सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांविषयी येणाऱ्या प्रवाशांच्या तक्रारी कमी व्हाव्यात यासाठी नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने गुरुवारी सौजन्य अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आगामी गणेशोत्सव, नवरात्रोत्सवांच्या पाश्र्वभूमीवर शहरात पर्यटकांची गर्दी वाढणार असल्याने रिक्षा व टॅक्सीचालकांनी प्रवाशांना चांगली वागणूक द्यावी. यासाठी या अभियानाचे आयोजन केले असल्याचे उपप्रादेशिक परिवहन आधिकारी संयज धायगुडे यांनी सांगितले.उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वाशी व रिक्षा संघटनेच्या वतीने सौजन्य अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गणेशोत्सव काळात समस्त रिक्षाचालकांनी प्रवाशांना सौजन्याची वागणूक देताना अतिथी देवो भव: हे ब्रीदवाक्य विसरू नये. नाशिकमधील घटनेत जखमी व्यक्तींना स्वत: रुग्णालयात नेऊन त्यांच्या प्राथमिक उपचारांचे पैसे भरणारा नाशिकचा रिक्षाचालक हा इंग्रजी वृत्तपत्राच्या मुख्य आवृत्तीत हेडलाइनमध्ये चमकला त्याप्रमाणेच आपल्या सौजन्यपूर्ण वागणुकीने नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या चालकांनी समाजात एक आदर्श निर्माण करावा असे मत  संजय धायगुडे यांनी व्यक्त केले.आमच्याकडे प्रवाशांच्या शंभर तक्रारी नोंद झाल्या असून त्यापैकी अठ्ठावीस रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. अशा तक्रारीचे प्रमाण कमी व्हावे यासाठी अशा सौजन्य अभियान कार्यक्रमाचे आयोजन करावे लागते, असेही संजय धायगुडे यांनी स्पष्ट केले. या वेळी एमजीएम रुग्णालय कामोठे व रिक्षा संघटना तसेच रोटरी क्लबच्या समन्वयातून रिक्षाचालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन आरटीओच्या प्रशिक्षण मैदानावर करण्यात आले होते.