पुणे : दिवसेंदिवस वाढत जाणारी मागणी आणि उद्योग तसेच निवासी वसाहतींची भविष्यात पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी, पुनर्वापरावर भर देत ‘थरमॅक्स’ने देशभरातील १४० निवासी आणि वाणिज्य संकुलामध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प यशस्वीरित्या राबवला आहे. यातून त्यांची पाण्याची बचत होऊन, मागणी ८० टक्क्यांनी घटली आहे, अशी माहिती थरमॅक्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष भंडारी यांनी सोमवारी दिली.

हेही वाचा >>> रुपयाची विक्रमी नीचांकापर्यंत घसरण; रिझर्व्ह बँकेचा डॉलर विक्रीद्वारे हस्तक्षेप अयशस्वी 

बंगळुरूतील पाणी टंचाईचे उदाहरण देऊन भंडारी म्हणाले की, महानगरांची पाण्याची मागणी वाढत जाणार आहे. त्यामुळे प्रक्रिया करून पाण्याचा पुनर्वापर अपरिहार्य ठरेल. थरमॅक्स देशात १४० निवासी आणि व्यावसायिक संकुलांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबवित आहे. या प्रकल्पांमुळे या संकुलातील पाण्याचा वापर ८० टक्क्यांनी कमी झाला आहे. पुणे परिसरात नव्याने सुरू झालेल्या उद्योगांना प्रामुख्याने पाण्याची समस्या जाणवत आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनही पाण्याच्या पुनर्वापरावर भर दिला जात आहे.

हेही वाचा >>> टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”

पुण्यात नवीन प्रकल्प  

थरमॅक्सने पुण्यात पाणी व सांडपाणी प्रक्रिया करणाऱ्या उत्पादनांची निर्मिती करणारा अत्याधुनिक प्रकल्प सुरू केल्याची घोषणा सोमवारी केली. थरमॅक्सचा पाणी व सांडपाणी प्रकल्प दोन एकरमध्ये पसरला आहे. यात रिव्हर्स ऑस्मॉसिस (आरओ), सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी), एफ्ल्युएन्ट रिसायकलिंग सिस्टिम्स (ईआरएस), झीरो लिक्विड डिस्चार्ज यासाठी अत्याधुनिक उत्पादनांची निर्मिती केली जाणार आहे. याचबरोबर या प्रकल्पात सॉफ्टनर फिल्टर वेसल्स, ट्युब्युलर मेम्ब्रेन मॉड्युल्स आणि कॅपॅसिटिव्ह डिआयोनायझेशन या सुविधा सुद्धा नवीन तंत्रज्ञानामुळे उपलब्ध होणार आहेत.