आसाम सरकारकडून म्हैस आणि कोकीळ लढाईला सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे खेळ माघ बिहूमध्ये आयोजित केले जातात. दरम्यान, आसाम सरकारच्या या भूमिकेविरोधात पेटा(PETA) या प्राणीप्रेमी संघटनेने गुवाहाटी उच्च न्यायालयात दाद मागितली असून अशा प्रकारच्या खेळांवर बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर आसाममधील ही म्हशींची शर्यत, कोकीळ पक्ष्यांची शर्यत काय असते? पेटाने न्यायालयात का धाव घेतली? याआधी न्यायालयाने प्राण्यांची शर्यत आणि प्राण्यांशी निगडित असलेल्या खेळांवर काय निर्णय दिलेला आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आसाममधील जुनी परंपरा

प्राण्यांची झुंज लावण्याची प्रथा आसाममध्ये फार जुनी आहे. अशा प्रकारच्या शर्यती, झुंज तेथील संस्कृतीचा भाग आहेत, असे म्हटले तरी हरकत नाही. देशात इतर राज्यांत मकर संक्रांत, लोहरी, पोंगल या सणांपासून कापणीला जशी सुरुवात होते, त्याच पद्धतीने आसाममध्ये माघ बिहू सणानंतर पिकाच्या कापणीला सुरुवात होते. या सणानिमित्त आसाममध्ये प्राण्यांची झुंज, शर्यती आयोजित केल्या जातात. याच खेळांमध्ये दोन म्हशींमध्ये झुंज घडवून आणली जाते. नागाव जिल्ह्यातील अहतगुरी येथे अशा प्रकारचा सर्वांत मोठा खेळ आयोजित केला जातो. म्हशींच्या लढाईच्या खेळाचे हे सर्वात मोठे केंद्रच म्हणायला हवे. येथे ‘अहटगुरी अंचलिक मोह-जूज अरु भोगली उत्सव उड्जापन समिती’च्या वतीने अनेक दशकांपासून अशा प्रकारच्या लढती आयोजित केल्या जातात. तर दुसरीकडे हाजो येथील हायाग्रिव माधब (माधव) मंदिरात कोकिळांमध्ये झुंज घडवून आणली जाते. हा खेळ पाहण्यासाठी हाजो येथे आसामच्या वेगवेगळ्या भागांतून लोक येतात. गुवाहाटीपासून हाजो हे ठिकाणी साधारण ३० किमी दूर आहे. या खेळाच्या काही आठवड्यांआधी लोक कोकिळा या पक्ष्याला पाळतात, त्याची काळजी घेतात आणि या खेळाच्या दिवशी या कोकिळांना भाग घ्यायला लावले जाते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why peta demanding assam traditional buffalo fight bulbul fight prd