Water Shortage in Maharashtra : राज्यात सध्या पाणी टंचाईचं सावट आहे. अनेक गावांत दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या गावांना टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. राज्यातील पाणीटंचाईकडे शिंदे सरकारचे लक्ष नाही. हे सरकार केवळ पक्ष फोडण्यात व्यस्त आहे, असे त्या म्हणाल्या. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

“डिसेंबर महिन्यापासून मी सातत्याने राज्यातील दुष्काळाची परिस्थिती, शेतकरी-शेतमजुरांच्या अडचणी तसेच अंगणवाडी सेविकांच्या अडचणींचा मुद्दा मांडत आहे. बारामतीचं उदाहरण द्यायचं झाल्यास, उजणी आणि नाजरा धरणात एक थेंब पाणी नाही. संपूर्ण राज्यात जेमतेम ३५ टक्के पाणी शिल्लक आहे. हे पाणी पुढचे अडीच महिने पुरेल की नाही हे सांगता येत नाही, अशी गंभीर परिस्थिती असताना राज्यातील ट्रिपल इंजिनचे खोके सरकार अतिशय असंवेदनशीलपणे वागत आहे. हे सरकार केवळ पक्ष फोडा, धमक्या द्या, यातच व्यस्त आहे. त्यांना दुष्काळावर उपाय करण्यासाठी वेळच नाही”, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

हेही वाचा – शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; रावेरमधून श्रीराम पाटील, तर सात…

सुधीर मुनंगटीवारांच्या विधानाचाही केला निषेध

दरम्यान, यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांच्या काँग्रेस संदर्भात केलेल्या विधानावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “पंतप्रधान मोदी हे देशाचे प्रतप्रधान आहेत, त्यामुळे नागरिक म्हणून मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या पक्षाचे नेते सुधीर मुनंगटीवार यांच्यावर कारवाई करायला हवी. मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमध्ये बोलताना अतिशय गलिच्छ असं विधान केलं आहे. खरं तर राजकारण होत राहील, पण महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे. हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. मी मुनगंटीवार यांच्या विधानाचा निषेध करते”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.