बेताल वक्तव्ये करणारे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि भाजपाच्या नेत्यांना भविष्यात या सगळ्याची नक्कीच किंमत मोजावी लागेल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले. पुण्यात शुक्रवारी झालेल्या एका कार्यक्रमात गिरीश बापट यांचा तोल पुन्हा ढासळला. ‘चल म्हटली की लगेच चालली’ असे वादग्रस्त वक्तव्य विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या उपस्थितीत केले होते. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, भाजपमधील अनेक नेते सध्या बेताला वक्तव्ये करत आहेत. यापैकी गिरीश बापट यांनी विद्यार्थ्यांसमोर केलेले विधान निषेधार्ह आहे. भविष्यात बापटांना नक्कीच याची किंमत मोजावी लागेल. जनता त्यांना जागा दाखवून देईल, असे अजित पवार यांनी म्हटले. आपण राज्य सरकारमधील एक महत्त्वाचे मंत्री आहोत, याची जाणीव बापट यांना असायला पाहिजे. त्यांनी अशा प्रकारची विधाने करता कामा नये, असा सल्लाही यावेळी अजित पवार यांनी दिला.

पुण्यातील एका शाळेत झालेल्या कार्यक्रमात गिरीश बापट म्हटले, स्वामी विवेकानंद जेव्हा परदेशात गेले होते तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे, भाषणामुळे एक युवती प्रभावित झाली . ती सतत त्यांच्या मागे-पुढे करत होती. अखेर ती विवेकानंदांना भेटली आणि लग्न करायचे आहे अशी इच्छा व्यक्त केली. आपण लग्न केले तर मला तुझ्यासारखा तेजस्वी मुलगा होईल असेही ती युवती स्वामी विवेकानंदांना म्हटली. हे सगळे सांगत असतानाच गिरीश बापट दोन क्षण थांबले आणि म्हटले की तो काळ आत्तासारखा नव्हता, चल म्हटले की चालली! विद्यार्थिनींना कळले बघा, ते शारीरिक आकर्षण नव्हते, अशा आशयाचे विधान बापट यांनी केले होते. यानंतर बापट यांना टीकेचा सामना करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात विविध ठिकाणी त्यांच्याविरोधात बॅनर लावून त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. ‘सैराट बापटांच्या शिकवणीसाठी हेडमास्तर हवा आहे, त्वरित संपर्क साधा, गिरीश बापट यांचे निवासस्थान’ असा मजकूर या बॅनर्सवर छापण्यात आला होता.