Cyber Crimes In India भारतीयांची ऑनलाइन फसवणूक होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. लोक विविध आमिषांना बळी पडत असल्यामुळे सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी नवनवीन क्लृप्त्यांचा वापर करीत आहेत. म्यानमार, लाओस व कंबोडिया या तीन आग्नेय आशियाई देशांतील सायबर गुन्हेगार मोठ्या प्रमाणात भारतीयांची फसवणूक करीत असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय सायबर क्राइम को-ऑर्डिनेशन सेंटरने एक विश्लेषण केले. त्यात असे आढळून आले की, जानेवारी ते एप्रिल या कालावधीत ४६ टक्के फसवणुकीचे प्रकार नोंदवण्यात आले; ज्यामध्ये पीडितांनी अंदाजे १,७७६ कोटी रुपये गमावले.

भारतीय सायबर क्राइम को-ऑर्डिनेशन सेंटर केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येते. देशातील सायबर गुन्ह्यांचा प्रतिबंध, शोध, तपास व खटला चालविण्यासाठी ही संस्था काम करते. नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवरील (NCRP) डेटा दर्शवितो की, या वर्षी १ जानेवारी ते ३० एप्रिलदरम्यान ऑनलाइन फसवणुकीच्या ७.४ लाख तक्रारी दाखल करण्यात आल्या; तर २०२३ मध्ये १५.५६ लाख तक्रारी आल्या होत्या.

हेही वाचा : राम रहीम हत्याप्रकरणात निर्दोष, तरीही तुरुंगात; कारण काय? त्याच्याविरोधात कोणकोणते गुन्हे? जाणून घ्या…

२०२२ मध्ये ९.६६, २०२१ मध्ये ४.५२ लाख, २०२० मध्ये २.५७ लाख व २०१९ मध्ये २६,०४९ तक्रारी आल्या होत्या. या आकडेवारीवरून हे लक्षात येते की, दरवर्षी फसवणुकीचे प्रकार दुपटीने वाढत आहेत. भारतीयांची फसवणूक करण्यासाठी आग्नेय आशियाई देशांतील गुन्हेगार चार पद्धतींचा वापर करीत आहेत. या पद्धती कोणत्या? भारतीयांची फसवणूक नक्की कशी होत आहे? हे जाणून घेऊ या.

भारतीयांची ऑनलाइन फसवणूक होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

सायबर गुन्ह्यांचे प्रकार

ट्रेडिंग स्कॅम : कथित फसवणूक करणारे सोशल मीडियावर जाहिराती पोस्ट करतात. या जाहिरातींमध्ये विनामूल्य ट्रेडिंग टिप्स दिल्या जातील, असा दावा केला जातो. लोकांचा विश्वास संपादित करण्यासाठी या जाहिरातींमध्ये अनेकदा प्रसिद्ध स्टॉक मार्केट तज्ज्ञांची छायाचित्रे आणि बनावट लेख वापरले जातात. या जाहिरातींद्वारे शेअर्समध्ये गुंतवणूक करून पैसे कमविण्याबाबत टिप्स मिळण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप किंवा टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील होण्यास सांगितले जाते.

काही दिवसांनंतर पीडितांना काही विशिष्ट ट्रेडिंग अॅप्लिकेशन्स स्थापित करण्यास आणि मोठा नफा कमावण्यासाठी पुढील मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी म्हणून स्वतःची नोंदणी करण्यास सांगितले जाते. सायबर गुन्हेगारांनी सांगितल्याप्रमाणे पीडित ॲप्सवर गुंतवणूक सुरू करतात. यापैकी कोणतेही ॲप शेअर बाजार नियामक सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे नोंदणीकृत नसते. परंतु, पीडितांना याबद्दल पुरेशी माहिती नसते.

पीडितांनी शेअर्स खरेदी करण्यासाठी विशिष्ट बँक खात्यांमध्ये पैसे जमा केल्यानंतर त्यांच्या डिजिटल वॉलेटमध्ये काही बनावट नफा दाखविण्यात येतो. पण, जेव्हा हे पैसे काढण्याचा प्रयत्न करण्यात येतो, तेव्हा त्यांना असा संदेश येतो की, त्यांच्या वॉलेटमध्ये विशिष्ट रक्कम म्हणजे ३० ते ५० लाख रुपये जमा झाल्यानंतरच ते पैसे काढू शकतात. परिणामी पीडित व्यक्तीला गुंतवणूक ठेवावी लागते आणि काही वेळा नफ्यावर करदेखील भरावा लागतो. भारतीय सायबर क्राइम को-ऑर्डिनेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुमार म्हणाले, “या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांतील डेटाचे विश्लेषण केल्यानंतर आम्हाला आढळले की, भारतीयांनी ट्रेडिंग घोटाळ्यात १४२०.४८ कोटी रुपये गमावले आहेत.

डिजिटल अरेस्ट : फसवणुकीच्या या प्रकारात गुन्हेगार पीडितांना कॉल करतात आणि सांगतात की, त्यांना बेकायदा वस्तू, ड्रग्ज, बनावट पासपोर्ट आदी अवैध वस्तूंचे कुरिअर पाठविण्यात आले आहे. काही प्रकरणांमध्ये फसवणूककर्ते एखाद्या व्यक्तीच्या नातेवाईक किंवा मित्रांशी संपर्क साधतात आणि पीडित एखाद्या गुन्ह्यात किंवा अपघातात सामील असल्याचे आणि ताब्यात असल्याचे सांगतात. लोकांना खरे वाटावे यासाठी पोलिसांच्या छायाचित्रांचा आणि ओळखपत्रांचादेखील वापर केला जातो.

अनेकदा पीडितांना स्काईप कॉलवर जोडले जाते. त्यासाठी सायबर गुन्हेगार पोलिस ठाणे किंवा सरकारी कार्यालयांसारखे दिसणारे स्टुडिओ तयार करतात आणि पोलिसांचे गणवेश घालून तेथे असतात. या ठिकाणाहून ते पीडितांकडे पैशांची मागणी करतात. जेव्हा पीडितांना डिजिटल अरेस्ट होते, अशा वेळी त्यांना पैसे मिळेपर्यंत स्काईप कॉलच्या बाहेर पडण्याची परवानगी दिली जात नाही. जानेवारी-एप्रिल या कालावधीत या प्रकारच्या घोटाळ्यात भारतीयांनी एकूण १२०.३० कोटी रुपये गमावल्याचे कुमार यांनी सांगितले.

गुंतवणुकीचा घोटाळा : पीडितांना सामान्यत: एखाद्या कंपनीचा प्रतिनिधी म्हणून घरून काम करण्याची आणि ३० हजार रुपये प्रतिमहिना कमावण्याची ऑफर दिली जाते. अशा आशयाचा त्यांना व्हॉट्सॲपवर मेसेज येतो. जे या मेसेजला प्रतिसाद देतात त्यांना सांगण्यात येते की, त्यांना काही संस्थांचे सोशल मीडिया रेटिंग वाढविण्याचे काम करावे लागेल.

काम पूर्ण झाल्यानंतर पीडितांना एक कोड दिला जातो आणि टेलिग्रामवरील संबंधित अॅडमिनला देण्यास सांगितले जाते. अॅडमिन पीडितांना त्यांचे पैसे कोठे जमा करायचे हे विचारतात आणि अतिशय छोटी रक्कम पीडितांच्या खात्यात जमा होते. या टप्प्यावर पीडिताला प्री-पेड किंवा व्यापारी कार्यात सहभागी होण्यास सांगितले जाते. त्यामध्ये विशिष्ट रक्कम भरल्यानंतर १५०० ते एक लाखदरम्यानच्या रकमेचा जास्त परतावा देण्याचे वचन दिले जाते. जे पीडित नकार देतात त्यांना ग्रुपमधून काढून टाकले जाते आणि सामील झालेल्या पीडितांना सांगितले जाते की, पैसे आणि नफा एक दिवसात त्यांना मिळेल.

परंतु, दुसऱ्या दिवशी पीडितांना सांगितले जाते की, त्यांचे काम पुरेसे चांगले नव्हते आणि पैसे परत मिळविण्यासाठी नवीन कार्यांमध्ये सहभागी होण्यास सांगितले जाते. या “गुंतवणूक घोटाळ्यात भारतीय पीडितांचे एकूण २२२.५८ कोटी रुपयांचे नुकसान झाले”, असे कुमार यांनी सांगितले.

डेटिंग घोटाळा : हा फसवणुकीचा अतिशय जुना प्रकार आहे. पीडित पुरुषांना विदेशी स्त्रिया आमिष दाखवितात आणि त्यांची फसवणूक करतात. या स्त्रिया नातेसंबंध किंवा लग्नाचा प्रस्ताव ठेवतात आणि नंतर वैयक्तिकरीत्या भेटण्याची योजना तयार करतात. पीडितांना सामान्यत: या स्त्रियांकडून कॉल येतो की, त्यांना विमानतळावर ताब्यात घेण्यात आले आहे आणि बाहेर पडण्यासाठी पैशांची आवश्यकता आहे.

अमेरिकन एफबीआयने आपल्या वेबसाइटवर असे म्हटले आहे की, डेटिंग घोटाळा करणारे गुन्हेगार विश्वासार्हता पटवून देण्यात तज्ज्ञ असतात. हे गुन्हेगार बहुतेक डेटिंग आणि सोशल मीडिया साइट्सवर असतात आणि पीडिताचा विश्वास पटकन मिळविण्याचा प्रयत्न करतात. कुमार म्हणाले की, या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत भारतीय पीडितांना रोमान्स / डेटिंग घोटाळ्यांमध्ये एकूण १३.२३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा : माणसाचं शरीर किती उकाडा सहन करु शकतं? उन्हामुळे मृत्यू कसा होतो?

आग्नेय आशियातील गुन्हेगार आणि चिनी कनेक्शन

भारतीय सायबर क्राइम को-ऑर्डिनेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुमार म्हणाले, “म्यानमार, लाओस व कंबोडिया या देशांमध्ये आधारित सायबर क्राइम ऑपरेशन्स फसव्या रणनीतींच्या व्यापक श्रेणीचा वापर करतात. समाजमाध्यमाचा वापर करून भारतीयांना खोट्या रोजगाराच्या संधी मिळवून देण्याची ऑफर देऊन, त्यांची फसवणूक केली जाते.” भारतीय सायबर क्राइम को-ऑर्डिनेशन सेंटरला असे आढळून आले आहे की, गुन्ह्यात वापरल्या जाणाऱ्या अनेक वेब अॅप्लिकेशन्समध्ये चिनी भाषेचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे यात चिनी कनेक्शन आहे, हे नाकारले जाऊ शकत नाही, असे कुमार यांनी सांगितले..