आपल्या उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर मालिका, चित्रपट व नाटकांमध्ये चतुरस्त्र भूमिका साकारणारे अभिनेते शरद पोंक्षे लवकरच ‘आक्रंदन’ या चित्रपटामध्ये दिसून येणार आहेत. या चित्रपटामध्ये ते खलनायकाच्या रुपात दिसणार असून त्यांचा दरारा या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे.’आक्रंदन’मध्ये मी राजाभाऊ ही व्यक्तीरेखा साकारली असून तो गावच्या सरपंचाचा लहान भाऊ आहे. लहान असल्यामुळे सहाजिकचं तो माजोरडा आहे. तसंच मोठ्या भावाच्या म्हणजेच सरपंचाच्या मार्गात कायम अडथळा निर्माण करण्याचं काम तो करतो. अनेक दृष्ट कृत्ये, अनैतिक धंदे, गावच्या स्त्रियांना त्रास देणे यामुळे गावात त्याची दहशत असते.

मी माझ्या स्टाइलने या भूमिकेत रंग भरले आहेत. ‘आक्रंदन’ या चित्रपटाच्या माध्यमातून निर्माता-दिग्दर्शकांनी अतिशय संवेदनशील विषय हाताळला आहे. जातीपातीचे राजकारण आजही आपल्याकडे सुरु आहे. आपल्याला त्याची दाहकता दिसून येत नाही. ही दाहकता दाखवतानाच एका मोठ्या बदलाची व पुढाकाराची गरज हा चित्रपट अधोरेखित करतो, असं शरद पोंक्षे म्हणाले.

या चित्रपटामध्ये शरद पोंक्षे यांच्यासह उपेंद्र लिमये, विक्रम गोखले, मिलिंद इनामदार, गणेश यादव, बाळ धुरी, तेजश्री प्रधान, अमिता खोपकर, प्रदीप वेलणकर, उदय टिकेकर, भारत गणेशपुरे, विलास उजवणे, पल्लवी वाघ, स्नेहा बिरांजे या कलाकारांच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत.
दरम्यान, शशिकांत देशपांडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर पटकथा- संवाद शशिकांत देशपांडे व मिलिंद इनामदार यांनी लिहिले आहेत. ‘आक्रंदन’ हा चित्रपट २९ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.