भाजपामध्ये आपल्याला कशी वागणूक दिली जाते याबद्दल तीव्र निराशा व्यक्त केल्यानंतर अखेर लिंगायत नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर गुरुवारी काँग्रेस सोडून भाजपामध्ये परतले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यांच्या परतीसंदर्भात भाजपाचे लिंगायत समाज नेते आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि भाजपाचे राज्यप्रमुख बी. वाय. विजयेंद्र यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.

भाजपामध्ये परतण्याचे कारण काय?

“राष्ट्रीय नेत्यांनी (भाजपाच्या) मी परत यायला हवे असे सांगितले होते आणि आज सकाळी मी अमित शहा यांच्याशी या संदर्भात बोललो, ज्यांनी माझे प्रेमाने स्वागत केले. मी आता काँग्रेसचा विधान परिषद सदस्य आहे आणि मी ईमेलद्वारे राजीनामा दिला आहे. मी विधान परिषदेचे अध्यक्ष बसवराज होराट्टी यांच्याशी फोनवर बोललो आहे आणि माझा निर्णय डी. के. शिवकुमार यांनाही कळवला आहे. मी भाजपामध्ये प्रवेश करत आहे”, असे शेट्टर म्हणाले.

शेट्टर म्हणाले की, “आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी ते परत येत आहेत.” ‘पक्षाने मला पूर्वी अनेक जबाबदाऱ्या दिल्या, काही मुद्द्यांमुळे मी काँग्रेसमध्ये गेलो. गेल्या नऊ महिन्यांत खूप चर्चा झाली, तसेच भाजपा कार्यकर्त्यांनी मला पुन्हा पक्षात येण्यास सांगितले. येडियुरप्पाजी आणि (कर्नाटक भाजपा अध्यक्ष बीवाय) विजयेंद्रजी यांनाही मी भाजपामध्ये परत यावे अशी इच्छा होती. नरेंद्र मोदीजींना पुन्हा पंतप्रधान व्हायचे आहे, या विश्वासाने मी पक्षात पुन्हा प्रवेश करत आहे, असे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर सांगितले.

या घटनेने येडियुरप्पा यांची लिंगायत समाजाचा नेता म्हणून पक्षातील ताकद पुन्हा वाढली आहे. या निर्णयामुळे त्यांची लिंगायतांचे नेते म्हणून भूमिका मजबूत होण्याची शक्यता आहे. हुब्बाली प्रदेशात शेट्टर यांचे प्रतिस्पर्धी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचा प्रतिकार करण्याची शक्यता आहे.

“त्यांनी पक्षात परतावे, ही सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती. हा निर्णय पक्षाला बळकट करेल आणि लोकसभा निवडणुकीत २५ ते २६ जागा जिंकण्यासाठी मदत मिळेल,” असे येडियुरप्पा म्हणाले.

विजयेंद्रनेही आपल्या वडिलांच्या मताचे समर्थन करत शेट्टर यांच्या परतीला ‘घरवापसी’ म्हटले. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले की, “शेट्टर यांना पक्षाशी असलेले त्यांचे पूर्वीचे संबंध आणि देशात “रामराज्य” आणण्यासाठी मोदींच्या अथक प्रयत्नांना बघून पुन्हा पक्षात सामील व्हायचे आहे.

हुबळी धारवाड मतदारसंघात सहा वेळा आमदार असलेले शेट्टर यांचा पाठिंबा भाजपासाठी धारवाड लोकसभा जागा टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.

राजकारणात नेत्यांशी चांगले संबंध असलेले मृदुभाषी राजकारणी शेट्टर यांनी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती. जेव्हा पक्षाने त्यांच्यापेक्षा महेश टेंगीनाकई यांना हुबळी-धारवाड जागेसाठी पसंती दिली होती, त्यावेळी ते म्हणाले होते, “मी ३० वर्षांहून अधिक काळ पक्षासाठी काम केले आहे आणि तो मजबूत केला आहे. ते मला दोन-तीन महिन्यांपूर्वी कळवू शकले असते आणि मी ते स्वीकारले असते… मी पंतप्रधान नरेंद्र मोदींसारख्या पक्षाच्या वरिष्ठांना दोष देणार नाही. मी अमित शहांना दोष देणार नाही. मी नड्डाजींवर टीका करणार नाही. मला असे वाटते की कर्नाटकातील खऱ्या घडामोडी केंद्रीय नेत्यांच्या निदर्शनास आणून दिल्या नाहीत.”

येडियुरप्पा आणि पक्षाचे राष्ट्रीय सचिव बीएल संतोष यांच्यातील भांडणाचा परिणाम म्हणून ते भाजपामधून बाहेर पडल्याचे दिसून आले.

माजी मुख्यमंत्र्यांनी असा आरोप केला होता की, तिकीट वाटप प्रक्रिया भाजपामधील मूठभर लोकांच्या नियंत्रणाखाली होती आणि ते संभाव्य मुख्यमंत्री असा चेहरा असल्याने त्यांना बाजूला करण्याचा संघटित प्रयत्न केला जात होता. मात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर हुब्बळी-धारवाडच्या बालेकिल्ल्यावरून शेट्टर यांना विजय मिळवता आला नाही.

कर्नाटक काँग्रेसची प्रतिक्रिया

शेट्टर यांच्या बदलीमुळे काँग्रेस नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले की, ३५,००० हून अधिक मतांनी निवडणुकीत पराभव झाला असला तरी पक्ष त्यांच्याशी आदरपूर्वक वागला. परंतु, पक्षाने त्यांच्यावर दाखविलेला विश्वास त्यांनी तोडला. “मी काल सकाळी त्यांच्याशी बोललो आणि त्यांनी मला आश्वासन दिले की, ते पक्ष सोडणार नाहीत, कारण काँग्रेसने त्यांना राजकारणात आणखी एक संधी दिली आहे.” ते म्हणाले, शेट्टर भाजपामध्ये सामील झाल्याबद्दल त्यांना मीडियाकडून कळले होते. त्यांचा राजीनामा प्राप्त झाला आहे.

देशाच्या हितासाठी भाजपामध्ये पुन्हा प्रवेश करत असल्याच्या शेट्टर यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्र्यांनी एप्रिलमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करताना देशाच्या हिताचा विचार केला नाही का, असा सवाल केला.

सीएम सिद्धरामय्या म्हणाले की, शेट्टर यांनी भाजपाने अपमान केल्याचा आरोप करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि ते ज्येष्ठ नेते असल्याने काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली होती. “काँग्रेसमध्ये त्यांना कोणताही अन्याय किंवा अपमान सहन करावा लागला नाही,” असेही ते म्हणाले.

शेट्टर यांच्या जाण्याने लिंगायत समाजातील त्यांचे मोठेपण आणि पक्षातील त्यांचा दीर्घ कार्यकाळ पाहता भाजपाचे मोठे नुकसान झाले.

२०१२ मध्ये येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री म्हणून पक्षाचे नेतृत्व स्वीकारले. शेट्टर यांचे काका सदाशिव शेट्टर हे भाजपाचे पहिले सदस्य होते. १९६७ मध्ये जनसंघ नेते म्हणून (हुबळी मतदारसंघातून) कर्नाटक विधानसभेवर ते निवडून आले. त्यांचे वडील एस. एस. शेट्टर हे हुबळी-धारवाड सिटी कॉर्पोरेशनमध्ये पाच वेळा नगरसेवक होते आणि त्यांनी दक्षिण भारतातील पहिले जनसंघ महापौर म्हणून कार्य केले.

हेही वाचा : मणिपूरमध्ये मंत्री आणि आमदारांनाही उपस्थित राहण्याचा दबाव निर्माण करणारा मैतेई समाजाचा ‘तो’ कट्टरपंथी गट नेमका कोणता?

मुंबई कर्नाटकातील हुबळी प्रदेशातील लिंगायत लोकसंख्येपैकी सुमारे २० टक्के लोक शेट्टर यांचे समर्थक म्हणून पाहिले जाते. लोकसभा निवडणुकीपूर्वी लिंगायत व्होट बँक मजबूत करण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना शेट्टर यांच्या बाहेर पडल्याने, हा मोठा धक्का असेल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lingayat leader jagdish shettar returned in bjp rac