लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबईः पेटीएमच्या तोट्यात मार्चअखेर संपलेल्या चौथ्या तिमाहीमध्ये आणखी वाढ होऊन, तो ५५० कोटी (साडेपाच अब्ज) रुपयांच्या घरात गेल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला १६८ कोटी रुपयांचा तोटा झाला होता.
पेटीएम पेमेंट बँकिंग व्यवसायावर रिझर्व्ह बँकेने जानेवारी २०२४ मध्ये निर्बंध लादले आहेत. यामुळे डिजिटल देयक क्षेत्रातील या कंपनीच्या एकूण कामगिरीवर परिणाम झाला असून, तोट्यात वाढ झाली आहे. कंपनीचा निव्वळ तोटा चौथ्या तिमाहीत ३९९ कोटी रुपये राहील, असा अंदाज होता. प्रत्यक्षात तो ५५० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. पेटीएमची पेमेंट्स पेमेंट बँक लिमिटेडमधील (पीपीबीएल) गुंतवणूक २२७ कोटी रुपये असून, या उपकंपनीच्या व्यवसायाबद्दल कंपनीने भविष्यात अनिश्चितता असल्याची चिंता भांडवली बाजाराला दिलेल्या माहितीत व्यक्त केली आहे. तसेच पुढील तिमाहीत त्याचे आर्थिक परिणाम भोगावे लागतील, असे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा >>>स्टेट बँकेच्या नवीन अध्यक्षांची निवड प्रक्रिया लांबणीवर; लोकसभा निकालानंतरच उमेदवारांच्या मुलाखतींची शक्यता
पीपीबीएल ही पेटीएमच्या देयक व्यवहारांची पूर्तता करणारी बँक म्हणून कार्यरत होती. बँकेच्या ग्राहकांच्या खात्यात अथवा डिजिटल वॉलेटमध्ये नवीन ठेवी स्वीकारण्यास मनाई करणारा आदेश रिझर्व्ह बँकेने जानेवारी महिन्यात दिला होता. त्याची अंमलबजावणी मार्च महिन्यापासून सुरू झाली. पीपीबीएलवरील निर्बंधामुळे व्यवसायात आलेले अडथळे, यूपीआय खात्यातील उलथापालथ यामुळे चौथ्या तिमाहीत कंपनीच्या तोट्यात वाढ झाली. या सर्व उलथापालथीचा संपूर्ण परिणाम चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जून या पहिल्या तिमाही निकालात दिसेल. त्यावेळी कंपनीचा तोटा ६०० कोटी रुपयांच्या गेला दिसून येईल, असे पेटीएमने नमूद केले आहे.
© The Indian Express (P) Ltd