पश्चिम बंगालमधील पूर्व मिदनापूर जिल्ह्य़ात नंदीग्राम येथे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या बैठकीत हल्ला केला, त्यात दोन जण जखमी झाले असून इतर चार जण बेपत्ता आहेत. तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी सांगितले की, आमचा काल झालेल्या या हल्ल्याशी काही संबंध नाही. भाजपचे जिल्हा सचिव सुकुमार दास यांनी असा आरोप केला की, नंदीग्राम येथील तेखाली बझार येथे पक्ष कार्यकर्त्यांची बैठक चालू असताना तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. अभिनेत्री व भाजप नेत्या लॉकेट चटर्जी भाजपच्या गुरूवारच्या मेळाव्यास येणार आहेत. या मेळाव्याची पूर्वतयारी करण्यासाठी बैठक घेतली जात असताना तेथे तृणमूलने हल्ला केला.
दास यांनी सांगितले की, दोन जण जखमी झाले असून त्यांना नंदीग्राम येथील रूग्णालयात दाखल केले आहे तर चार जण बेपत्ता आहेत. भाजपने नंदीग्राम पोलिस ठाण्यात तृणमूल काँग्रेसविरोधात तक्रार दाखल केली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक अलोक राजोरिया यांनी सांगितले की, या प्रकरणाची माहिती आपल्याला मिळाली असून तपास चालू आहे.