परतीच्या पावसाने दुष्काळ झळा अनुभवणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मान टाकलेल्या पिकांना उभारी येत असल्याचे जाणवत आहे. मात्र, अद्यापही मोठय़ा पावसाची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. ऑक्टोबर हिटमुळे त्रस्त झालेले नागरिक हवेतील गारव्यामुळे आनंदित झाले आहेत.
मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर जिल्ह्यात दमदार पर्जनवृष्टी झाली होती. आठवडाभर पडलेल्या पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. पुढील काळातही असाच जोमदार पाऊस होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना पावसाने अंग काढून घेतले. दोन-अडीच महिने पावसाचे दर्शन दुर्मिळ झाल्याने जिल्ह्याला दुष्काळ झळा जाणवू लागल्या. अशातच ऑक्टोबर सुरू होण्याच्या अगोदर आठवडाभर आधीच ऑक्टोबर हिटचा उष्मा जाणवू लागल्याने नागरिक हैराण झाले होते, मात्र परतीच्या पावसाने चित्र बदलले आहे.
गुरुवारी रात्री शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात सर्व तालुक्यात गेल्या २४ तासात ३१२.१९मि.मी. पावसाची नोंद झाली. पावसामुळे पिकांनाही काही प्रमाणामध्ये दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी दिवसभर बरसत होत्या. यामुळे ऑक्टोबर हिट गायब होऊन थंड वाऱ्याची झुळूक अनुभवायला मिळाली. जिल्ह्यात आजअखेर एकूण ९८८१.८९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. १ जूनपासून सरासरी ८२३.४९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय पावसाची आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले ५.१२ (२२२.३७), शिरोळ ५.८६ (२३६.२०), पन्हाळा ५.१४ (७२१.५७.), शाहुवाडी ५ (१०६०.४०), राधानगरी ३१.३७ (८९१.०४), गगनबावडा ३४ (२६३१.७०), करवीर १०.५१(३९९.९४), कागल ३८.५४ (४५६.८५), गडिहग्लज ४९.०० (३९५.३९), भुदरगड ६७.६० (९३५.४०), आजरा ३१.२५ (८२५.६०), चंदगड २९.०० (११०५.४३).