तब्बल ३० वर्षांहून अधिक काळ भारतीय जनता पार्टीत राहून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे आता भाजपात परतणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून खडसे भाजपात परतणार असल्याची चर्चा चालू होती. अशातच खडसे यांनी गेल्या आठवड्यात स्वतःच भाजपात परतणार असल्याची घोषणा करत या चर्चांना पूर्णविराम दिला. खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली. यावेळी ते म्हणाले, भाजपामध्ये येण्याचा माझा प्रयत्न नव्हता, किंवा तसा विचार नव्हता. परंतु, भारतीय जनता पक्षातील माझे जे जुने सहकारी, कार्यकर्ते आणि नेते म्हणायचे की तुम्ही आत्ता भाजपात असायला हवे होतात. तुम्ही स्वगृही परत यायला हवं, तस झाल्यास बरं होईल. गेल्या चार-सहा महिन्यांपासून याबाबत चर्चा चालू होती. परंतु, माझ्या राजकीय परिस्थितीनुसार मी निर्णय घेऊ शकत नव्हतो. आता पक्षातील केंद्रीय नेतृत्त्वाशी चर्चा करून ते सांगतील त्या तारखेला मी दिल्लीत जाऊन भाजपात प्रवेश करणार आहे. खडसे यांनी भाजपात जाण्याची घोषणा करून अनेक दिवस लोटले आहेत. अद्याप त्यांचा भाजपा प्रवेश झालेला नाही. पक्षश्रेष्ठींनी खडसेंना वेटिंगवर ठेवलं आहे. त्यामुळे खडसे आणि त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.

दरम्यान, राज्याचे ग्रामविकास मंत्री, भाजपाचे उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख नेते आणि एकनाथ खडसेंचे जुने सहकारी गिरीश महाजन यांनी खडसेंच्या पक्षप्रवेशाच्या इच्छेबाबत भाष्य केलं. तसेच खडसेंचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर टीकादेखील केली. जळगावातल्या एका सभेत महाजन म्हणाले, नुसतं मी-मी करून चालत नाही. इथे पक्षाशिवाय दुसरा कोणीही मोठा नाही. मला वाटतं ज्याचं पुण्य संपलं तो आमच्या पक्षातून बाहेर गेला. तुम्ही आता बाहेर गलेले आहात, आता बघा तुमची अवस्था काय होतेय. तुमचं भविष्य कसं आहे ते पाहा… या पक्षात मी मी म्हणणारे काही जण होते, पण आता त्यांची अवस्था काय झालीय ते पाहा… ज्यांनी ३० ते ३५ वर्षे आमदारकी उपभोगली… तब्बल २० वर्षे लाल दिव्याच्या कारमधून फिरले… माझ्यामुळेच पक्ष आहे… मी आहे म्हणून भाजपा आहे… मी आहे म्हणून बँक आहे, दूध डेअरी आहे… माझ्यामुळेच सर्वकाही आहे. अशा अविर्भावात असणारे नेते आता कुठे पडलेत ते सर्वांना माहिती आहे.

हे ही वाचा >> “नवरा-बायको राजकारणातले बंटी-बबली…”, नवनीत राणांवर आनंद अडसुळांची खोचक टीका; म्हणाले, “मी काय शिक्कामोर्तब करू?”

काही लोक ३० ते ३५ वर्षे पक्षात होते. ३५ वर्षे पक्षामुळे त्यांनी अनेक गोष्टी उपभोगल्या, मात्र एकदा पक्षाच्या तिकीटावर निवडणूक हरले. एकदा पडल्यामुळे लगेच दुसऱ्या वर्षी त्यांनी पक्ष बदलला. त्यामुळे ३५ वर्ष वाया गेली. याचा अर्थ तुमची पक्षाविषयी काहीच निष्ठा नाही. माझ्यावर अन्याय झालाय, असं म्हणण्याला काहीच अर्थ नाही. मुळात पक्ष आहे म्हणून आपल्याला किंमत आहे, पक्ष आहे म्हणून आपण आहोत. उद्या गिरीश महाजनला असं काही वाटलं, त्याच्या मनात असं काही आलं तर हे सगळं शून्य होईल. तुम्ही मतदारसंघात कितीही कामं करा, लोकांना काहीही सांगा, तरी पक्ष महत्त्वाचा आहे. निष्ठेला खूप महत्त्व आहे. अशा निष्ठावान कार्यकर्त्यांना आपण आजवर तिकीट दिलं आहे.