राज्यात २०१९ नंतर बरीच राजकीय उलथापालथ झाली आहे. २०२२ साली जून महिन्यात शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदेंसह काही आमदार बाहेर पडले आणि भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली. यानंतर २०२३ साली जून महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवारांसह काही आमदारांनी महायुतीला पाठिंबा दर्शवला. अशातच आता मंत्री गिरीश महाजन यांनी मोठं विधान केलं आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गिरीश महाजन म्हणाले, "कुठल्या पक्षात काय घडतं, हे आपल्याला कळेल. पण, निवडणुकीच्या आधी म्हणजे १५ ते २० दिवसांत मोठे राजकीय भूकंप झालेले पाहायला मिलतील." "शरद पवारांकडे पक्ष राहिलेला नाही" गिरीश महाजनांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे. "शरद पवारांनी एक-दोन जणांना निवडून आणून दाखवावं. शरद पवारांकडे पक्ष राहिलेला नाही. शरद पवारांनी भाजपाची काळजी करण्यापेक्षा त्यांच्या पक्षाची काळजी चिंता करावी," असा खोचक सल्ला महाजनांनी दिला आहे. हेही वाचा : “मी काय चुकीचं बोललो की हत्या करण्यापर्यंत पोहोचला, तुम्ही माझ्याशी…”, जितेंद्र आव्हाडांचं आव्हान "आव्हाडांना लाज वाटली पाहिजे" राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री रामाबद्दल केलेल्या वक्तव्याचाही गिरीश महाजनांनी समाचार घेतला आहे. "प्रभू श्री राम संपूर्ण देशाचे आदर्श आहेत. प्रभू श्री रामाच्या विरोधात बोललं की प्रसिद्धी मिळते हे आव्हाडांना माहितं आहे. म्हणून अशाप्रकारचं वक्तव्य करण्यात आलं आहे. अशी वक्तव्य करताना आव्हाडांना लाज वाटली पाहिजे. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी जितेंद्र आव्हाडांच्या विधानाबद्दल खुलासा करावा," असं आव्हान गिरीश महाजांनी दिलं आहे. हेही वाचा :रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोवर ईडीची छापेमारी, सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आम्हाला याचं…” "पंतप्रधानांनी स्वच्छता मोहीम हाती घेतलीय" आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर सक्तवसुली संचलनालयानं ( ईडी ) छापेमारी केली. यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. देशात दररोज कारवाया होत आहेत. तपास यंत्रणांचं धाडसत्र अचानक होत नाही. कागदपत्रांच्या तपासणीनंतर यंत्रणा धाडी टाकतात. काही केलं नसेल, तर घाबरण्याची गरज नाही."