भारत आणि मालदीव यांच्यातील तणावपूर्ण संबंधांदरम्यान मालदीवच्या पर्यटन मंत्र्यांनी सोमवारी भारतीयांना आपल्या देशाच्या पर्यटनावर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेत योगदान देण्याचे आवाहन केले. मालदीवचे पर्यटन मंत्री इब्राहिम फैसल यांनी दुबईतील एका मुलाखतीत मालदीव आणि भारत यांच्यातील ऐतिहासिक संबंधांवर भर दिला. मालदीव हे एक बेट राष्ट्र आहे. अशा परिस्थितीत तेथील उपजीविकेचे मुख्य साधन पर्यटन आहे. मालदीवच्या अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्यानंतर भारतीय पर्यटकांनी बेट राष्ट्र असलेल्या मालदीवपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर आता भारतीयांना परत येण्याची विनंती करण्यात आली आहे.

मालदीवने ऐतिहासिक संबंधांची आठवण करून दिली

मालदीवचे पर्यटन मंत्री इब्राहिम फैसल यांनी सोमवारी (६ मे) पीटीआय वृत्तसंस्थेच्या मुलाखतीत दिलखुलास मतं व्यक्त केली. भारत आणि आमचे ऐतिहासिक संबंध आहेत. आपल्या नवनिर्वाचित सरकारलाही भारताबरोबर एकत्र काम करायचे आहे. आम्ही नेहमी शांतता आणि मैत्रीपूर्ण वातावरणाचा प्रचार करतो. आमचे लोक आणि सरकार भेट देणाऱ्या भारतीयांचे मनापासून स्वागत करतील. पर्यटन मंत्री या नात्याने मी भारतीयांना कृपया मालदीवच्या पर्यटनाचा भाग व्हावे, असे सांगू इच्छितो. आपली अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे, असंही त्यांनी अधोरेखित केले.

हेही वाचाः देशात झपाट्याने वाढतोय कर्करोग, अहवालात धक्कादायक वास्तव उघड; काय आहेत कारणं?

भारत आणि मालदीवमध्ये वाद कसा सुरू झाला?

खरे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६ जानेवारी रोजी ‘X’ वर लक्षद्वीपचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते, ज्यावर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी सोशल मीडियावर भारत आणि पंतप्रधान मोदींविरोधात अपमानास्पद टिप्पणी केली होती. या घटनेबाबत भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि लोकांनी सोशल मीडियावर मालदीववर बहिष्कार टाकून पर्यटनासाठी न जाण्याचा इशारा दिला.

हेही वाचाः भारतातील धर्मावर आधारित आरक्षणाचा संक्षिप्त इतिहास; मुस्लिमांचा ओबीसीमध्ये समावेश कसा झाला?

…म्हणून भारतीयांनी मालदीवपासून राखलं अंतर

या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत भारतीय पर्यटकांच्या संख्येत घट झाल्याचे मालदीव सरकारच्या आकडेवारीतून समोर आले आहे. बेट राष्ट्राने ४ मेपर्यंत भारतातील एकूण ४३,९९१ पर्यटकांचे स्वागत केले. तसेच जानेवारी ते एप्रिलदरम्यान मालदीवमध्ये ४२,६३८ भारतीय आले. गेल्या वर्षीची तुलना केल्यास मालदीवमध्ये भारतातून ७३,७८५ पर्यटकांचे आगमन झाले. जानेवारी २०२४ मध्ये एकूण १२,७९२ भारतीयांनी बेट राष्ट्राला भेट दिली. फेब्रुवारीमध्ये एकूण ११,५२२ भारतीय पर्यटकांनी मालदीवला भेट दिली, गेल्या वर्षी याच महिन्यात एकूण १९,४९७ पर्यटक होते. या वर्षी मार्च २०२३ मध्ये याच महिन्यात एकूण १८,०९९ च्या तुलनेत केवळ ८,३२२ भारतीयांनी देशाला भेट दिली.

मालदीवमध्ये सर्वाधिक परदेशी पाहुण्यांमध्ये भारतीय पर्यटकांचा समावेश होतो. २०२३ मध्ये बेट राष्ट्राला भेट दिलेल्या एकूण १७ लाख पर्यटकांपैकी २,०९,१९८ हून अधिक पर्यटक भारतीय होते, त्यानंतर रशियन २,०९,१४६ आणि चीनमधून १,८७,११८ पर्यटक आले होते. २०२२ मध्ये भारतीय पर्यटकांची संख्या २.४ लाखांहून अधिक होती, तर मागील वर्षी २०२१ मध्ये बेट राष्ट्रात जाणाऱ्या भारतीयांची संख्या २.११ लाखांहून अधिक होती.

भारतीयांनी बेट राष्ट्रापासून दूर राहणे पसंत केल्याने मालदीवमधील पर्यटन उद्योगाची वाट लागली आहे. भारतीय पर्यटक गरम हंगामात मालदीवमध्ये वारंवार येत असतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास मालदीव हे हंगामाशिवाय पर्यटन करण्यासाठी अनेक भारतीयांचे आवडते ठिकाण आहे. भारतीय पर्यटकांचे महत्त्व पाहून मालदीव असोसिएशन ऑफ ट्रॅव्हल एजंट्स अँड टूर ऑपरेटर्स (MATATO) ने एप्रिलमध्ये पर्यटन प्रोत्साहनासाठी काही ऑफरही दिल्या होत्या. तसेच मालदीवमधील भारतीय उच्चायुक्त मुनू महावर यांची भेट घेतली होती.

९ एप्रिल रोजी MATATO ने असेही सांगितले की, भारतीय पर्यटकांना मालदीवमध्ये परत आणण्याची योजना सुरू आहे, ज्यात भारतातील प्रमुख शहरांमध्ये व्यापक रोड शो आयोजित करणे, तसेच भारत समर्थकांना जोडणे याचा समावेश आहे. खरं तर मालदीवची अर्थव्यवस्था पर्यटनावर चालते, त्यांना GDP च्या २५ टक्के थेट आणि ७५ टक्के दुय्यम स्त्रोतांकडून उत्पन्न मिळते. त्यामुळे भारतीय पर्यटकांनी देशावर सामूहिक बहिष्कार घातला, तर त्यांचे अतोनात नुकसान होण्याची शक्यता आहे.

भारतीय मालदीवकडे का पाठ फिरवत आहेत?

भारतीय सुंदर बेट राष्ट्राकडे पाठ फिरवत आहेत, याचे नेमके कारण काय? याचे उत्तर मालदीवमधूनच मिळू शकते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मालदीवमध्ये सत्तेवर आलेले अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू हे ‘इंडिया आऊट’ मोहिमेचे जनक आहेत आणि ते चीन समर्थकही आहेत. किंबहुना त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच त्यांनी भारतीय लष्करी जवानांना त्यांच्या देशातून बाहेर काढण्याचे त्यांचे निवडणूक वचन पाळले. जानेवारीमध्ये त्यांच्या सरकारमधील तीन मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींबद्दल तसेच देशाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. मालदीवच्या मंत्रिमंडळातील उपमंत्री मरियम शिउआना यांनी मोदींना “इस्रायलची कठपुतली” आणि X वर “विदूषक” असे संबोधले. त्यांचे इतर दोन सहकारीदेखील त्यात सामील झाले आणि त्यांनी पंतप्रधान आणि भारतीयांबद्दल अपमानास्पद टिप्पण्या पोस्ट केल्या.

त्यानंतर त्यांनी पोस्ट हटवल्या तरी अनेक भारतीय संतप्त होते, ज्यांनी नंतर बेट राष्ट्रावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. सेलिब्रिटीजसाठी मालदीव हे सुट्टीचे पसंतीचे ठिकाण होते, परंतु त्यांनीही या वाद उडी घेऊन बॉयकॉट मालदीव मोहिमेला समर्थन दिले. अभिनेते अमिताभ बच्चन यांनी X वरील एका पोस्टमध्ये लक्षद्वीपच्या प्रवासाला प्रोत्साहन दिले, तर अक्षय कुमारनेदेखील त्यासाठी मोर्चेबांधणी केली. देशातील आघाडीच्या ऑनलाइन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या EaseMyTrip ने मालदीवसाठी कोणतेही बुकिंग स्वीकारले जाणार नाही, असे जाहीर केले. तेव्हा बहिष्काराला आणखी उत्तेजन मिळाले. द्वीपसमूहात भारतीय पर्यटक कमी होण्यामागे मालदीवशी बिघडलेले संबंध हे एकमेव कारण नाही. भारतीय प्रवाशांसाठी इतर जागतिक बाजारपेठा खुल्या होणे हेदेखील संख्येत घट होण्याचे कारण असू शकते, असंही काही टूर ऑपरेटर्सना वाटते. उदाहरणार्थ, केनिया, थायलंड, मलेशिया असे अनेक देश भारतीयांना व्हिसामुक्त प्रवासाची परवानगी देत आहेत.

भारतीय पर्यटकांच्या संख्येत ४२ टक्के घट

सोमवारी प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, भारतातून मालदीवमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या पहिल्या चार महिन्यांच्या तुलनेत यंदाच्या पहिल्या चार महिन्यांत ४२ टक्क्यांनी घट झाली आहे. भारतीय पर्यटक मालदीवपेक्षा लक्षद्वीप किंवा अंदमान निकोबार बेटांना अधिक पसंती देत ​​आहेत.