राष्ट्रीय लोकदल (RLD) भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सामील होण्यासाठी सज्ज झाल्यामुळे जयंत चौधरींचा पश्चिम उत्तर प्रदेशमधील दबदबा कमी करण्यासाठी इंडिया आघाडीचा सहयोगी पक्ष असलेला समाजवादी पार्टी (SP) संपूर्ण ताकद पणाला लावणार आहे. कारण जयंत चौधरी हे जाट समाजातील नेते आहेत, त्यामुळे सपा जाट समाजातील महत्त्वाच्या वर्गाचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर, बागपत, सहारनपूर, अलिगढ आणि हापूर या जिल्ह्यांतील मतदारांचा मोठा भाग जाट समुदायाचा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जयंत चौधरी इंडिया आघाडीची साथ सोडणार असल्याने त्यांची पोकळी भरून काढण्यासाठी समाजवादी पक्षाच्या नेतृत्वाने प्रदेशातील इतर जाट नेत्यांना पदोन्नती द्यावी, असे सपा नेत्यांच्या एका गटाचे म्हणणे आहे, तर पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या दुसऱ्या गटाने सांगितले की, आरएलडी इंडिया आघाडीच्या बाहेर पडल्याने प्रदेशातील पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. आरएलडीच्या बाहेर पडण्याचा आणखी एक परिणाम म्हणजे काँग्रेसने अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील पक्षाबरोबर वाटाघाटी करताना अधिक जागांची मागणी केली आहे.

“शेतकरी आंदोलन, कुस्तीगीरांचे आंदोलन इत्यादी मुद्द्यांवर भाजपाच्या विरोधात असलेल्या जाटांची मते मिळविण्यात जयंतजींनी आम्हाला मदत केली. पण जाट मतदार काही काळापासून भाजपासोबत आहे आणि भगव्या पक्षाला मत देतो. आमच्या पक्षाची काही मते कमी होणार आहेत आणि ती पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि इतर जाट नेत्यांना ज्या ठिकाणी समाजाचा प्रभाव आहे, अशा ठिकाणी प्रचार केला पाहिजे. अशा नेत्यांची ओळख पटवून त्यांना अधिक प्रभावी करणे हे पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वावर अवलंबून आहे,” असे मुझफ्फरनगरमधील सपा नेत्याने सांगितले.

हेही वाचाः राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा नियोजित वेळेआधी संपुष्टात येणार, यूपीतील बहुतेक भाग वगळणार

अमरोहा जिल्ह्यातील एका सपा नेत्याने दावा केला की, जयंत यांच्या बाहेर पडल्याने इंडिया आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही. “जे भाजपाच्या विरोधात आहेत ते विरोधी पक्षाला मत देत राहतील. जयंत चौधरींचा प्रभाव आहे, परंतु इतका नाही की ते सर्व भाजपाविरोधी मते सत्ताधारी पक्षाकडे परत आणू शकतील, ” असंही एका सपा कार्यकर्त्याने सांगितले. आरएलडी आणि सपा २०१९च्या लोकसभा निवडणुकीपासून मित्रपक्ष आहेत. गेल्या काही निवडणुकांमधील आरएलडीची कामगिरी पाहता अखिलेश यांना फारशी चिंता करण्याची शक्यता नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत SP-BSP-RLD युतीचा एक भाग म्हणून लढवलेल्या तीनही जागा या पक्षाने गमावल्या आणि प्रत्येक जागेवर भाजपाला दुसरे स्थान मिळाले. मुझफ्फरनगर आणि बागपतमध्ये आरएलडीने अनुक्रमे ४९.२ टक्के आणि ४८.५ टक्के मते मिळवून भाजपाला कडवी झुंज दिली.

२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने SP बरोबर युती करून लढलेल्या ३३ पैकी फक्त आठ जागा जिंकता आल्या, एकूण मतांच्या फक्त २.९ टक्के जागा जिंकल्या. ३३.९ टक्के मते मिळवून त्यांनी लढवलेल्या जागांवर त्याची लक्षणीय उपस्थिती होती. आरएलडीचे उमेदवार १९ जागांवर दुसऱ्या क्रमांकावर होते , त्यापैकी सहा जागांवर १० हजारांपेक्षा कमी मतांनी पराभूत झाले.

हेही वाचाः शिरोमणी अकाली दल अन् भाजपामध्ये युतीची चर्चा; जेडीयूनंतर आणखी एक जुना मित्रपक्ष एनडीएत परतणार?

समाजवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते फराझुद्दीन किडवाई म्हणाले की, आरएलडी आघाडीतून बाहेर पडण्याचा सपावर कोणताही परिणाम होणार नाही, कारण जयंत चौधरींच्या नेतृत्वाखालील पक्ष हा शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत असतो. परंतु आता त्यांनी मूळ विचारधारेशी तडजोड केली आहे”. “भाजपाच्या काळात इतके शेतकरी आंदोलन का करीत आहेत? शेतकरी दिल्लीत आंदोलनाच्या तयारीत आहेत. त्यामुळे जयंत चौधरींनी विरोधी पक्ष सोडला अन् शेतकऱ्यांच्या हिताचा त्याग केला, तर त्याचा त्यांच्या दीर्घकाळातील राजकारणावर परिणाम होईल, परंतु सपावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही,” ते म्हणाले.

काँग्रेस आणि सपा अजूनही उत्तर प्रदेशात त्यांच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार करत असल्याने पूर्वी पश्चिम यूपीमध्ये अधिक जागांची मागणी करेल, अशी अपेक्षा आहे. “समाजवादी पार्टीने आतापर्यंत आमच्यासाठी ११ जागा निश्चित केल्या आहेत, परंतु सपा नेतृत्व आम्हाला सांगत होते की त्यांना पश्चिम यूपीमध्ये आरएलडीला देखील सामावून घ्यावे लागेल. पण आता आरएलडी गेल्याने आम्ही सपाकडे अधिक जागांची मागणी करणार आहोत. त्यांनी किमान आम्हाला सहारनपूर आणि अमरोहा हे मतदारसंघ द्यावेत, जिथे ज्येष्ठ नेते इम्रान मसूद आणि दानिश अली (पूर्वी बसपचे) काँग्रेसकडून निवडणूक लढवू शकतात. इतरही जागा आहेत जिथे आम्हाला आघाडीचा भाग म्हणून तिकीट मिळायला हवे,” असे काँग्रेस नेत्याने सांगितले. काही सपा नेत्यांनीही या प्रदेशात अधिक जागांच्या काँग्रेसच्या मागणीला सहमती दर्शवली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samajwadi party ready to replace rld in western uttar pradesh will congress demand more seats vrd