नागपूर : जागतिक तापमान वाढ दोन अंश सेल्सिअसपेक्षा कमी करण्यासाठी जगातील अनेक देश एकत्र आले आहेत. या समूहाला ‘अंडर टू कॉएलेशन’ असे नाव देण्यात आले आहे. जागतिक वातावरण बदल थांबवण्यासाठी हा समूह पॅरिस करारानुसार आराखडा तयार करत आहे. गेल्या काही दशकात वातावरण बदल व त्यामुळे येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने या समूहात सामील होत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्राला वातावरण बदल व त्याच्या परिणामांचा फार मोठा धोका आहे. गेल्या ५० वर्षांत राज्यात दुष्काळ पडण्याचे प्रमाण सात पटींनी, तसेच पूर येण्याचे प्रमाण पाच पटींनी वाढले आहे. राज्याच्या वातावरण बदल कृती धोरणात वातावरण बदल कमी करण्यासाठी विस्तृत योजनांचा समावेश करण्यात आला आहे. २०१५ मध्ये स्थापन झालेला ‘अंडर टू कॉएलेशन’ हा समूह वातावरण बदल थांबवण्यासाठी पॅरिस करारानुसार काम करणाऱ्या २३० सरकारांचे एक जागतिक कुटुंब बनले आहे. जम्मू व काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश, छत्तीसगड, तेलंगण व पश्चिाम बंगाल आणि महाराष्ट्र ही राज्ये या समूहात सहभागी झाली आहेत. वातावरण बदलाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र जलद पावले उचलण्यास नेहमी तत्पर असणारे राज्य आहे. हीच परंपरा जपत आम्ही ‘अंडर टू कॉएलेशन’ या समूहात सहभागी झालो आहोत. -आदित्य ठाकरे, पर्यावरण मंत्री. वातावरण बदल थांबवण्याच्या दृष्टीने हे दशक अतिशय महत्त्वाचे असणार आहे. महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठ्या राज्यांपैकी एक आहे. दक्षिण आशिया भागात वातावरण बदल थांबवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची ठरेल याबद्दल आम्हाला विश्वास आहे.-टीम अॅश व्हीए, संचालक, अंडर टू कॉएलेशन, क्लायमॅट ग्रुप सचिवालय.