Tushar Deshpande and Tanush break the 78 year old record : भारतात आयपीएल २०२४ ची तयारी जोरात सुरू आहे. या स्पर्धेपूर्वी अनेक खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन करताना दिसत आहेत. त्यापैकी एक नाव आहे धोनीच्या टीम सीएसकेच्या तुषार देशपांडेचे. यावेळी वेगवान गोलंदाजाने चेंडूने नव्हे तर बॅटने कमाल केली आहे. देशपांडेने रणजी ट्रॉफीमध्ये अकराव्या क्रमांकावर फलंदाजी करताना झंझावाती शतक झळकावले. एवढेच नाही तर दुसऱ्या टोकाला उभ्या असलेल्या १०व्या क्रमांकाचा फलंदाज तनुष कोटियननेही शतक झळकावले. तुषार देशपांडे आणि तनुष कोटियनने दहाव्या विकेटसाठी २३२ धावांची ऐतिहासिक भागीदारी साकारली.

७८ वर्षात प्रथमच घडलं –

तुषार देशपांडे आणि तनुष कोटियन यांनी फलंदाजी करत इतिहास रचला. दोन्ही खेळाडूंमध्ये २३२ धावांची मोठी भागीदारी झाली. ७८ वर्षांच्या इतिहासात १०व्या आणि ११व्या क्रमांकावरील खेळाडूंनी शतकी खेळी खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे संघाने धावफलकावर ५६९ धावा केल्या असून मुंबईकडे पहिल्या डावात ३६ धावांची आघाडी होती. त्यामुळे बडोद्यासमोर ६०६ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले . जर मुंबई संघाने हा सामना जिंकला तर ते उपांत्य फेरीत प्रवेश करlतील.

तुषार देशपांडे ठरला तिसरा भारतीय फलंदाज –

अकराव्या क्रमांकावर फलंदाजी करताना प्रथमश्रेणी शतक झळकावणारा देशपांडे हा तिसरा भारतीय फलंदाज ठरला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ११व्या क्रमांकावर असलेला भारतीय क्रिकेटपटू म्हणून त्याने सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या केली. यापूर्वी हा विक्रम शुटे बॅनर्जी (१२१) यांच्या नावावर होता. तुषार देशपांडे अखेर १२३ धावांवर बाद झाला आणि ही भागीदारी २३१ धावांवर संपुष्टात आली, जी रणजी करंडक स्पर्धेच्या सर्वात मोठ्या विक्रमापेक्षा एक धाव कमी आहे.

हेही वाचा – Sarfaraz Khan : ‘…तर रेल्वेमध्ये कपडे विकायला जाऊ शकतो’, सर्फराझच्या वडिलांना आठवला ‘तो’ भावनिक प्रसंग

प्रथम श्रेणी आणि रणजी ट्रॉफीमध्ये दहाव्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी –

चंदू सरवटे आणि शुटे बॅनर्जी यांच्यात २४९ धावांची भागीदारी झाली होती. भारतासाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १०व्या विकेटसाठी ही सर्वोच्च भागीदारी आहे. रणजी ट्रॉफीचा विक्रम अजय शर्मा आणि मनिंदर सिंग यांच्या नावावर आहे. शर्मा आणि सिंग यांनी १९९१-९२ मध्ये रणजी उपांत्य फेरीत मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर बॉम्बेविरुद्ध २३३ धावांची भागीदारी करून हा पराक्रम केला होता. शर्माने नाबाद २५९ धावा केल्या होत्या. सिंगने या सामन्यात २३३ धावांच्या भागीदारीत ७८ धावा केल्या होता, जो सामना दिल्लीने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर जिंकला.

बडोद्यासमोर ६०६ धावांचे मोठे लक्ष्य –

सामन्याबद्दल बोलायचे मुंबई संघाने बडोद्याविरुद्ध दुसऱ्या डावात धावांचा डोंगर उभा केला. पहिल्या डावात मुशीर खानच्या द्विशतकाच्या जोरावर मुंबईने धावफलकावर ३८४ धावा लावल्या होत्या. दुसऱ्या डावात पृथ्वी शॉ (८७) आणि हार्दिक तामोर (११४) या फलंदाजांकडून चांगली खेळी पाहायला मिळाली. यानंतर संघ विस्कळीत होताना दिसत होता. पण शेवटी १०व्या आणि ११व्या क्रमांकावर असलेल्या तनुष कोटियन आणि तुषार देशपांडे यांनी विक्रमी भागीदारी केली. तुषारने १२४ धावांची तर तनुषने १२० धावांची शानदार खेळी खेळली. त्यामुळे संघाने धावफलकावर ५६९ धावा केल्या असून मुंबईकडे पहिल्या डावात ३६ धावांची आघाडी होती. त्यामुळे बडोद्यासमोर ६०६ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले.