लॉकडाउनमुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेलाच झळ बसली आहे. अनेक क्षेत्रांवर याचा मोठा परिणाम झाला असून, सेवा क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी कामगार कपातही सुरू केली आहे. देशातील रिअल इस्टेट क्षेत्रालाही लॉकडाउनचा फटका बसला असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्ष देण्याची विनंती केली आहे. याविषयी शरद पवार यांनी पत्र पाठवलं आहे.

“रिअल इस्टेट सेक्टर पूर्ण बिघडण्याच्या स्थितीत आहे. जवळपास तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात कामगारांची कामे, रखडलेली कामे व विक्री यामुळे ग्राहकांची मागणी पूर्ण होत नाही. या आर्थिक घडामोडीमुळे कंबरडे मोडले असल्याने याचा परिणाम जीडीपीत जो मोठा वाटा उचलणाऱ्या क्षेत्रावर होत आहे,” असं शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

करोनाच्या साथीमुळे देशभरात लॉकडाऊनदरम्यान देशातील रिअल इस्टेट सेक्टरच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तीव्र चिंता व्यक्त केली. “कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (सीआरईडीएआय) देखील यासंदर्भात एक पत्र लिहिले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्वरित हस्तक्षेप करून रिअल इस्टेट क्षेत्राला मदत करावी,” अशी विनंती पवार यांनी केली आहे.

रिअर इस्टेट क्षेत्राला मदत करण्यासाठी आपल्याकडे वन टाइम पुनर्रचना, अतिरिक्त संस्थागत निधी, दंडात्मक व्याज माफी आणि जीएसटी लागू करण्याकरिता परवडणार्‍या पैशाचे निकष निर्माण करण्यासाठी धोरणात नवकल्पना आणावी यासारख्या काही शिफारसी केल्या पवार यांनी केल्या आहेत. अर्थव्यवस्थेच्या अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्राच्या पुनरुज्जीवनासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी पंतप्रधान निर्णय घेतील, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली आहे.