लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जळगाव: राज्य शासनाच्या शासन आपल्या दारी या उपक्रमासाठी जनतेला फक्त मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकण्यासाठीच जमा केले जाते. प्रशासनातर्फे देण्यात येणारे विविध प्रकारचे दाखले लाभार्थ्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून वाटप केले जाते. मात्र, तळागाळातील खर्‍या लाभार्थ्यांना मदत करायची असेल, तर त्यांना या सुविधा घरपोच द्या, अशी मागणी माजी महसूलमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी करीत राज्य सरकारवर टिकास्त्र सोडले.

राज्यभरात काँग्रेसतर्फे जनसंवाद यात्रेस तीन सप्टेंबरपासून प्रारंभ झाला असून, यानिमित्ताने जळगाव जिल्ह्यात यात्रा दाखल झाली आहे. थोरात यांच्या नेतृत्वात जनसंवाद यात्रेचा समारोप रावेर तालुक्यातील फैजपूर येथे मंगळवारी झाला. त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांच्यासमवेत आमदार शिरीष चौधरी यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा… दुधात भेसळ केल्यास खबरदार… चाळीसगाव, एरंडोलमध्ये कारवाई

थोरात म्हणाले की, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेशासह भाजपकडून महाराष्ट्रात पैशांच्या जोरावर लोकशाही पद्धतीने चाललेले सरकार आणि व्यवस्था ही तोडून काढते आहे. चांगले सरकार मोडून सत्ता स्थापन करण्याची भाजपकडून रणनीती खेळली जात आहे. हेही आता जाणून आहे. यामुळे त्यांच्यात भाजपविषयी चीड निर्माण झाली आहे. आगामी होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये भाजपला जनताच त्यांची जागा दाखवून देईल आणि महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात येईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा… दरोड्यापूर्वीच पाच संशयित जाळ्यात; धरणगावातील गस्ती पथकाची कारवाई

थोरात यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरही भाष्य केले. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे- पाटील यांचे उपोषण आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारला आंदोलकर्त्यांशी संवाद साधायला वेळ नाही. त्यांच्याशी संवाद साधायला हवा. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. राजकारणाच्या पलीकडे जाऊन मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सोडविण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे. मराठा आक्षणाबाबत जो निर्णय हे सरकार घेईल, त्याला आमचा पाठिंबा राहील, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा… गणेश मंडळांना मंडप, कमान, व्यासपीठाचे शुल्क माफ; वाणिज्य जाहिरात प्रसिध्द केल्यास कर

राज्यघटना बदलण्याचा घाट घातला जात आहे, असे सांगत त्यांनी इंडिया आघाडीच्या नावाबाबत पंतप्रधानांवर टीकेचे बाण सोडले. समविचार पक्षांकडून आघाडीला इंडिया नाव ठेवले तर भाजप गडबडले आहे. दिवसेंदिवस वाढणार्‍या महागाईसह बेरोजगारी आणि शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवरही थोरात यांनी भाष्य करीत महागाई, बेरोजगारी आणि शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर पंतप्रधान बोलत नाहीत. लोकं उपाशी आहेत. शेतकरी हतबल झाले आहेत. तरीही ते बोलत नाहीत. फक्त दिखावा केला जातोय. भाजपकडून दडपशाहीचे राजकारण सुरू आहे. केंद्रात भांडवलधार्जिणे सरकार असल्याची टीका त्यांनी केली. थोरात यांचे अकलूद, फैजपूर, सावदा यांसह ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasaheb thorat criticised bjp state government shasan aplya dari scheme dvr