Char Dham Yatra 2024 हिंदू धर्मात चार धाम यात्रेला विशेष महत्त्व आहे. मे महिन्यात चार धामच्या यात्रेला सुरुवात होते. यमुनोत्रीपासून चार धामच्या यात्रेला सुरुवात होते. यमुनोत्रीपासून गंगोत्री, त्यानंतर केदारनाथ ते बद्रिनाथ असे या यात्रेचे स्वरूप आहे. चारधाम यात्रा सुरू होऊन केवळ पाच दिवस झाले आहेत. भक्ती आणि उत्साहाने विक्रमी संख्येने भाविकांनी १० मे पासून चार धाम यात्रेला सुरुवात केली. परंतु, या वर्षाच्या यात्रेच्या सुरुवातीच्या दिवसांत ११ यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यात्रेकरूंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, यात्रेकरूंचे आरोग्य आणि सुरक्षितता ही अधिकाऱ्यांसाठी मोठी चिंतेची बाब ठरत आहे. वाढलेली वाहतूक कोंडी, गर्दी, गैरव्यवस्थापन यामुळे संपूर्ण सरकारी व्यवस्थाच कोलमडली आहे. सुरळीत कामकाजासाठी, उत्तराखंड सरकारने चार धाम यात्रेकरूंसाठी काही नियम जारी केले आहेत. उत्तराखंडमधील चार धाम यात्रेची व्यवस्था कशी कोलमडली? यात्रेकरूंच्या मृत्युचे कारण काय? चार धाम यात्रेसाठी जारी करण्यात आलेले नवीन नियम काय आहेत? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

यात्रेत वाढलेली वाहतूक कोंडी, गर्दी, गैरव्यवस्थापन यामुळे संपूर्ण सरकारी व्यवस्थाच कोलमडली आहे. (छायाचित्र-एएनआय)

हेही वाचा : हिंसाचारामुळे धगधगत्या फ्रान्समध्ये पुन्हा दंगली भडकल्या; फ्रान्सच्या न्यू कॅलेडोनियामध्ये आणीबाणी लागू, कारण काय?

यात्रेचा ओघ

उत्तराखंडच्या मुख्य सचिव राधा रतूडी यांनी जाहीर केले की, या वर्षी यमुनोत्री, गंगोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ धामची पवित्र यात्रा सुरू झाल्यापासून, मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट यात्रेकरूंनी यात्रेला सुरुवात केली आहे. राज्य सरकारने सांगितले की, १४ मे पर्यंत २६ लाख ७३ हजार भाविकांनी पोर्टलवर नोंदणी केली असून १ लाख २४ हजारांहून भाविकांनी ऑफलाइन नोंदणी केली आहे. आतापर्यंत, १ लाख ५५ हजार लाखांहून अधिक यात्रेकरूंनी केदारनाथला, ७० हजारांहून अधिक यात्रेकरूंनी यमुनोत्री आणि ६० हजारहून अधिक यात्रेकरूंनी गंगोत्रीला भेट दिली आहे. बद्रीनाथ धाम १२ मे रोजी उडघडण्यात आले, जिथे ४५ हजार यात्रेकरूंनी भेट दिली.

आरोग्य तपशील आवश्यक

अचानक वाढलेल्या संख्येमुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला आहे. राज्य सरकारने पाच दिवसांत ११ यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची नोंद केली आहे. आरोग्य विभागातील अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, श्वासोच्छवासाच्या किंवा इतर वैद्यकीय समस्यांमुळे या नागरिकांचा मृत्यू झाला. त्यांचे वय ५० वर्षांहून अधिक आहे. “भाविकांनी त्यांच्या आरोग्याविषयी संपूर्ण माहिती दिली पाहिजे कारण ही सर्व देवस्थानं उंचावर आहेत. उच्च तापमान असलेल्या ठिकाणाहून प्रवास करताना तापमानाचा पारा खाली घसरत जातो. त्यामुळे डोंगरावरील हवामानाशी जुळवून घेणे कठीण जाते,” असे गढवाल विभागाचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी सांगितले.

उत्तराखंडच्या मुख्य सचिव राधा रतूडी यांनी अशा घटनांवर प्रकाश टाकला; ज्यामध्ये यात्रेकरूंनी आपल्या आरोग्यविषयक समस्या सांगितल्या नाही किंवा नोंदणीदरम्यान चुकीची माहिती प्रदान केली. आता अधिकाऱ्यांना ५० आणि त्याहून अधिक वयाच्या यात्रेकरूंच्या आरोग्य तपासणीला प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्याच्या आरोग्य विभागानेही यात्रा मार्गावर ४४ तज्ज्ञांसह १८४ डॉक्टर तैनात केले आहेत. “सर्व येणाऱ्या भाविकांची तपासणी केली जात आहे आणि त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांची माहिती देण्यासाठी फॉर्म प्रदान केले जात आहेत. भक्तांनी त्यांच्या आरोग्याच्या स्थितीबाबत संपूर्ण माहिती देणे अत्यावश्यक आहे,” असे पांडे म्हणाले.

व्हीआयपी दर्शनावर बंदी

प्रचंड गर्दीचा ओघ व्यवस्थापित करण्यासाठी, उत्तराखंड सरकारला काही भाविकांना प्राधान्य देणाऱ्या ‘व्हीआयपी दर्शन’ च्या तरतुदीवरील बंदी घालावी लागली आहे. “मी हे कळवू इच्छिते की, या वर्षी उत्तराखंडमधील पवित्र चार धामला भेट देणाऱ्या यात्रेकरूंच्या संख्येत सतत वाढ होत आहे. उत्तम व्यवस्थापनासाठी, आम्ही ३१ मे २०२४ पर्यंत कोणतेही ‘व्हीआयपी दर्शन’ न घेण्याचा निर्णय घेतला आहे,” असे रतूडी यांनी माध्यमांना सांगितले.

मंदिर परिसरात फोनवर बंदी

चार धाम यात्रेत मंदिर परिसरांमध्ये मोबाईलच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी यात्रेकरूंना यापुढे मंदिर परिसरात रील्स किंवा व्लॉग शूट करण्याची परवानगी दिली जाणार नाही. “या व्हीडिओंमुळे भाविकांच्या भावना दुखावल्या जातात. त्यामुळे, मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी आणि भाविकांचा आदर करण्यासाठी तेथे जाणाऱ्यांना मंदिराच्या परिसराच्या ५० मीटरच्या परिघात व्हिडीओ काढण्याची किंवा रील्स काढण्याची परवानगी दिली जाणार नाही. मोबाईल फोन घेऊन जाण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. तुम्ही ते वापरू शकता परंतु कोणालाही व्हिडिओ शूट करण्याची किंवा रील्स तयार करण्याची परवानगी दिली जाणार नाही,” सरकारने जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये लिहिले आहे.

मंदिरातील अनेक पुजाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. “आमच्यासाठी, हे व्लॉगर्स आणि यूट्यूबर्स, तसेच सेल्फी काढण्यात मग्न असलेले यात्रेकरू हे एका संकटासारखे आहेत. कारण ते मंदिरांमध्ये दर्शन प्रक्रियेत अडथळा आणत आहेत,” असे बद्री-केदार मंदिर समिती (BKTC) चे अध्यक्ष अजेंद्र अजय म्हणाले. बुधवारी ५२ तरुणांचा एक गट केदारनाथ मंदिरात पोहोचल्यानंतर, त्यांनी ४० ढोलांसह मोठ्या आवाजात वादन केले. त्यामुळे मंदिरातील पुजारी संतप्त झाले होते.

नोंदणी अनिवार्य

भाविकांच्या गर्दीमुळे उत्तराखंड पोलिसांनी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत; ज्यात यात्रेकरूंनी पूर्व नोंदणी केल्याशिवाय प्रवास सुरू करू नये, असे सांगण्यात आले आहे. यात्रेच्या मार्गावर मद्यपान किंवा ड्रग्जच्या सेवनासह लोकांनी शिष्टाचार राखावे आणि गैरवर्तन होऊ नये यासाठी पोलिसांनी ‘ऑपरेशन मर्यादा’देखील सुरू केले आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही यात्रेकरूंची वाढती संख्या लक्षात घेत, गंगोत्री आणि यमुनोत्रीच्या यात्रा व्यवस्थापनाच्या देखरेखीसाठी त्यांनी त्यांचे सचिव, वरिष्ठ आयएएस अधिकारी आर मीनाक्षी सुंदरम यांची नियुक्ती केली.

हेही वाचा : वकिलांप्रमाणे आता डॉक्टरांनाही ग्राहक संरक्षण कायद्यातून मिळणार सूट? सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं?

आयुक्तांच्या म्हणण्यानुसार, काही लोक ठरवून दिलेल्या तारखांच्या आधी दर्शनासाठी आले आहेत, त्यांचा आता तपास सुरू आहे. जर लोक नोंदणी केलेल्या तारखेपूर्वी यात्रेसाठी आले, तर टूर ऑपरेटरचे परवाने निलंबित केले जातील, असे वृत्त ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने दिले आहे.

काही भाविकांनी तक्रार केली आहे की त्यांना लांब ट्रॅफिक जाममुळे मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी १५ तासांपेक्षा जास्तचा कालावधी लागला. “ऋषिकेशहून बद्रीनाथला पोहोचायला आम्हाला १५ तासांपेक्षा जास्त वेळ लागला. अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्थापित करण्यासाठी कोणीही नव्हते,” असे ऋषिकेश येथील विजय पनवार यांनी एका वृत्त वाहिनीला सांगितले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Char dham yatra death and restriction rac