अतिरिक्त आयुक्तांचा दावा
उच्च न्यायालयाने कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवर कचरा टाकण्यास बंदी घातली आहे. मात्र याचिकादाराने डम्पिंग ग्राऊंडबाबत न्यायालयाला चुकीची माहिती दिल्याचा दावा अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत केला. कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबतचे नियम धाब्यावर बसविण्यात आले आहेत. यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे. परंतु मंडळ आपले काम चोख बजावत नाही. त्यामुळे या डम्पिंग ग्राऊंडवर कचरा टाकण्यास मनाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका ‘वनशक्ती’ आणि स्टॅलिन दयानंद यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली.