मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्याच्या कामादरम्यान भूस्खलन झाले असून पोकलेनचालक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकला आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), पोलीस, अग्निशमन दल आणि एमएमआरडीएने मदतकार्य हाती घेतले आहे. चालकाला ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेची महानगर आयुक्तांनी गंभीर दखल घेत या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यासाठी व्हिजेटीआयच्या संरचनात्मक अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा. अभय बांबोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या दुर्घटनेची अभय बांबोळे यांच्यामार्फत चौकशी केली जाणार असून यासंबंधीचा अहवाल आल्यानंतर एमएमआरडीएकडून पुढील कारवाई केली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई-विरार आणि मिरा-भाईंदर शहराला मुबलक पाणीपुरवठा करण्यासासाठी एमएमआरडीए एल अँड टी कंपनीच्या माध्यमातून दोन टप्प्यात सूर्या प्रकल्पाचे काम करीत आहे. यापैकी वसई-विरारचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. तर सध्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू आहे. त्यानुसार बुधवारी रात्री वसई खाडीजवळील सासूनवघर गावात वसई खाडी ओलांडण्यासाठी टनल बोअरिंग यंत्राच्या सहाय्याने भुयारीकरणाचे काम सुरू होते. या कामासाठी टनल बोअरिगं यंत्र जमिनीच्या भूभागात सुमारे ३२ मीटर खोलीवर पोहोचवण्यासाठी लाॅन्चिंग शाफ्टचे खोदकाम सुरू होते. ३२ मीटरपैकी २० मीटर काम पूर्ण झाले असताना रात्री ९ च्या सुमारास अचानक भूस्खलन झाले आणि पोक्लेन चालक या मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकला. या घटनेनंतर महानगर आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी यांच्या आदेशानुसार तातडीने एमएमआरडीएने मदतकार्य हाती घेतले. तसेच एनडीआरएफ आणि इतर यंत्रणांच्या मदतीने मदतकार्यास वेग देण्यात आला आहे. एनडीआरएफडीचे पथक पहाटे ५ वाजता घटनास्थळी दाखल झाले असून पोक्लेन चालकाला सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले.

हेही वाचा – बाप रे… बिहारच्या विद्यार्थ्याची नागपुरात आत्महत्या, खोलीतून कुजलेला वास आल्याने…

हेही वाचा – धक्कादायक..! बँकांची १४,५९५ कोटींनी फसवणूक, सर्वसामान्यांनी ठेवलेली रक्कम…

या दुर्घनटेची गंभीर दखल घेत डाॅ. मुखर्जी यांनी दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी प्रा. बांबोळे यांची नियुक्ती केली आहे. प्रा. बांबोळे यांनी घटनास्थळाला भेट दिली असून लवकरच त्यांचा अहवाल डाॅ. मुखर्जी यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. या अहवालाचा अभ्यास केल्यानंतर दोषींविरोधात कडक कारवाई केली जाईल, असे एमएमआरडीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या कामादरम्यान आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असून आवश्यक ती काळजीही घेण्यात येत असल्याचा दावा एमएमआरडीएने केला आहे. भविष्यात अशा दुर्घटना घडू नये यासाठी उपाययोजना वाढविण्यात येणार असल्याचेही एमएमआरडीएकडून स्पष्ट करण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surya project accident abhay bambole from vgti will conduct an inquiry mumbai print news ssb
Show comments