असे वातावरण उभे केले गेले. हे कसे खोटे आणि चुकीचे होते याचे उत्तर सर्वांना येत्या ४ जून रोजी मिळेलच’’, असे मुख्यमंत्री म्हणाले. ‘‘ मी दाव्याने सांगतो; राज्यात झालेल्या पाचही टप्प्यांच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामागे ठामपणे उभा आहे. मुंबई महानगर पट्ट्यातही काही वेगळी परिस्थिती नाही. येथेही आम्ही विकास आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतदारांपुढे जात आहोत. त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीच्या किमान ४५ जागा निवडून येतीलच, शिवाय मुंबई महानगर पट्ट्यातील सर्वच्या सर्व १० जागांवर शिवसेना-भाजपला विजय मिळेल’’, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केला.

त्यांना हिंदुत्व नकोसे

‘‘पाकिस्तानचा झेंडा प्रचार मिरवणुकांमध्ये नाचवायचा आणि भगव्याच्या नावाने बोटे मोडायची. देशद्रोह्यांना निवडणूक प्रचारात फिरवायचे आणि देशभक्त संघटनांना शिव्याशाप द्यायचे. पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या काँग्रेसच्या गळ्यात गळे घालायचे. ठरावीक व्होट बँकेची मतं मिळवण्यासाठी आणखी किती लांगूलचालन करणार ,’’ असा प्रश्न शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना केला. भगवी पताका हे सनातन हिंदू धर्माचे प्रतीक आहे. हा भगवा प्रभू श्रीरामाचा आहे. हा भगवा शिवरायांचा आहे. हा भगवा वारकऱ्यांचा आहे. हा भगवा शिवसेनेचाही आहे. त्यामुळेच भगव्याचा अपमान करणाऱ्यांना जनता मतपेट्यांमधून धडा शिकवेल असे मुख्यमंत्री शिंदे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटास उद्देशून म्हणाले. ‘‘ शिवसेना आमच्याकडे आहे आणि ‘शिव्या’सेना त्यांच्याकडे आहे असेही ते म्हणाले. विरोधासाठी कोणतेही ठोस मुद्दे नसल्याने ते गुद्द्यावर आले’’, अशी टिप्पणी त्यांनी केली.

हेही वाचा >>> पकड सैल झाल्यानेच मोदींकडून विखारी, धार्मिक आणि वैयक्तिक प्रचार! नेते गेले, पण कार्यकर्ते ठाकरे यांच्या मागे : शरद पवार

आता लक्ष्य केवळ लोकसभा ….

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत राज्यात भाजप हाच मोठा भाऊ असल्याचे वक्तव्य केले होते. फडणवीस यांचे वक्तव्य तसेच राज ठाकरे यांनी भाजपला दिलेला पाठिंबा, विधानसभा निवडणुकीत जागा वाटपासंबंधीची समीकरणे यासंबंधी विचारलेल्या प्रश्नांवर लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अधिक जागा निवडून आणण्याचे एकमेव लक्ष्य आता आमच्यापुढे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ‘‘पुढच्या कोणत्याही गोष्टीचा विचार आमच्या मनाला शिवतही नाही. शिवसेना-भाजप ही २५ वर्षांची जुनी मैत्री आहे. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी निवडून आणताना महाराष्ट्रातील अधिकाधिक जागांची साथ त्यांना मिळायला हवी या एकमेव विचाराने आम्ही काम करत आहोत,’’ असे शिंदे म्हणाले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही समर्थन देत असताना मोदींवर विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे विधानसभेची समीकरणे काय असतील, कोणाला किती जागा मिळतील असे प्रश्न तुमच्या मनात येत असतील; पण आमचे लक्ष्य लोकसभा आहे आणि लक्ष्यभेद आम्ही करणारच असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

तेव्हा मी मुख्यमंत्री नव्हतो….

महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या एकाधिकारशाहीला शिवसेनेतील अनेक आमदार कंटाळले होते असे तुम्ही म्हणाला होतात. मग महायुतीत तुम्हाला अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून कसे चालतात असे विचारता ‘‘तेव्हा मी मुख्यमंत्री नव्हतो’’ असे उत्तर शिंदे यांनी दिले. राज्यात तीन पक्षांचे सरकार असले तरी ते समन्वयाने चालते. महाविकास आघाडीत परिस्थिती वेगळी होती. तेव्हा मी मुख्यमंत्री नव्हतो, आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात आहेत. हा फरक समजून घ्यायला हवा, असे शिंदे म्हणाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना परिस्थिती वेगळी होती. पक्ष कार्यकर्त्यांशी, नेत्यांशी, आमदारांशी त्यांचा संपर्क नव्हता. आमदार ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात तेथील लोकांचे, समाजाचे प्रश्न ऐकून घ्यायला त्यांना वेळ नव्हता. आता परिस्थिती बदलली आहे. मुख्यमंत्री म्हणून मी लोकांमध्ये जातो. आमदारांशी चर्चा करतो. प्रश्न समजून घेतो, ते सोडविण्यासाठी तातडीने निर्णय घेतो. तळागाळातील लोकांना हा फरक समजतो आहे, असाही दावा त्यांनी केला.

महाराष्ट्रात महायुतीला विरोधक कडवी लढत देत आहेत असे वातावरण जाणीवपूर्वक तयार केले गेले.

ठरावीक वर्ग नाराज असल्याचा अपप्रचार विरोधकांकडून केला गेला. राज्यातील काही मतदारसंघात महायुतीला आव्हान आहे असे वातावरण उभे केले गेले.● लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अधिक जागा निवडून आणण्याचे एकमेव लक्ष्य आता आमच्यापुढे आहे

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saffron flag disappeared from uddhav thackeray s speeches campaigns and processions says cm eknath shinde zws