औरंगजेबाप्रमाणे दिल्लीवरुन मोदी आणि शाह यांच्या स्वाऱ्या महाराष्ट्रावर होत आहेत. त्यांच्यापासून महाराष्ट्राचे रक्षण करण्याची जबाबदारी पुन्हा एकदा आपल्या खांद्यावर आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
“महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर त्यावर धनिकांची आणि व्यापाऱ्यांची वक्रदृष्टी राहिली आहे. काल उद्धव ठाकरे हजारो शिवसैनिकांसह हुतात्मा चौकात गेले आणि महाराष्ट्राच्या लढ्यात शहीद झालेल्या सर्वांना त्यांची अभिवादन केलं. पण ही लढाई आता पुन्हा सुरु झाली आहे. महाराष्ट्राचं अखंडत्व आणि वैभव टिकवण्यासाठी ही लढाई आहे”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
हेही वाचा – देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटण्याचं कारण;म्हणाले, “शरद पवार, उद्धव ठाकरे..”
पुढे बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टीकाही केली. “औरंगजेबाप्रमाणे दिल्लीवरुन मोदी आणि शाह यांच्या स्वाऱ्या महाराष्ट्रावर होत आहेत. त्यांच्यापासून महाराष्ट्राचे रक्षण करण्याची जबाबदारी पुन्हा एकदा आपल्या खांद्यावर आहे. काही भटकते आत्मे महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी आणि महाराष्ट्र कमजोर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या हक्काचे आणि अधिकाराचे लचके तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत”, असे ते म्हणाले.
हेही वाचा – अजित पवार शरद पवारांकडे परत आले तर काय? सुप्रिया सुळे म्हणाल्या, “एखाद्याने…”…
“नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी संभाजीनगरमध्ये औरंगजेबाची कबर बघून यावी, महाराष्ट्रावर चाल करणाऱ्यांची काय अवस्था होते, हे त्यावरून त्यांना लक्षात येईल”, असा इशाराही त्यांनी दिला.