कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील हेरवाड गावातील चौगुले मळ्यात असणाऱ्या शेतीला आग लागली. त्यामध्ये परिसरातील सुमारे ४० एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना आज शनिवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. या आगीमध्ये शेतकऱ्यांचे ठिबक, केबल वायरिंग यासह पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपा जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे. चौगुले मळा येथे काही ठिकाणी उस तोड सुरू होती. एका क्षेत्राला आग लागली. उन्हामुळे ती झपाट्याने पसरत गेली. यात परिसरातील सुमारे ४० एकर ऊस जळून खाक झाला. या आगीत स्वप्नील चौगुले, रावसाहेब चौगुले, रमेश आलासे, महावीर पाटील, बी.के. पाटील, विजय आलासे, श्रीकांत माळी, अभय आलासे, प्रवीण आलासे, दादा आलासे, बंडू परीट, अंकुश माळी, तुकाराम माळी, सौरभ चौगुले आदी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.