२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय प्रचार प्रचंड वेगाने होत आहे. सामान्य जनतेला आकर्षित करण्यासाठी प्रत्येक पक्ष नानाविध प्रचार मोहिमांचा वापर करत आहे. त्यातीलच एक प्रकार म्हणजे ‘स्लोगन’ किंवा घोषवाक्य. भारतीय निवडणुकांच्या इतिहासात या घोषवाक्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारताची ओळख त्याच्या लोकशाहीवादी भूमिकेसाठी आहे. भारतीय लोकशाहीला आकार देण्याचे महत्त्वाचे काम निवडणुकांनी केले; तर या निवडणुकांच्या यशात या घोषवाक्यांचाही तितकाच महत्त्वाचा वाटा आहे. आजच्या काळात इंटरनेट, सोशल मीडिया यांमुळे जग जवळ आले आहे. त्यामुळे निवडणूक प्रचारात आधुनिकतेचा- सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. राजकीय प्रचार- प्रसाराच्या तऱ्हा बदलल्या तरी एक गोष्ट आजही कायम आहे, ती म्हणजे निवडणुकांतील घोषवाक्य. त्याच अनुषंगाने आजपर्यंतच्या निवडणुकांच्या इतिहासातील प्रसिद्ध ‘घोषवाक्यां’चा घेतलेला हा आढावा !

अधिक वाचा: विश्लेषण: सार्वत्रिक निवडणुका भारतीय लोकशाहीची ओळख कशा ठरल्या?

घोषवाक्यांमागील मूळ हेतू !

राजकीय स्लोगन किंवा घोषवाक्ये ही आकर्षक आणि संस्मरणीय असतात. राजकीय संदेश किंवा अजेंडा व्यक्त करणे हा या घोषवाक्यांचा मूळ उद्देश असतो. या घोषणांनी गेल्या काही वर्षांत भारतीय राजकारणाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

‘जनसंघ को वोट दो, बीडी पिना छोड दो; बिडी में तंबाकू है, काँग्रेस वाला डाकू है’

वास्तविक कोणत्याही सार्वजनिक प्रसंगी घोषणा देण्याची परंपरा प्राचीन आहे. भारतीय संस्कृतीत युद्धापासून ते उत्सवापर्यंत घोषणा दिल्या जातात. परंतु भारतीय राजकारणातील तेही स्वतंत्र भारताच्या राजकारणातील घोषवाक्यांची पाळेमुळे १९५२ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सापडतात. या निवडणुकीच्या कालखंडात ‘एक देश में दो विधान, दो प्रधान, नहीं चलेगा, नहीं चलेगा‘ ही डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी दिलेली घोषणा लोकप्रिय ठरली. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द करण्याकरिता आंदोलन केले होते. तर याच कालखंडात काँग्रेसकडून ‘स्थायी, असंप्रदायिक, गतिशील राष्ट्र के लिये काँगेसको वोट दो‘ अशी घोषणा देण्यात आली होती. एकूणच या घोषणांमधून सत्ताधारी-विरोधकांमधील राष्ट्रीय प्रश्नांवरून होणारी जुगलबंदी दिसून येते.

१९६७ च्या निवडणुकीत जनसंघाकडून ‘जनसंघ को वोट दो, बीडी पिना छोड दो; बिडी में तंबाकू है, काँग्रेस वाला डाकू है‘ ही घोषणा देण्यात आली. या निवडणुकीत त्यांना विजय मिळाला नाही तरीही तुलनेने जनसंघाच्या जागांमध्ये वाढ झाली होती.

‘इंदिरा इज इंडिया’ आणि ‘इंडिया इज इंदिरा’ ते ‘इंदिरा हटाओ, देश बचाओ’

१९५२ साली भारतात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर १९७१ साली झालेली निवडणूक महत्त्वाची ठरली. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दिलेल्या ‘गरिबी हटाओ’ या घोषणेला चांगलाच प्रतिसाद मिळाला आणि विजयाची माळ इंदिरा गांधी यांच्या गळ्यात पडली. दोलायमान अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर या घोषणेने सामान्यांच्या चित्ताचा ठाव घेतला हे, मात्र नक्की, परंतु चार वर्षातच न्यायालयाने हा विजय अवैध ठरविला आणि त्यानंतर जे घडले त्याला जग साक्षी आहे. इंदिरा गांधी सरकारकडून आणीबाणी घोषित करण्यात आली. या कालखंडात अनेक निर्बंध लादण्यात आले. विरोधकांना बळजबरीने तुरुंगात डांबण्यात आले. विरोधकांसह सामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्यावरही गदा आली. काँग्रेस पक्षाचे सदस्य देव कांत बरुआ यांनी आणीबाणीच्या काळात ‘इंदिरा इज इंडिया आणि इंडिया इज इंदिरा‘ ही घोषणा दिली. याच पार्श्वभूमीवर प्रत्युत्तरादाखल अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता मोर्चाची (पीपल्स फ्रंट) स्थापना केली. या फ्रंटने ‘इंदिरा हटाओ, देश बचाओ‘ आणि ‘संपूर्ण क्रांती’ अशा घोषणा देत १९७७ च्या निवडणुकीत इंदिरा सरकारला सत्तेतून पायउतार केले. ‘इंदिरा हटाओ, देश बचाओ’ ही घोषणा जयप्रकाश नारायण यांनी दिली होती.

‘एक शेरनी सौ लंगूर, चिकमंगलूर-चिकमंगलूर’

१९७७ च्या निवडणुकीत रायबरेलीतून पराभूत झालेल्या इंदिराजींनी लोकसभेत पोहचण्यासाठी कर्नाटकातील चिकमंगळूरची निवड केली. यावेळी इंदिराजींची स्पर्धा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरेंद्र पाटील यांच्याशी होती. लढत खडतर होती… जनता पक्षाने इंदिराजींचा पराभव करण्यासाठी आपली पूर्ण ताकद लावली. अशा स्थितीत इंदिरा गांधींच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवणाऱ्या सशक्त घोषणेची काँग्रेसला गरज भासली. त्यावेळी दक्षिण भारतीय काँग्रेसचे नेते देवराज उर्स यांनी ‘एक शेरनी सौ लंगूर, चिकमंगलूर-चिकमंगलूर’ असा नारा दिला. या निवडणुकीत इंदिराजींनी ७७ हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला. त्यांच्या विरोधात निवडणूक लढविणाऱ्या २६ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली.

१९८४ ते २००० या कालखंडातील प्रसिद्ध घोषवाक्य

१९८४ साली इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत ‘जब तक सूरज चाँद रहेगा, इंदिरा तेरा नाम रहेगा‘ ही घोषणा देण्यात आली होती. या घोषणेने काँग्रेससाठी सहानुभूतीची लाट निर्माण करण्यास मदत केली, त्याचा काँग्रेसला प्रचंड फायदा झाला. काँग्रेसने तब्बल ४१४ जागा जिंकून नवा विक्रम प्रस्थापित केला, आजही तो कायम आहे.

१९८९ साली भारतीय जनता पक्षाकडून ‘हम सौगंध राम की खाते हैं, मंदिर वहीं बनायेंगे‘ ही घोषणा देण्यात आली, तो मुद्दा केंद्रस्थानी ठेवत भाजपाचा प्रवास सुरू झाला आणि २०१४ साली ते सत्तासोपानापर्यंत पोहोचले.

१९९६ साली ‘सबको देखा बारी बारी, अबकी बारी अटल बिहारी‘ अशी घोषणा देत भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचारमुक्त नेत्याच्या प्रतिमेसह सत्तेत आली. ‘सबको देखा बारी बारी, अबकी बारी अटल बिहारी’, ‘जांचा, परखा, खरा’ या अटलजींवर आधारित घोषणांनी चमत्कार केला. १९९६ साली, ‘जात पर ना, पट पर, मोहर लगेगी हाथ पर’ माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांनी १९९६ दिलेल्या घोषणेतून काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली होती. ९० च्या दशकात लालू प्रसाद यादव यांच्यावर देण्यात आलेली ‘जब तक रहेगा समोसे में आलू, तब तक रहेगा बिहार में लालू‘ ही घोषणाही लोकप्रिय ठरली होती.

आधुनिक घोषणा

राष्ट्रीय राजकीय पक्षांनी २००४ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये व्यावसायिक जनसंपर्क कंपन्यांची मदत घेतली. या निवडणुकीत भाजपाच्या ‘इंडिया शायनिंग’ला काँग्रेसने ‘आम आदमी को क्या मिला?‘ या घोषणेने प्रत्युत्तर दिले.

२००९ साली, ‘सोनिया नहीं ये आंधी है, दूसरी इंदिरा गांधी है‘ असे म्हणत सोनिया गांधी यांना दुसऱ्या इंदिरा गांधी म्हणून पुढे करत लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला होता.

२०१४ साली, ‘अबकी बार मोदी सरकार

अच्छे दिन‘चे आश्वासन देत भाजपने २०१४ साली नरेंद्र मोदी यांचे नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले. अबकी बार, मोदी सरकार ही घोषणा सर्वात लोकप्रिय निवडणूक घोषणांपैकी एक होती; जी वणव्यासारखी पसरली, त्यामुळे भाजपला राष्ट्रीय निवडणुकीत विजय मिळवण्यास मदत झाली. निवडणुकीच्या काळात पक्षाचा ‘चाय पे चर्चा‘ हा प्रचार कार्यक्रमही प्रचंड लोकप्रिय आणि यशस्वी झाला.

२०१९ सार्वत्रित निवडणूक

देशात अन्याय होत असल्याचे सांगत काँग्रेस पक्षाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ‘अब होगा न्याय‘ या प्रचाराचा नारा दिला. हे थीम साँग प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांनी लिहिले होते.

भारतीय जनता पक्षाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ‘फिर एक बार मोदी सरकार‘ ही घोषणा निवडली. आणि मोदी हे भ्रष्टाचार रोखणारे चौकीदार आहेत, या आशयाची घोषणा दिली तर याच घोषणेला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसकडून ‘चौकीदार चोर है‘ अशी टीकात्मक घोषणा देण्यात आली.

अधिक वाचा: विश्लेषण: एका मिठाईवाल्याच्या विजयाने ब्रिटिश सरकार हादरले; १९२० सालची निवडणूक का ठरली महत्त्वाची?

निवडणूक घोषवाक्यांचे महत्त्व

भारतीय राजकारणात निवडणूक घोषणांनी तसचे घोषवाक्यांनी महत्त्वाचे कार्य केले आहे. या घोषणांचा राजकीय पक्षांनी, उमेदवारांनी स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी उपयोग केला. एखादी महत्त्वाची परिस्थितीजन्य आणि तितकीच आकर्षक, लक्षवेधी घोषणा मतदारांच्या मनावर खोलवर परिणाम करते. किंबहुना अशा स्वरूपाच्या घोषणा समर्थकांमध्ये आपुलकीची भावना निर्माण करतात. याव्यतिरिक्त, राजकीय घोषणांचा वापर विशिष्ट संदेश किंवा अजेंडा देण्यासाठीही केला जातो. ज्यात, “बेटी बचाओ, बेटी पढाओ” आणि “स्वच्छ भारत अभियान” सारख्या सामाजिक घोषणांचा समावेश आहे. आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी ‘सबका साथ, सबका विकास’ आणि ‘मेक इन इंडिया’ सारख्या घोषणांचा वापर करण्यात आला आहे. एकुणात, आपल्याला आवडणाऱ्या रंजक किंवा मनाला भिडणाऱ्या राजकीय मोहिमेच्या घोषवाक्यांसाठी बरेच परिश्रम घेतले जातात. विपणनतज्ज्ञ आणि राजकीय रणनीतीकारांकडून राजकीय मोहिमेची घोषणा काळजीपूर्वक तयार केली जाते. राजकीय घोषणा तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये संशोधन, विचारमंथन आणि चाचणी यासह अनेक पायऱ्यांचा समावेश होतो. त्यामुळे एखाद लहानस वाक्यही निवडणुकीत विजय मिळवून देते.