“मोदी सरकारच्या थापा या उघड झालेल्या आहेत. आता मी भाषणातील मुद्दे काही इकडे मांडत नाही; पण मी या सरकारला गजनी सरकार म्हणतो”, असं म्हणत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. सामनाने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. संजय राऊत यांनी त्यांची मुलाखत घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मी मोदी सरकार असा उल्लेख करतोय. कारण मला मोदी सरकार नकोय. मला भारत सरकार पाहिजे; पण मोदी संपूर्ण राज्यभर फिरतायत. आता मला वाटतं, एखाद्या गल्लीबोळातही रोड-शोसुद्धा करतील. आणि त्यांनी तो करावा. महाराष्ट्र कसा आहे? महाराष्ट्राचा आक्रोश आणि महाराष्ट्राचा संताप हा त्यांनी अनुभवला पाहिजे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

पुलवामात जे घडलं त्याच्याबद्दल तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जे विस्तवासारखं असलेलं जे वास्तव जगासमोर मांडलं, त्याला कुणी उत्तर देऊ शकलेलं नाही. सत्यपाल मलिक हे राज्यपाल होते. तेही कश्मीरचे. त्यांचे अधिकार सर्वांना माहीत आहेत. घटनात्मक पदावर बसलेल्या माणसानं जेव्हा हे भीषण सत्य जनतेसमोर आणलं, त्याच्यावरती आज कुणी चर्चा करत नाहीये. काल जो हल्ला झाला त्याला जबाबदार कोण? पुलवामाचा जो हल्ला झाला, त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न संजय राऊतांनी विचारला. त्यावर ते म्हणाले, “मोदी सरकारच्या थापा या उघड झालेल्या आहेत. आता मी भाषणातील मुद्दे काही इकडे मांडत नाही; पण मी या सरकारला गजनी सरकार म्हणतो.”

हेही वाचा >> ‘तुमचा अभिमन्यू झाला आहे का?’, उद्धव ठाकरेंचं उत्तर, “चक्रव्यूह रचणारे..”

“२०१४ साली ते जे काय बोलले ते त्यांना २०१९ साली आठवत नव्हतं. २०१९ साली जे काय बोलले ते आता आठवत नाहीये. आज काय बोलतायत ते उद्या आठवणार नाहीये. त्यांना असं वाटतं की, त्यांच्या स्मरणशक्तीवर परिणाम झाला म्हणजे जनतेच्याही झाला. पण असं नाहीये. कारण जनता ही दोन वेळेला म्हणजे १० वर्षे मूर्ख बनली; पण ते जे म्हणतात नं, ‘तुम्ही कदाचित सर्वांना एकदा मूर्ख बनवू शकता. काही जणांना तुम्ही सदैव मूर्ख बनवू शकता; पण सर्वांना सदैव मूर्ख बनवू शकत नाही…'”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“आता जनता पेटलेली आहे. जनता पेटून उठलेली आहे. यांच्या ज्या काय सगळ्या भाकडकथा होत्या… शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार, प्रत्येकाला घर मिळणार… प्रधानमंत्री किसान सन्मान योजना वगैरे वगैरे या भूलथापा तर आहेतच, त्याच बरोबरीने भ्रष्टाचाऱ्यांना एकत्र घेतायत हे. पक्ष फोडतायत. ही गद्दारी महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. महाराष्ट्रानं गद्दारी कधीच सहन केलेली नाही. मागे मला आपले धाराशिवचे खासदार ओमराजे यांनी खूप चांगलं उदाहरण दिलं. तीनशे-चारशे वर्षे जी काय झाली असतील ती असतील; पण अजूनही खंडूजी खोपडे हे नाव घेतल्यानंतर आपण काय म्हणतो? गद्दार! पण बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, कान्होजी जेधे यांची नावे घेतली की हे कट्टर सैनिक. म्हणजे ३००-४०० वर्षे झाल्यानंतरही खोपड्याच्या माथ्यावरती असलेला गद्दारीचा जो शिक्का आहे, तो कुणाला पुसता नाही आलेला, तर या भेकडांची काय अवस्था होईल!”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I call modi govt ghazni govt uddhav thackerays scathing criticism sgk