अनुराधा सत्यनारायण- प्रभुदेसाईवेगवेगळ्या बोर्डांच्या परीक्षांचा निकाल सगळीकडे लागत आहे. चांगली कामगिरी आणि चांगले गुण मिळवण्याचा तीव्र दबाव विद्यार्थ्यांवर असतो. यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड तणाव आणि चिंता निर्माण होते. आजच्या स्पर्धात्मक परिस्थितीत, ‘परीक्षा’ हा शब्द खूप तणाव आणि चिंता निर्माण करतो. काही विद्यार्थ्यांमध्ये नकारात्मकता वाढू शकते, ज्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. परीक्षेच्या निकालांच्या चिंतेमुळे मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम आणि त्यांचे निराकरण कसे करावे ते पाहू या. परीक्षेचे निकाल मिळण्यापूर्वी काळजी आणि चिंता सामान्य असली तरी जास्त काळजी हानिकारक असू शकते. त्यामुळे त्यांची झोप कमी होते, अनेकदा वजनही कमी होते. अनेक विद्यार्थी निराशेच्या गर्तेत जातात. त्यामुळे वर्तणुकीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. अचानक रागाचा उद्रेक होणे, अस्वस्थ वाटणे, आत्मविश्वास कमी होणे अशा समस्या दिसू लागतात. पुढील काही गोष्टी केल्या तर बऱ्याच प्रमाणात तणाव कमी होण्यास मदत होऊ शकेल. सकारात्मक संभाषण ठेवा : चिंतेमुळे विद्यार्थ्यांमध्ये वर्तन बदल होऊ शकतात. या ठिकाणी पालक आणि शिक्षकांनी परिणामांची पर्वा न करता शांत आणि सकारात्मक राहणे आवश्यक आहे. मुलांशी मोकळेपणाने संवाद साधायला हवा. परीक्षेचा निकाल त्यातील गुण यावर भविष्यातील यश अवलंबून नसते याची जाणीव मुलांना करून द्या. तुलना नको : स्वत:ची इतरांशी तुलना केल्याने केवळ चिंता आणि स्वत:विषयी शंका निर्माण होते. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये जसे अद्वितीय सामर्थ्य असते तशीच काही दोषही असतात. मुलांमधील कमतरता सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा. भूतकाळातील चुकांमधून शिकत पुढे जा. व्यग्र रहा, छंद जोपासा : सक्रिय राहणे आणि दैनंदिन दिनचर्या नियमित ठेवल्याने तणाव लक्षणीयरीत्या कमी होतो. परीक्षेच्या निकालाच्या चिंतेचे व्यवस्थापन करण्यासाठी, मुलांनी संतुलित आहार घेतला पाहिजे आणि व्यायाम किंवा छंद यासारख्या शारीरिक क्रियाकलापांमध्ये गुंतले पाहिजे, ज्यामुळे मूड सुधारतो. याव्यतिरिक्त, योगा, ध्यान हे देखील तणाव कमी करण्यास मदत करू शकतात. अनुमान काढणे टाळा : पालक आणि शिक्षकांनी भविष्याबद्दल अनावश्यक अनुमान टाळा. नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. मदत घ्या : आजच्या वेगवान जगात, मदत घेण्यात अजिबात संकोच करू नका. मदत न मागता केवळ तणाव आणि चिंता करणे हानिकारक असू शकते. मुलांच्या मानसिक आरोग्यावर परीक्षेच्या निकालांच्या परिणामास सामोरे जाण्यासाठी व्यावसायिक तज्ज्ञांची मदत घेणे ही सुद्धा एक महत्त्वाची पायरी आहे.