आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला ४०० पेक्षा जास्त जागा मिळाल्यास संविधानात बदल करण्यात येईल, असा वादा काँग्रेससह इंडिया आघाडीतील पक्षांकडून सातत्याने करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान मोदी यांनीही यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं असून हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. अशातच आताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – पंतप्रधान मोदींच्या मुस्लिमांबद्दलच्या ‘त्या’ विधानावर भाजपातील नेत्याचाच घरचा आहेर; …

काय म्हणाले अजित पवार?

“अजित पवार यांनी नुकताच एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. काँग्रेस पक्ष हा सोयीचं राजकारण करतो. काँग्रेसने नेहमीच बाबासाहेबांना विरोध केला. पहिल्या निवडणुकीत काँग्रेसनेच त्यांचा पराभवही केला होता. मुळात काँग्रेसने कधीही संविधान दिवस साजरा केला नाही. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी संविधान दिवस साजरा करण्याची सुरुवात केली”, असे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा – नरेंद्र मोदींच्या ‘अतृप्त आत्मा’ टीकेवर शरद पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “त्यांचे म…

“स्वत: काही करायचं नाही आणि दुसऱ्यांनी काही केलं, तर त्यांच्या विरोधात चुकीचा प्रचार करायचा, ही काँग्रेसची पद्धत आहे, अशी टीकाही अजित पवार यांनी यावेळी केली. तसेच आपल्या देशातील संविधान उत्तम आहे. ते संविधान कोणीही बदलू शकत नाही. हे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ४०० जागा जिंकल्यावर भाजपा संविधान बदलेल, हा आरोप चुकीचा आहे. यात कोणतेही तथ्य नाही”, असेही ते म्हणाले.