-डॉ. किशोर अतनूरकर
साधारणतः ४२ ते ५२ या वयोगटातील काही स्त्रिया अनियमित मासिकपाळी किंवा मासिकपाळीत प्रमाणाबाहेर रक्तस्त्राव होण्याच्या तक्रारीने त्रस्त असतात. त्यांना अनेकदा गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो किंवा त्यांना तो त्रास इतका असह्य झालेला असतो की त्याच ते डॉक्टरांना सुचवतात. मात्र तांबी किंवा कॉपर टी सारखं एक छोटंसं ‘मेरीना’ (Mirena) हे साधन गर्भाशयात बसवल्यानं काही स्त्रियांमध्ये गर्भाशयाचं ऑपरेशन टाळता येऊ शकतं. अर्थात हे साधन नेमकं कोणत्या स्त्रियांमध्ये बसवता येऊ शकतं याचाही नीट विचार व्हायला हवा.

स्त्रियांचं मासिकपाळी बंद होण्याचं सरासरी वय ५१-५२ वर्ष आहे. याला रजोनिवृत्ती, ऋतूसमाप्ती किंवा मेनोपॉज असं म्हणतात. मासिकपाळी बंद होणं हा काही संगणकीय कार्यक्रम नसतो, की बटण दाबलं आणि आणि अमुक या महिन्यापासून मासिकपाळी बंद झाली, असं होत नसतं. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. बऱ्याच स्त्रियांची ही प्रक्रिया फारशी कट-कट न होता सुरळीत पार पडते. काही स्त्रियांना मात्र ऋतुसमाप्तीच्या अगोदरच्या एक-दोन वर्षात अनियमित आणि अतिरक्तस्राव होण्याच्या त्रासाचा सामना करावा लागतो.

आणखी वाचा-दृष्टीहिनांसाठी पहिलं ब्रेल मासिक काढणारी उपासना मकाती

बऱ्याचदा डॉक्टरकडे जाऊन, विविध तपासण्या करून, हॉर्मोन्सच्या गोळया घेऊन देखील हा त्रास आटोक्यात येत नाही. पाळी जातही नाही, ती नियमित येतही नाही, अधिकचा रक्तस्त्राव होऊन अशक्तपणा आलेला असतो, डॉक्टरांच्या वेटिंग रूममध्ये तासन्तास बसणे, त्यांची फी देणे, औषधांवरचा खर्च या सर्व गोष्टी कोणत्याच अर्थाने परवडत नाहीत, संपूर्ण कुटुंब वैतागून गेलेलं असतं. साहजिकच, ‘माझी पाळी कधी जाईल हो डॉक्टर, माझा जीव या त्रासापायी आता कंटाळून गेलाय.’ अशा प्रकारची प्रतिक्रिया रुग्णांकडून येत असते. काही वेळेस तर ‘आता बास झालं डॉक्टर, तुमच्या गोळ्यांनी माझं काही कमी होत नाही, माझं गर्भपिशवीचं ऑपरेशन लवकर करून टाका.’ असा प्रस्ताव रुग्णांकडूनच येतो.

वास्तविक पहाता, मासिकपाळीत होणाऱ्या अतिरक्तस्रावाची कारणं सर्व स्त्रियांमध्ये सारखीच असतात असं नाही. किमान ८ ते १० विविध कारणं असू शकतात. त्यावेळी हा त्रास नेमका कोणत्या कारणामुळे होत आहे याचं निदान केलं जातं. प्रजनन संस्थेतील संप्रेरकांचं ( Hormones ) असंतुलन हे एक महत्वाचं कारण. याच स्त्रियांमध्ये Mirena बसवण्याचा विचार केला जाऊ शकतो.

आणखी वाचा-कॅन्सरशी लढत; ६२ वर्षीय महिलेने कर्करोगाच्या अभ्यासासाठी पोहण्यातून उभारला फंड! पाहा…

ऋतुसमाप्तीच्या कालावधीत स्त्रियांच्या प्रजननसंस्थेत संप्रेरकाच्या स्तरावर काय घडामोडी घडत असतात हे समजून घेतल्यास असं का होत असतं हे कळेल. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या दोन संप्रेरकाच्या ( Hormones ) संतुलनावर मासिकपाळीचं चक्र अवलंबून असतं. ऋतुसमाप्तीच्या कालावधीत, म्हणजे पाळी कायमची बंद होण्याच्या चार-दोन वर्ष अगोदरचा काळात काही स्त्रियांच्या प्रजनन संस्थेत हे संतुलन बिघडतं. इस्ट्रोजन या संप्रेरकाची निर्मिती प्रोजेस्टेरॉनच्या तुलनेत वाढते. म्हणून मासिकपाळी अनियमित होते, रक्तस्त्राव जास्त होतो. इस्ट्रोजनचा प्रभाव कमी व्हावा म्हणून गोळ्यांच्या स्वरूपात डॉक्टर प्रोजेस्टेरॉन हॉर्मोन देतात. या गोळ्यांच्या उपचाराने बऱ्याचदा ते बिघडलेलं संतुलन व्यवस्थित होऊन त्रास कमी होतो. पण गोळ्या चालू असेपर्यंतच. गोळ्या बंद केल्या की पुन्हा त्रास सुरु, असं काही स्त्रियांमध्ये होतं. ‘किती महिने गोळ्या घ्यायच्या डॉक्टर? आता मला गोळ्या घेण्याचा कंटाळा आलाय. गोळ्याचे काही साईड इफेक्टस तर होणार नाहीत ना?’ असे प्रश्न उरतातच. प्रोजेस्टेरॉनच्या गोळ्या घेऊन कंटाळा आलेला आहे, गोळ्या घेऊन देखील समाधानकारक परिणाम मिळत नाही, गर्भाशय काढून टाकण्याचं ऑपरेशन करणं देखील योग्य नाही, अशा परिस्थितीत Mirena हे तांबीसारखं साधन गर्भाशयात बसवल्यानंतर ही समस्या जवळपास ७५ टक्के स्त्रियांमध्ये कमी होऊ शकते.

पाळणा लांबविण्यासाठी तांबीचा उपयोग ज्या तत्वावर केला जातो त्याच तत्वावर Mirenaचं कार्य आधारित आहे. उदा. तांबी बसवल्यानंतर, तांब (कॉपर) या धातूचे सूक्ष्म कण अतिशय संथ गतीने गर्भाशयात पसरतात, त्याच प्रमाणे Levonorgestrel या प्रोजेस्टेरॉन रुपी संप्रेरकाचे कण Mirena या गर्भाशयात बसवलेल्या साधनातून संथ गतीने पसरतात आणि गर्भाशयातील वातावरण काही महिन्यात बदलून रक्तस्त्राव कमी होण्यास मदत होते. मात्र Mirena हे साधन बसवलं आणि लगेच पुढच्या महिन्यात मासिकपाळी सुरळीत होईल असं होणार नाही. यासाठी किमान ३ ते ६ महिन्याचा कालावधी लागतो. काहींना Mirena मुळे ओटीपोटात दुखणे, १५ दिवसांनी पुन्हा पाळी येणे या त्रासासाठी हे साधन काढून देखील टाकावं लागतं. काही स्त्रियांमध्ये मासिकपाळी पूर्णपणे बंद देखील होते. मात्र असं कुठलंही साधन गर्भाशयात बसवायचं म्हणजे स्त्रियांना भीती वाटते.

आणखी वाचा-बलात्कारात पीडितेस अपत्य जन्माची सक्ती करता येणार नाही…

अनियमित मासिकपाळी आणि अधिकचा रक्तस्त्राव या त्रासाच्या उपचारासाठी असलेल्या विविध पर्यायाची चर्चा करून, कोणत्या स्त्रियांमध्ये Mirena हे साधन बसवलं पाहिजे आणि कोणत्या स्त्रीमध्ये नको याची अचूक निवड झाल्यास Mirena अधिक परिणामकारक राहील. साधारणतः ४२ ते ५२ वर्षाच्या वयोगटातील ज्या स्त्रीला अनियमित मासिकपाळी आणि अतिरक्तस्रावाचा त्रास आहे, गर्भाशयाचा किंवा गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग नाही, फायब्रॉईडच्या मोठ्या गाठी नाहीत, किंबहुना गर्भाशयाचा आकार नॉर्मल आहे, ऍडिनॉमायोसीस नाही, हॉर्मोन्सच्या गोळ्या घेऊन देखील त्रास कमी होत नाही, या परिस्थितीत, गर्भाशय काढून टाकण्याऐवजी पर्याय म्हणून Mirena या साधनाचा उपयोग करता येईल.

(लेखक एम. डी. (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र) तसेच पीएच.डी. (समाजशास्त्र) आणि एमएस (काउन्सेलिंग आणि सायकोथेरपी) आहेत.)

atnurkarkishore@gmail.com