India vs Australia, U19 World Cup Final : एकोणीस वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या (युवा विश्वचषक) अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर निर्धारित ५० षटकांमध्ये ७ बाद २५३ धावांचा डोंगर उभा केला आहे. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या संघाने फायनलमध्ये २५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. दक्षिण आफ्रिकेतील सहारा पार्क मैदानातील खेळपट्टी गोलंदाजीसाठी अनुकूल असल्यामुळे या मैदानावर २५३ ही खूप मोठी धावसंख्या मानली जात होती. त्यामुळे भारतासमोरच्या अडचणी वाढल्या. विश्वचषक उंचावण्यासाठी कर्णधार उदय सहारनच्या संघाला निर्धारित ५० षटकांमध्ये २५४ धावांची आवश्यकता होती. परंतु, भारतीय संघ निर्धारित ४३.५ षटकांत १७४ धावांपर्यंत मजल मारू शकला. परिणाणी भारतालाया सामन्यात ७९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. भारताच्या वरिष्ठ संघाप्रमाणेच युवा संघाचंदेखील विश्वविजेतेपदाचं स्वप्न भंगलं आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या भारतीय संघाला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने पराभवाची धूळ चारली होती. अशीच काहीशी अवस्था भारताच्या युवा संघाचीदेखील झाली आहे. यंदाच्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याने ऑस्ट्रेलिया भारताचा ७९ धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार ह्यू वैबगेन नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिला डावात फलंदाजी करताना कांगारुंच्या संघाने निर्धारित ५० षटकांमध्ये ७ बाद २५३ धावा करत भारतासमोर २५४ धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ सपशेल अपयशी ठरला. भारत निर्धारित ५० षटकंदेखील खेळू शकला नाही. भारतीय संघांला ४३.५ षटकांत १७४ धावांपर्यंत मजल मारता आहे. सलामीवीर आदर्श सिंह (४७) आणि खालच्या फळीत मुरुगन अभिषेक ४२ या दोघांनी थोडीफार झुंज दिली. परंतु, हे दोघे या सामन्यात भारताला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.