राखी चव्हाण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने भारतातील बिबट्याच्या सद्यःस्थितीबाबतचा अहवाल बुधवारी जाहीर केला. २०१८ ते २०२२ या चार वर्षांच्या कालावधीत त्यात १.०८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, वाघाच्या तुलनेत बिबट्या हा प्राणी दुर्लक्षित असल्याने अनेक प्रश्नही निर्माण झाले आहेत. मानवी वस्तीजवळ त्याचा वावर वाढल्याने त्याच्या व्यवस्थापनावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. त्याच वेळी वनखात्याकडे त्यासाठी अजूनही कृती आराखडा नाही.

बिबट्यांचा अधिवास वेगाने बदलतोय का?

बिबट्याने आता मनुष्यालगतच्या अधिवासात राहण्यासाठी स्वत:ला जुळवून घेतले आहे. किंबहुना हाच त्यांचा मुख्य अधिवास झाला आहे. प्रजनन ते शिकार यासह इतर सर्व गोष्टी याच अधिवासात होतात. मुंबई, नाशिकसारख्या शहरात बिबट्यांचा सहज वावर दिसतो. नाशिक विभागात बिबट्यांचा जुना अधिवास संपल्याने पर्याय म्हणून बिबट्याने उसाच्या शेतात ठाण मांडणे सुरू केले. काटेरी जंगल, शहराची सीमा आणि आता सिमेंटचे जंगलही त्यांनी अधिवास म्हणून स्वीकारले आहे.

हेही वाचा >>> माजी पंतप्रधान मोरारजी देसाई खरंच ‘शिवांबू’ प्राशन करायचे? जाणून घ्या

बदललेल्या अधिवासाचा धोका कोणता?

निवांत झोपणे, शिकार करणे, ती केल्यानंतर निवांत खात बसणे यापासून बिबट्याची संपूर्ण दिनचर्या प्रभावित झाली. त्यामुळे हल्ल्याच्या घटनाही वाढल्या. बिबट्याचा स्वभाव माणसाला मारणे नसून त्याला टाळणे आहे. मात्र, स्वसंरक्षण हा प्राण्यांचादेखील स्वभाव असल्याने माणसांवर बिबट्याच्या हल्ल्याची संख्या वाढत आहे. शेतशिवार त्याचा अधिवास झाल्यामुळे विहिरीत पडून बिबट्यांचे मृत्यू होत आहेत. बिबट आणि मानव हा संघर्ष वाढत असल्याने त्याच्या शिकारीचे प्रमाणही वाढत आहे.

बिबट्या अजूनही दुर्लक्षित?

वाघ आणि बिबट्या हे दोन्ही मार्जारकुळातील प्राणी आणि दोन्हीही वन्यजीव अधिनियमांतर्गत अधिसूची एकमध्ये म्हणजेच संकटग्रस्त. मात्र, व्याघ्रसंवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होत असताना बिबट्याच्या संरक्षण व संवर्धनासाठी कोणतेही प्रयत्न नाहीत. त्यांच्यासाठी कोणतीही विशेष यंत्रणा नाही. त्यामुळे बिबट्या जंगलाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात आढळतो. हरीण, रानडुक्कर व तत्सम प्राणी त्याचे मूळ खाद्य आहे, पण शहर आणि गावालगतच्या अधिवासामुळे आता कुत्रेदेखील त्याचे खाद्य बनले आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : रामदेव बाबांच्या पतंजलीचे दावे फसवे आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने कशाबद्दल फटकारले?

सर्वेक्षणात बिबट्यांची संख्या किती?

भारतात २०१८च्या सर्वेक्षणात भारतात १२ हजार ८५२ बिबटे आढळले. २०२२च्या सर्वेक्षणात ही संख्या वाढून १३ हजार ८७४ इतकी झाली. २०१८ व २०२२मध्ये अनुक्रमे मध्य प्रदेशात ३४२१ व ३९०७, महाराष्ट्रात १६९० व १९८५, कर्नाटकात १७८३ व १८७९ तर तामिळनाडूत ८६८ व आता १०७० इतके बिबटे आहेत.

बिबट्यांची सर्वाधिक व सर्वात कमी संख्या कुठे?

२०१८ आणि २०२२ मध्ये संपूर्ण भारतात केलेल्या सर्वेक्षणाचा विचार केल्यास १.०८ टक्क्यांनी वार्षिक वाढ झाली आहे. शिवालिक टेकड्या आणि गंगेच्या पठारी भागात दरवर्षी बिबट्याच्या संख्येत ३.४ टक्क्यांनी घट दिसून आली. २०१८ मध्ये याठिकाणी १२५३ तर २०२२ मध्ये ११०९ बिबटे आढळले. तर आंध्र प्रदेशातील नागार्जुनसागर, श्रीशैलम तसेच मध्य प्रदेशातील पन्ना व सातपुडा व्याघ्रप्रकल्पांत बिबट्यांची संख्या सर्वाधिक आढळून आली.

बिबटे संख्येच्या अहवालातील निरीक्षण काय?

व्याघ्र प्रकल्प महत्त्वाचे असतानाच संरक्षित क्षेत्राबाहेरील संवर्धनातील अंतर दूर करणे तितकेच महत्त्वाचे आहे. संघर्षाच्या वाढत्या घटना बिबट्या आणि मानव अशा दोघांसाठी आव्हाने निर्माण करतात. संरक्षित क्षेत्राबाहेर बिबट्यांचे अस्तित्व तितकेच महत्त्वाचे असल्याने, अधिवास संरक्षण वाढवण्यासाठी आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सरकारी संस्था, संवर्धन संस्था आणि स्थानिक समुदाय यांचा समावेश असलेले सहयोगी प्रयत्न आवश्यक आहेत, असे निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आले.

बिबट्यांचे सर्वेक्षण कुठे?

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्था यांनी राज्यांच्या वनविभागाच्या सहकार्याने व्याघ्रश्रेणीतील १८ राज्यांमध्ये बिबटे सर्वेक्षण करण्यात आले. हिमालय तसेच वाघांचा अधिवास नसलेल्या अर्धशुष्क भागात सर्वेक्षण करण्यात आले नाही. तसेच जंगलाव्यतिरिक्त बदललेल्या बिबट्याच्या अधिवासातदेखील हे सर्वेक्षण करण्यात आले नाही.

rakhi.chavhan@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta analysis report on status of leopards in india print exp zws
First published on: 01-03-2024 at 07:30 IST