अनुराधा सत्यनारायण-प्रभुदेसाईसतत चिंताग्रस्त राहणाऱ्या शेफालीला माझ्याकडे पाठवण्यात आले. कठीण अशी ऑल इंडिया एन्ट्रन्स एक्झाम उत्तीर्ण झाल्यानंतर तिने अलीकडेच एका प्रतिष्ठित ‘बी’ स्कूलमध्ये ‘एमबीए’साठी प्रवेश केला होता. परंतु तिला बी स्कूलच्या वातावरणाशी जुळवून घेणे कठीण होत होते. ती प्रेझेंटेशन करायला घाबरत होती आणि २ ते ३ वेळा तर ती तिच्या वर्गात बोलणे महत्त्वाचे असतानाही गप्पच राहिली. शाळेतील टॉपर असूनही आणि प्रवेश परीक्षा रँकरला असूनही तिच्या बाबतीत असे काय घडले? असा अनुभव कसा येऊ शकतो? किंवा ती असे कसे वागू शकते असा प्रश्न बहुतेकांना पडेल. ’ स्व-धारणा आणि जगाचा दृष्टिकोन: शेफालीच्या वागण्याचे एक मुख्य कारण म्हणजे आपण स्वत:च्या आणि आपल्या सभोवतालच्या जगाच्या अपेक्षांकडे कसे पाहतो आणि त्यावर कशी कारवाई करतो. जेव्हा आपण प्रथम स्थानी असतो तेव्हा आपण नेहमीच स्वत:कडून उच्च कामगिरी करण्याची अपेक्षा करू लागतो. यात आजूबाजूच्या लोकांच्या अपेक्षांचाही समावेश होतो. जेव्हा आपल्याला असे वाटते की आपण कमी पडलो आहोत आणि या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत, तेव्हा आपण कोलमडून पडतो. अपेक्षा अधोगतीला कारणीभूत ठरतात. आमच्या सत्रांमध्ये आम्ही शेफालीवर केलेल्या कामाचा मुख्य भाग म्हणजे तिच्या स्वत:बाबत असणाऱ्या अपेक्षा सुधारणे. सामथ्र्य क्षेत्र ओळखणे आणि इतर क्षेत्रे विकसित करण्यासाठी मदत करणे. ’ चांगल्या आणि वाईट दृष्टिकोनावर काम करणे :आपण अनेकदा स्वत:कडे चांगल्या किंवा वाईट दृष्टिकोनातूनच पाहतो. त्यातला मध्यम मार्ग किंवा आहे ते स्वीकारून बदलण्याचा दृष्टिकोन तयार केला पाहिजे. तुमच्या अंतर्मनात येणाऱ्या विचारांवर कार्य करा. उदाहरण ‘मी खालील गोष्टींमध्ये चांगला आहे आणि इतर गोष्टी माझ्यात विकसित करायच्या आहेत’. ’ परिस्थितीचे आणि मानसिकतेचे मूल्यांकन करणे तसेच कौशल्यांचे समायोजन करणे: आपल्या जीवनातील प्रत्येक परिस्थिती / प्रत्येक टप्प्यात जुळवून घेण्यासाठी भिन्न कौशल्ये आणि मानसिकतेची आवश्यकता असू शकते. जर आपल्याला असे आढळले की आपल्यासमोर एक आव्हान आहे, तर आपण ते स्वीकारले पाहिजे आणि त्यावर मात करण्यासाठी आपण योग्य लोकांची मदत घेतली पाहिजे. ’ छोटी छोटी ध्येय स्वीकारा : स्वत:चा विकास होईल अशी लहान उद्दीष्टय़े निश्चित करून आणि त्यात यश मिळवून तुम्ही आत्मविश्वास वाढवू शकता. लहान ध्येये आपल्याला अधिक साध्य करण्यात मदत करतात. तसेच मोठे यश प्राप्त करण्यासाठी या लहान ध्येयांचा वापर आपण शिडीप्रमाणे करू शकतो. म्हणूनच तुमचे लहान यशसुद्धा साजरे करा. ’ आत्म-करुणा सराव: आपण विकासाची क्षेत्रे ओळखत असताना आणि कौशल्ये विकसित करण्याचा प्रयत्न करत असताना आपल्याला आत्म-करुणा सराव करणे देखील आवश्यक आहे. आपल्या आतील समीक्षक नेहमीच बलवान असतो आणि अतिशय क्षुद्र आणि टीकात्मक होऊन आपल्यासा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतो. संशोधनातून असे दिसून आले आहे की कठोर आतील आवाजाने आत्म-करुणा बदलल्यास अधिक यश मिळते.