कौस्तुभ जोशी
सुट्ट्यांचे दिवस सुरू होत आहेत. लहानपणी सगळ्यांनीच सुट्टीत जी धमाल केलेली असते, त्यात पत्ते हा मौजेचा विषय असतो. पत्ते खेळण्यामागे शास्त्रशुद्ध अभ्यास आहे, हे आपण विसरून चालणार नाही. पत्त्यांच्या खेळात सुयोग्य जोड्या म्हणजेच ‘कॉम्बिनेशन’ जुळवणे हा मुख्य भाग असतो. हातात आलेल्या पानांपैकी भविष्यात कोणते पान उपयोगी पडेल व कोणते नाही याचा नेमका अंदाज ज्याला लावता येतो, तो या पत्त्यांच्या खेळात जिंकतो. पत्ते खेळणाऱ्याच्या नशिबावर काहीसे यश अवलंबून असले तरी सर्वाधिक वाटा असतो तो व्यूहरचनेचा. आजच्या ‘बाजार रंग’ या लेखाचा उद्देश सुट्टी आणि पत्त्यांच्या आठवणी जागवणे हा नसून तुमच्या पोर्टफोलिओ बांधणीतील व्यूहरचना किती महत्त्वाची असते हे लक्षात आणून देणे हा आहे. पत्ते खेळताना जो नियम कायम लक्षात ठेवायचा असतो तोच नियम शेअर बाजारालाही लागू होतो. तो म्हणजे ‘भविष्य वर्तवू नका’ समोर दिसेल त्या परिस्थितीवरून निर्णय घ्या. ‘डोन्ट प्रेडिक्ट द मार्केट, फॉलो द मार्केट’ नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होते आहे. ज्यांना आपल्या गुंतवणुकीच्या नव्या आयुष्याची सुरुवात करायची असेल त्यांनी नेमका कोणता विचार कायमस्वरूपी लक्षात ठेवायला हवा ते आता पाहूया.

नव्याने डिमॅट खाती उघडलेल्या आणि शेअरच्या दुनियेत उतरलेल्या पहिल्या पिढीतील नवगुंतवणूकदारांच्या मनात गेल्या दोन वर्षांतील सेन्सेक्स आणि निफ्टीच्या वाढत्या यशामुळे शेअर बाजार हा जणू काही पैशाचा हक्काचा स्रोतच आहे अशीच भावना निर्माण होऊ घातली आहे, मात्र दगडातून शिल्प घडवावं तसाच पोर्टफोलिओचा विचार करायचा असतो. उत्तम शिल्पकार दगडातून शिल्प तयार करायच्या आधी शिल्प तयार करण्यासाठी उत्तम दगड कोणता हे ठरवण्यात अनेक तास खर्ची पाडतो तोच विचार पोर्टफोलिओच्या बाबतीत आपण केला आहे का?

हेही वाचा >>>मार्ग सुबत्तेचा : मल्टिअ‍ॅसेट पोर्टफोलिओ – काय, का आणि कसा?

पोर्टफोलिओ आणि गुंतवणूक क्षमता

शेअर बाजारात सलग किती पैसे गुंतवता येतील? गुंतवलेली रक्कम सलगपणे किती वर्षे ठेवता येईल? बाजार कोसळले आणि जर गुंतवणूक संधी आकर्षक असेल तर नवीन गुंतवणूक करायला पैसे उपलब्ध आहेत का? ते कुठून येतील? असे प्रश्न गुंतवणूकदार म्हणून स्वतःला विचारूनच शेअर बाजारात प्रवेश करायला हवा.

तुमची ‘स्ट्रॅटेजी’ तुमचीच असते

‘कोणताही मंत्र नसणे हाच शेअर बाजाराचा खरा मंत्र आहे’. शेअर विकत घेतल्यावर नेमका किती महिन्यात वर अथवा खाली जाईल यापेक्षा तो किती वर गेल्यानंतर मला त्यातून बाहेर पडायचे आहे किंवा किती खाली आल्यावर खरेदी करायची आहे, याच्या निर्णयाबद्दलचा माझा विचार झालेला आहे का? हा प्रश्न गुंतवणूकदार म्हणून तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे. अचानकपणे बाजार खालच्या दिशेला जाऊ लागले आणि आपण विकत घेतलेल्या शेअरमध्ये सतत घसरण जाणवू लागली तर त्यामागील कारणे कोणती हे आपल्याला ओळखता आले पाहिजे. एखादा शेअर पडणे आणि वाढणे यासाठी एक ना अनेक कारणे असतात. परदेशी गुंतवणूकदारांनी पाठ फिरवणे, आंतरराष्ट्रीय पातळीवर एखादी अप्रिय घटना घडणे. नफा वसुली करणे, अर्थव्यवस्थेशीसंबंधित महत्त्वाची आकडेवारी, आंतरराष्ट्रीय अहवाल, निवडणुका पाऊसपाणी अशा एक किंवा अनेक घटकांचा एकत्रित परिणाम गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर होत असतो.

‘फंडामेंटल की टेक्निकल’

मी फक्त कंपन्यांचे निकाल बघतो, मला चार्टमध्ये कोणताही रस नाही असे म्हणणे शहाणपणाचे लक्षण नाही. बाजारात आलेली बरी किंवा वाईट प्रतिक्रिया नेमकी किती गंभीर आहे हे समजण्यासाठी चार्ट नक्कीच उपयुक्त ठरतात. त्यामुळे बाजारातील माणसांनी ‘फंडामेंटल आणि टेक्निकल’ अशा दोन्ही बाबींचा विचार करणे गरजेचे ठरते.

हेही वाचा >>>क… कमोडिटीजचा : सोन्याचा ‘गाझा’वाजा

पोर्टफोलिओत किती शेअर असावेत?

आपल्याकडे हातात किती रक्कम आहे, यावरून आपण किती शेअर विकत घेऊ शकतो हे ठरते. दोन किंवा तीन लाख रुपये अशा कमी भांडवलावर गुंतवणूक करायची असेल तर चार किंवा पाच कंपन्यांच्या शेअरपासून हळूहळू सुरुवात करावी. पोर्टफोलिओत अधिक शेअर असणे आणि शेअर गळ्यात पडलेले असणे यातला फरक समजून घ्यायला हवा. मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअरमध्ये जोखीम आणि परतावा दोन्ही जास्त असतो म्हणून सुरुवातीला मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये गुंतवणूक करण्याकडे तरुण गुंतवणूकदारांचा ओढा दिसतो. पोर्टफोलिओ भक्कम होऊ लागला की लार्ज कॅप नकोच, लार्जकॅप किती हळू वाढतात? मिडकॅपची वाढ कायमच जास्त असते असे शेरे ऐकू यायला लागतात. मात्र बाजारात ‘करेक्शन’ ही अवस्था आली की, पोर्टफोलिओ हादरतो. अशा वेळी गुंतवणूकदार मानसिकदृष्ट्या किती सक्षम आहे हे चटकन समजते. घाबरून न जाता स्वस्तात मिळणारे शेअर पदरी पाडून घेणे ही ‘स्ट्रॅटेजी’ अवलंबता येते. याचा चुकीचा अर्थ काढून वीस आणि पंचवीस टक्के पडलेल्या शेअर्समध्ये अजून गुंतवणूक केली जाते हे टाळले पाहिजे. ‘स्टॉप लॉस’ हा उच्चारून गुळगुळीत झालेला शब्द असला तरीही तो गुंतवणूकदारांना अजूनही उमगलेला नाही. शेअर बाजारातील पैसा तात्त्विकदृष्ट्या मोहमाया या सदरात मोडतो असे मला वाटते. त्यावर नियंत्रण मिळवणे सहजासहजी शक्य होत नाही आणि पोर्टफोलिओची संरचना आपण स्वतःच बिघडवून बसतो.

पोर्टफोलिओमध्ये रोकड किती असावी?

अंदाजे दहा ते पंधरा टक्के रोकड पैसे तयार ठेवायला हरकत नाही. संधी आल्यानंतर हातात पैसे नाहीत म्हणून चांगला शेअर विकत घेऊ शकलो नाही ही भावना यामुळे टळते. कर्जाऊ घेतलेल्या पैशाने शेअर विकत घ्यावे का? याचे उत्तर हो किंवा नाही असे देण्यापेक्षा आपण नुकसान झाले तर कर्जाऊ घेतलेले पैसे कोणत्या माध्यमातून फेडणार आहोत याचे स्रोत पक्के आहेत का? हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. शेअर गहाण ठेवून त्याच पैशातून ट्रेडिंग करणाऱ्या नवोदितांना याचे महत्त्व पटले पाहिजे.

‘सेकंड इन्कम’ इतके सहजासहजी मिळते का?

शेअर बाजारात पैसे गुंतवून दर महिन्याला अमुक पैसे मिळालेच पाहिजेत अशी मानसिकता भारतातील तरुण पिढीच्या मनात यायला लागलेली आहे. आपल्याला जेवढा पगार मिळतो तसेच काही पैसे दर महिन्याला शेअर ट्रेडिंगमधून मिळाले पाहिजेत हा विचार करूनच तरुण लोक डिमॅट खाती उघडतात. ट्रेडिंग हा बागुलबुवा नसून तो शास्त्रशुद्ध अभ्यास आहे हे न समजताच त्याच्या वाटेला गेल्यावर जर नुकसान झालं तर बाजाराला दोष देण्यात अर्थ नाही.

वर्षभरापूर्वी प्रसिद्ध झालेल्या ‘सेबी‘च्या अहवालानुसार, चाळिशीतल्या गुंतवणूकदारांचा अभ्यास केला असता फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करणाऱ्या दहा पैकी नऊ जणांनी आपले पैसे गमावले होते. ही आकडेवारी देण्याचा उद्देश शेअर बाजारापासून तुम्हाला दूर नेणे हा नसून त्याच्याकडे अधिक डोळसपणे बघायला लावणे हा आहे हे लक्षात आले असेलच.

आपला पोर्टफोलिओ शेअर, रोकड, ईटीएफ किंवा गोल्ड फंड प्रकारातील जमवलेले सोने या माध्यमातून दीर्घकाळात संपत्ती निर्मितीसाठी उत्तम मार्ग ठरू शकतो. मात्र याचे यशापयश सर्वस्वी आपल्या अभ्यासावर अवलंबून आहे.

अर्थातच आपला पोर्टफोलिओ, आपली जबाबदारी!