नाशिक – इगतपुरी तालुक्यातील काही गावांमध्ये तसेच आदिवासी पाडे पिण्याचे पाणी तसेच रस्त्याच्या सुविधेपासून वंचित असल्याने त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. याबाबत एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक जिल्ह्यातील काही गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव परिसरातील लचकेवाडी, डाेंगरवाडी, तोरणवाडी, गणेशनगर तसेच इगतपुरी तालुक्यातील खैरेवाडी रस्त्यापासून वंचित आहे. या गावांपर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. त्यामुळे ग्रामस्थांना कायम विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. पावसाळ्यात नदी, नाले, ओढ्यांना पाणी वाढल्यावर या वाड्यांपर्यंत पोहोचणे कठीण होते. रस्ता नसल्याने गाडी पोहोचत नसल्याने रुग्णांना झोळी करुन न्यावे लागते. रस्त्यांअभावी या पाड्यांचा विकास होत नाही. अधिकारी, कर्मचारी या वाड्या, पाड्यांकडे येण्यास तयार होत नाहीत. विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होते. कुरूंगवाडीजवळील मारूतीवाडी तर रस्ता, वीज, पाणी या सर्वांपासून वंचित आहे. या वाडीत अंगणवाडीही नाही. आवश्यक अशा कोणत्याच नागरी सुविधा मिळालेल्या नाहीत. जलजीवन योजनेतून आदिवासी वाडी, पाडे वगळण्यात आल्याचे एल्गार कष्टकरी संघटनेने म्हटले आहे.

हेही वाचा – नाशिक, दिंडोरीत महायुतीचा एकदिलाने प्रचार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा

या परिसरातील सर्व वाड्या, पाडे आतापर्यंत लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करत आले आहे. परंतु, या वाड्या, पाड्यांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात न आल्याने लोकसभा निवडणुकीवर ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला आहे. जोपर्यंत हक्काच्या नागरी सुविधा मिळत नाहीत, तोपर्यंत मतदान करणार नाही, असा इशारा एल्गार सामाजिक संघटनेच्या वतीने देण्यात आला असून त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले आहे.

पिण्याचे पाणी, रस्ते यासारख्या मूलभूत सुविधाही मिळत नसल्याने लोकसभा निवडणुकीवर इगतपुरी तालुक्यातील काही वाड्या, पाडे यांनी बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला असल्याचे एल्गार सामाजिक संघटनेने म्हटले आहे.

हेही वाचा – नाशिक : फेरीसाठी गर्दी जमविताना राजकीय मंडळींची दमछाक

मतदानावर बहिष्कार टाकणारी गावे

इगतपुरी तालुक्यातील कुरूंगवाडीजवळील मारूतीवाडी, खांबाळेजवळील शिंदवाडी, खैरेवाडी, त्र्यंबक तालुक्यातील लचकेवाडी, तोरंगवाडी, डोंगरवाडी, टाकेदेवगावजवळील गणेशनगर, बर्ड्यांची वाडी यांनी लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Some wadas padas in igatpuri have warned of boycott on voting ssb