आम्ही मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिले होते. पण त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही, असा नवा खुलासा जेडीएसचे सर्वेसर्वा आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी केला आहे. कर्नाटकातील मुख्यमंत्रीपदावरून होत असलेल्या चर्चेदरम्यान देवेगौडा यांनी केलेल्या या वक्तव्याला महत्व प्राप्त झाले आहे. 'आजतक' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेगौडा यांनी ही माहिती दिली. माझ्याशी काँग्रेसनेच संपर्क केला आणि मी त्यांना माझी संमती कळवली. अशा कठीण परिस्थितीत कुमारस्वामीच मुख्यमंत्रीपदाचा भार सांभाळू शकतात, असे काँग्रेसने म्हटले. मला सत्तेची हाव नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. देवेगौडा म्हणाले, आमच्या पराभवाला माध्यमे जबाबदार आहेत. माध्यमांनी आतापासूनच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींना कोणी आव्हान देऊ शकत नाही, असे दाखवण्यास सुरूवात केली आहे. पण असा विचार का केला जात आहे, असा सवाल उपस्थित करत या देशात अनेक महान नेते होऊन गेल्याचे त्यांनी म्हटले. कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाच्या 'रोटेशन' बाबत काँग्रेसबरोबर चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, माझे वय खूप झाले आहे. मी २०१९ ची निवडणूक लढू इच्छित नाही. पण हे सर्व माझ्या प्रकृतीवर अवलंबून असेल. पण हे मी स्पष्ट करू इच्छितो की, मी निवृत्त होणार नाही. राजकारणातील माझे वय कोणी निश्चित करणार नाही. आम्ही आघाडी केली आहे. ज्येष्ठत्वाच्या नात्याने मला काँग्रेस आणि जेडीएसमधील आघाडी कायम राहावी अशी इच्छा आहे. माझ्याबरोबरच्या नेत्यांनी यापूर्वी असे केले आहे. ही मोठी समस्या नाही. ही आघाडी पाच वर्षे टिकावी यासाठी माझे प्रयत्न असतील. काँग्रेसकडे नऊ तर आमच्याकडे दोन खासदार आहेत. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी वाटपाचा आता काहीच मुद्दा नाही. एकजुटीने आम्ही नेतृत्व करू. काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांमध्येही अनेक दिग्गज नेते आहेत. मनमोहनसिंग यांनी १० वर्षांपर्यंत सरकार चालवले आहे. मी १३ पक्षांच्या आघाडी सरकार दरम्यान झालेल्या कामांची माहिती देऊ इच्छित नाही. आम्ही ही चुका केल्या. पण कोणावर आरोप नाही केला. आताची परिस्थिती खूप वाईट आहे. गोरक्षेच्या नावावर हल्ले केले जात आहेत, असा भाजपावर त्यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला.