ऊन पडायला लागले की पंखा जोरात चालायला लागतो, एसी सुरू होतो. थंड पेय, फ्रिजमधील पाणी, आइस्क्रीम, बर्फाचे गोळे पोटात जाऊ लागतात. खरंतर उन्हाळ्यात पचायला हलके असे अन्न खावे. विशेष म्हणजे ताजे व गरम अन्न खावे. थोडे तिखट, तुरट रसाचे, कडू पदार्थ खावेत. भूक वाढविणारे उष्ण पदार्थ खावेत. म्हणूनच उन्हाळ्याची चाहूल लागताच गुढीपाडव्याला कडुनिंबाची पाने वाटून, त्यात सुंठ, ओवा, जिरे, साखर, सैंधव मीठ घालून सेवन करतात. ही चटणी कफ कमी करण्यासाठी आणि भूक वाढवून खाल्लेले अन्न पचवण्यासाठी अत्यंत योग्य आहे. चैत्रात येणाऱ्या रामनवमी व हनुमान जयंतीला सुंठवडा देतात. सुंठ कफ कमी करते, भूक वाढवते, पचन सुधारते. भारताच्या कानाकोपऱ्यांत वेगवेगळी उन्हाळी पेयं प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये सर्वत्र नारळपाणी, लिंबू सरबत, ताक, लस्सी, मठ्ठा तर आहेच. पण काही पेयं ही त्या त्या प्रदेशाची शान आहेत. प्रत्येक पेयाची चव निराळी, रूप निराळं, नावं निराळी… पण गुणधर्म एकच तप्त उन्हाळ्यात जिवाला थंडावा !

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बेल पन्ना – हे ओडिशा राज्यातील सर्वाधिक लोकप्रिय पेय आहे. कवठ फळ किंवा बेल फळ यांचा गर पिकलेल्या आंब्याच्या गरात एकत्र करून त्यामध्ये वाटलेला नारळ, साखर, दूध, दही, मिरपूड आणि वेलची पावडर टाकून पाण्यासोबत मिक्स केलं जातं. हे पेय फ्रीजमध्ये थंड करून मग प्यायलं जातं.

जलजिरा

उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारं अत्यंत उपयुक्त असं हे पेय घरच्या घरी बनवता येणारं आणि विविध फायदे देणारं आहे. जिरा पूड, आलं, काळं मीठ, पुदिना, आमचूर पावडर इत्यादी अनेक पदार्थ कमी-जास्त प्रमाणात त्यात वापरून जलजिरा बनवलं जातं. जलजिऱ्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध पदार्थांनुसार त्याचे गुणधर्म बदलत जातात. जलजिऱ्यामुळे शरीराला थंडावा तर मिळतोच, परंतु शरीरातली उष्णताही कमी होते. पचनाच्या तक्रारी दूर होतात. अपचन, गॅसेस, बद्धकोष्टता तसंच भूक न लागणे या तक्रारींवर सर्वात उत्तम उपाय म्हणजे जलजिरा! बाजारामध्ये रेडीमेड जलजिरा पावडरही उपलब्ध आहेत.

कोकम सरबत

उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात वापरला जाणारा आणखी एक पदार्थ म्हणजे कोकम. कोकम किंवा कोकम सरबतामुळे शरीराला थंडावा तर मिळतोच, पण त्याचबरोबर पित्ताच्या सर्व तक्रारी दूर होतात. चवीला उत्तम आणि बरेच आरोग्याचे फायदे देणाऱ्या या सरबतामध्ये उन्हाळ्यात होणाऱ्या घामोळ्यांची समस्या दूर करण्याची क्षमता आहे. कोकम सरबतामध्ये असलेल्या हायड्रॉक्सिसिट्रिक अॅसिड या द्रव्यामुळे चरबी शरीरात साठण्यास अटकाव होत असल्याने वजन आटोक्यात राहते. बाजारामध्ये जे कोकम सरबत मिळतं त्यामध्ये साखरेचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे वजनाला अनुसरून सरबत घेण्याची पद्धत बदलावी किंवा घरच्या घरी आगळ आणूनही सरबत करता येतं.

कुलुक्की

हे केरळ राज्यातील सुप्रसिद्ध उन्हाळी पेय आहे. लिंबू, वाटलेल्या हिरव्या मिरच्या, आलं, साखर आणि बर्फ टाकून हे पेय तयार केलं जातं. या पेयात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी तुळशीचं बीदेखील वापरतात.

पनकम

हे पेय तमिळनाडू राज्यामध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे. साखरेऐवजी यामध्ये गूळ वापरून गोडवा आणला जातो. त्याचबरोबर सुंठ पावडर, वेलची पावडर, लिंबाचा रस आणि काळीमिरी टाकून हे पेय तयार केलं जातं.

नीरा

उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात घेतलं जाणारं महाराष्ट्रातील एक पेय म्हणजे नीरा. विविध जीवनसत्त्वं, कर्बोदके, प्रथिने यात असल्याने हे पेय शरीरासाठी उपयुक्त आहे. नीरेमध्ये लोह, व्हिटॅमिन बी, ए आणि सी असल्याने ती रक्तवर्धक आहे. नीरा प्यायल्याने उन्हाळ्यातील उष्णतेच्या तक्रारी कमी होऊन शरीरास थंडावा मिळतो. पचनाच्या तक्रारी दूर होतात. विशेष म्हणजे मधुमेही व्यक्तींनाही नीरा उपयुक्त आहे. पोटॅशियम, मॅग्नेशियम इत्यादींमुळे हृदयासाठीही उपयुक्त आहे.

सोलकढी

महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर प्यायलं जाणारं पेय म्हणजे सोलकढी. नारळाचं दूध व कोकमाचं सार याचं मिश्रण म्हणजे ही कमाल रेसिपी होय. अगदी फार सामग्री नसल्याने झटपट उरकणारी ही रेसिपी आहे. शरीराचं तापमान आणि अपचन टाळण्यासाठी या पेयाला पसंती दिली जाते. सोलकढीत चवीनुसार हिंग, कडीपत्ता, आलं आणि जिरं टाकलं जातं. कोकमात अॅन्टीऑक्सिडंट, फायबर्स, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम मुबलक प्रमाणात असतात. तर ओल्या नारळात प्रथिने, व्हिटॅमिन-सी, खनिजे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात परिणामी शरीराला या कोकम खोबरं कॉम्बोचा नक्कीच फायदा होऊ शकतो.

टांका तोरणी

हे ओडिशा राज्यातील मसालेदार पेय आहे. हे पेय आंबलेल्या तांदळाच्या पाण्यापासून तयार केलं जातं. यात पुदिन्याची पानं, खडा मीठ, दही, लिंबाचा रस, हिरव्या मिरच्या आणि लिंबाची पानं घातली जातात.

कैरीचं पन्ह

महाराष्ट्रातील आणखी एक लोकप्रिय पेय म्हणजे कैरीचं पन्हं. आजकाल हवाबंद बाटलीतून पन्हं मिळत असल्याने ते सर्वदूर पसरलं आहे. कैरीचा गुणधर्म थंड असतो. त्यामुळे कैरीचं पन्हं पोटाला थंडावा देतं. उन्हाळ्यात उष्माघाताचा सर्वाधिक त्रास होतो, पण तुम्ही कैरीचं पन्हं पिऊन घराबाहेर पडलात तर उष्माघातापासून तुमचा बचाव होईल. उन्हाळ्यात जास्त घाम आल्याने शरीरात लोह, सोडियम क्लोराइडची कमतरता निर्माण होते. उन्हाळ्यातील हे आरोग्यदायी पेय शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन राखते. लोहाची कमतरता भरून काढते आणि शरीर हायड्रेटेड ठेवते, ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही.

बुरांश

उत्तराखंड, हिमाचल प्रदेश यांसारख्या डोंगराळ भागात अशी अनेक झाडं, वनस्पती आणि औषधी वनस्पती आढळतात, ज्याचा उपयोग आरोग्य आणि त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी केला जातो. यापैकी एक आहे बुरांश. बुरांश ही वनस्पती डोंगराळ भागात आढळते. या वनस्पतीच्या फुलांपासून हे पेय तयार केलं जातं. हाडं मजबूत करण्यासाठी, डिहायड्रेशनसाठी तसेच मधुमेहींना हे पेय फायदेशीर आहे.

उसाचा रस

उन्हाळ्यातील सर्वात लोकप्रिय आणि खिशाला परवडणारं पेय म्हणजे उसाचा रस. उसाच्या रसात चांगल्या प्रमाणात ऊर्जा आणि भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वं मिळतात. उष्णता कमी होते आणि मिळणारी ऊर्जा त्वरित शोषली जाते. उसाच्या रसामध्ये कर्बोदके, लोह, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात. उसाच्या रसामुळे त्वचेच्या तक्रारी दूर होतात. उन्हामुळे आलेला काळवंडलेपणा, सुरकुत्या, त्वचेवर येणाऱ्या तारुण्यपीटिका इत्यादी तक्रारी कमी होतात. त्वचेला तजेला येतो. त्वचा स्वच्छ राहण्यास मदत होते. रसामुळे लवकर ऊर्जा मिळते, थकवा लवकर दूर होतो. उन्हाळ्यामुळे वाटणाऱ्या अरुची, मळमळ, थकवा, अशक्तपणा लवकर दूर होण्यास मदत होते.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta viva summer dew summer drinks amy