तुषार रईसा हंसदास

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वी देशाच्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष विवेक देबरॉय यांनी एका लेखातून ‘नव्या राज्यघटने’ची गरज व्यक्त केली. आपल्या राज्यघटनेला ‘वसाहतवादी वारसा’ आहे, हे त्यांनी दिलेले कारण. सोप्या शब्दांत सांगायचे तर त्यांच्या मते, भारतीय संविधान विदेशी मूल्ये-विचार आणि इंग्रजांच्या विविध कायद्यांवर आधारित आहे. या ‘वारशाची’ चाचपणी करताना क्लिष्ट वाद-विवादांमध्ये अडकण्यापेक्षा जर संविधानाच्या मूळ गाभ्याकडे पाहिले तर अधिक चांगले व बोलके चित्र स्पष्ट होऊ शकेल. हा गाभा किंवा संविधानाची मूलभूत चौकट म्हणजे संविधानाच्या प्रास्ताविकेत आलेले विचार – लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय.

भारतीय संविधानाला ‘वसाहतवादी’ म्हणण्याचा अर्थ हा की, ब्रिटिशपूर्व भारतात हे विचार अस्तित्वातच नव्हते आणि इंग्रजांकडून आपल्याला हे विचार मिळाले. पण वास्तव काय?

स्वातंत्र्य-समता

स्वातंत्र्य-समता-बंधुता ही मूल्ये फ्रेंच राज्यक्रांतीतून जन्माला आली असे अनेकांना वाटते. १७९० साली झालेल्या फ्रेंच राज्यक्रांतीच्याही ५०० वर्षांपूर्वी भारतात अशा अनेक परंपरा अस्तित्वात होत्या ज्यांनी माणसाच्या स्वातंत्र्याचा आणि आपसांतील समतेचा आग्रह धरला. या परंपरा म्हणजे आपल्या भक्ती परंपरा- बौद्ध धम्म, जैन संप्रदाय, महानुभाव, लिंगायत आणि वारकरी संप्रदाय – यांसारख्या विविध भक्ती संप्रदायांनी रुढीवादी परंपरांविरोधात बंड करून व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा विचार मांडला. प्रत्येक मनुष्य हा ईश्वराचा अंश आहे, त्यामुळे जन्मावरुन/जातीवरून होणारा भेदभाव चुकीचा आहे, असा विचार या संप्रदायांनी मांडला.
वारकरी संप्रदायाचे ‘कळस’ असलेले तुकोबा ३५० वर्षांपूर्वी आपल्याला स्वातंत्र्याचा पाठ देताना ‘सकळांसी येथे आहे अधिकार’ असे बजावणारे आणि हे सकळ म्हणजे ‘ब्राह्मण, क्षत्रीय, वैश्य, शुद्र चांडाळाही अधिकार। बाळे नारीनर आदिकरोनी वेश्याही’ असे सांगणारे संतश्रेष्ठ तुकाराम भागवत धर्माचे सार सांगत समतेचा संदेश देतात :
‘ विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ।
कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वरपूजनाचे ।’
आपण सर्व माणसे समान आहोत असे सांगताना संत कबीर म्हणतात,
अव्वल अल्लाह नूर उपाया, कुदरत के सब बंदे
एक नूर ते सब जग उपजा, कौन भले कौन मंदे
भक्ती संप्रदायातील संतांचे असे कितीतरी दाखले देता येतील. मग स्वातंत्र-समता ही मूल्ये विदेशी कशी?

हेही वाचा : राजस्थानात मोदी, योगी आणि बाबा..

बंधुता-धर्मनिरपेक्षता

पसायदानातील ओळ – ‘भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ’ – म्हणजे केवळ माणसांमध्येच नाही, तर संपूर्ण जीवसृष्टीत मैत्र व्हावे, अशी ज्ञानेश्वरांची इच्छा ही बंधुता नव्हे तर आणखी काय आहे?
भक्ती संप्रदायांत फक्त एकाच नाही तर विविध धर्मांतील लोक सहभागी झाले होते. फक्त वारकरी संप्रदायाचेच उदाहरण घेतले तर यात आजवर ४२ मुस्लिम संत होऊन गेलेत. त्यांपैकी श्रीगोंद्याचे संत शेख मुहम्मद, मंगळवेढ्याचे संत लतिफशहा यांचे नाव बहुतेक सर्वांनीच ऐकलेले आहे. या सर्वांना विठ्ठलभक्ती करताना धर्म कधीही आड आला नाही. तर संत नामदेवांनी अल्लाहच्या स्तुतीत लिहिलेला पुढील अभंग हा भक्ती परंपरेचे धर्मनिरपेक्ष स्वरूप सर्वांसमोर आणतो :
करीमा रहिमा अल्लाह तूं गनी हाजार हजूरी दरि पेसि तूं मनी
ही भावना पुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ‘सबके लिए खुला हैं, मन्दिर यह हमारा’ या धर्मनिरपेक्षतेचा संदेश देणाऱ्या भजनातून मांडली. आजही संत तुकोबांच्या पालखीचा पहिला विसावा हा हज़रत सय्यद अनगडशहा बाबांच्या दर्गावर होतो.
भारतात शेकडो वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या दर्गांमध्ये जाणाऱ्या लोकांचे ‘धर्म’ पाहिले तर आपल्याकडे फार पूर्वीपासून ही बंधुतेची-एकतेची मिश्र परंपरा अस्तित्वात होती हे लक्षात येते.
मध्ययुगीन भारतातील धर्मनिरपेक्षतेचे अणखी एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे शीख धर्माचा पवित्र ग्रंथ – श्री गुरु ग्रंथसाहेब. यात शीख धर्मगुरुंसोबतच शेख फरीद (बाबा फरीद) हे मुस्लिम सुफी संत आणि भक्ती परंपरेतील संत कबीर व संत रामानंद यांसारख्या १४ संतांच्या रचना आहेत. आपल्या महाराष्ट्रातील संत नामदेवांच्या ६१ रचनांचाही यात समावेश आहे.
कृष्णावर सुंदर भजनं लिहिणारा रस खान आणि रामावर जीव ओवाळणारा कबीर ज्याच्या अनुयायांमध्ये हिंदू-मुस्लिम दोन्हींचा समावेश आहे – हे सर्व याच मातीत जन्माला आले आहेत.
आदर्श धर्मनिरपेक्ष शासन कसे असावे याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे शिवाजी महाराजांची ही स्वदस्तुराची आज्ञा – ‘ज्याचा जो धर्म त्याने तो करावा, यात कुणीही बखेडा उभा करू नये.’
अनेक अंगरक्षक मुस्लिम, तत्कालीन सर्वात प्रगत हत्यार – तोफखान्याच्या प्रमुख मुस्लिम, आरमाराचा प्रमुख मुस्लिम, वकील मुस्लिम, अठरापगड जातींचे सरदार व सैनिक – यातून आपल्याला हेच दिसते की स्वराज्याचे शासन चालवत असताना शिवाजी महाराजांनी कधीही एका धर्माला झुकते माप व दुसऱ्या धर्माचा द्वेष – असे केले नाही. त्यांच्यासाठी धर्म ही एक व्यक्तिगत बाब होती.
तरीही बंधुता-धर्मनिरपेक्षतेला आपण ‘विदेशी’ म्हणणार?

हेही वाचा : पांढऱ्या सोन्याचा अखंड धागा..

अभिव्यक्ती स्वातंत्र्य

ज्या सर्व महापुरुषांचा आज आपण जयजयकार करतो, त्यासर्वांनी समाजाच्या कर्मठ रूढींविरोधात पुकारलेले बंड ही त्यांची अभिव्यक्ती नव्हे तर दुसरे काय होते? आपला इतिहास पुरुषच नाही तर स्त्रीसंत आणि स्त्री समाजसुधारकांच्या अभिव्यक्तीच्या आविष्काराने सजलेला आहे.
८०० वर्षांपूर्वी जनाबाई गर्जते : “ डोईचा पदर आला खांद्यावरी । भरल्या बाजारी जाईन मी ।
हाती घेईन टाळ खांद्यावरी वीणा । आता मज मना कोण करी”
मध्ययुगीन भारतात अस्पृश्य समाजल्या जाणाऱ्या समाजात जन्माला आलेल्या संत चोखामेळ्याची समाजातील विषमतेवर बोट ठेवणारी अभिव्यक्ती पहा :
एकासी आसन, एकासी वसन । एक तेची नग्न फिरताती।
एकासी कदान्न एकासी मिष्ठान्न। एका न मिळे कोदान मागतांची ।
एकासी वैभव राजाची पदवी एका गावों गावीं भीक मागे ।
आपल्या आसपासची परिस्थिती कितीही विपरीत असली तरीही बहुमताला न जुमानता आपले सत्य ठामपणे मांडायला पाहिजे, असे तुकोबा सांगतात : ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता। ’
हे सर्व अभंग आजही समर्पक नाहीत का?
सनातन्यांचे शेण-गोटे झेलूनही त्यांविरोधात खंबीरपणे उभे राहिलेले सावित्रीबाई-फातिमाबी-जोतिबा – आजही आपल्यातल्या अभिव्यक्तीला प्रेरणा देत नाहीत का?

समाजवाद

यशोदेचा कृष्ण हा पहिला समाजवादी होता, असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही. सुखवस्तू कुटुंबात राहात असलेल्या बाल-कृष्णाने गोकुळातील बालगुराख्यांना सोबत घेतले. आपले सवंगडी उन्हातान्हात गाई राखतात, दूध काढतात, त्याचे तूप-लोणी बनवतात; पण यापैकी काहीही त्या गरीब बिचाऱ्यांना मिळत नाही. याची भगवंताला चीड आली आणि त्यांनी गोपाळांना त्यांच्या हक्काचे दूध, लोणी, दही द्यायला सुरुवात केली. ‘राबणाऱ्याला त्याच्या कष्टाचे फळ मिळालेच पाहिजे’ हा समाजवादी विचार आचरणात आणला.
समाजवादात प्रत्येकाची प्रत्येक गरज (चैन नाही) पूर्ण होईल, असे निहीत असते. ज्ञानेश्वर माऊली पसायदानात विश्वात्मक देवतेला दुसरं काय मागत आहेत? – “जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात।।”
‘मी समाजवादी आहे’ – हे १८९६ सालचे विवेकानंदांचे हे उद्गार आहेत. अचानक लहर आली म्हणून नव्हे तर अनेक वर्षांच्या सखोल चिंतनानंतर त्यांनी हा निष्कर्ष काढला की, भारतातील गरिबी आणि मागासलेपणावर उपाय समाजवादामध्येच आहे. विवेदानंदांचे स्वप्न होते की समाजवाद फक्त भारतातच नाही तर सर्व जगभर येईल आणि प्रत्येक देशातील कामगार – ज्यांना विवेकानंद शूद्र म्हणतात – समाजवादी आंदोलन करून नवीन समाज निर्माण करतील.

हेही वाचा : मराठा धुरीणत्वाची पुनर्रचना

स्त्रीस्वातंत्र्य आणि स्त्री-पुरुष समानता

‘न स्त्री स्वातंत्र्यमर्हति’ – हा मनुवादी विचार येथील भक्ती संप्रदायाने सपशेल नाकारला. म्हणूनच समाजात दुय्यम स्थान असलेल्या महिलांना येथे संतपण मिळाले. तत्कालीन समाजरचनेच्या दृष्टीने कुणी मोलकरीण होती, कुणी वेश्येची मुलगी तर कुणी महारीण. पण त्यांचे सामाजिक स्थान त्यांच्या कर्तृत्वाच्या कधीच आड आले नाही.
म्हणूनच जनाबाई म्हणतात, “स्त्रीजन्म म्हणोनि न व्हावे उदास, साधुसंत ऐसे केले जनी” मुक्ताबाई तर “मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्याशी” असा प्रेरणादायी विचार मांडतात. पुरुषसत्ताक समाजाच्या विचारांवर प्रहार करत संत विठाबाई आपल्या नवऱ्याला म्हणते , “तुझी सत्ता आहे देहावरी समज, माझेवरी तुझी किंचित नाही” यातून तत्कालीन स्त्रियांचा ‘मुक्तीचा आत्मस्वर’ आपल्याला ऐकू येतो. म्हणजे स्त्रीस्वातंत्र्य ही विदेशी संकल्पना नसून याच मातीतला एक विचार आहे.
अजुन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, परमार्थासाठी प्रपंच सोडून अरण्यवास पत्करण्याची किंवा व्यावहारिक कर्मांना फाटा देऊन संन्यास घेण्याची गरज नाही असे वारकरी संतांनी वारंवार सांगितले. ज्ञानेश्वरीतील ही ओवी पहा : ‘आता गृहादीक आवघें, तें

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian constitution heritage to whom from shri krishna chhatrapati shivaji maharaj to rajarshi shahu css