आवक निम्म्यावर आल्याने किंमत ४०० ते १५०० रुपये डझन अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर कोकणातील हापूस आंब्याचे भाव वाढले आहेत. साधारणपणे अक्षय्यतृतीयेला मोठय़ा प्रमाणात आवक सुरू होते आणि हापूस आंब्याच्या किमती घटून तो सामान्यांच्या आवाक्यात येतो. दरवर्षी या मुहूर्तावर एक लाखापेक्षा जास्त पेटय़ा वाशीतील कृषी उत्पन्न बाजारात येतात. यंदा मात्र हापूस आंब्यांच्या अवघ्या ५५ हजार पेटय़ा सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमधून आल्या आहेत. कर्नाटक तामिळनाडूतून हापूसच्या १९ हजार पेटय़ा दाखल झाल्या आहेत. आंब्याचे दर ४०० ते १५०० रुपये प्रती डझन आहेत. किरकोळ बाजारात हे दर आणखी २०-३० टक्क्यांनी अधिक असतात. गेल्या १० वर्षांत इतकी कमी आवक पहिल्यांदाच झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. कोकणातील हापूस आंब्याला यंदा नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये झाडांना मोठय़ा प्रमाणात मोहर आला होता. त्यामुळे हापूस आंब्याची आवक यंदा चांगली होणार असे आडाखे बागायतदार व व्यापाऱ्यांनी बांधले होते. जानेवारीनंतर वातावरणात सातत्याने बदल झाले आणि मोहर मोठय़ा प्रमाणात गळून गेल्याने बागायतदारांचे हे अंदाज धुळीस मिळाले. गेल्या वर्षी अक्षय्यतृतीयेला कोकणातून वाशीतील घाऊक बाजारात हापूस आंब्यांच्या एक लाख २३ हजार ३५० पेटय़ा आल्या होत्या. ही आवक यंदा निम्म्यावर आली आहे. मंगळवारी ५५ हजार २६७ पेटय़ा आल्याची नोंद एपीएमसीच्या घाऊक फळ बाजारात झाली. गेल्या काही वर्षांपासून कर्नाटक हापूस आंबा मुंबईच्या बाजारात धुमाकूळ घालत आहे. कर्नाटक आणि तामिळनाडूच्या काही भागांतून १९ हजार ३५० क्रेट आंबे दाखल झाले आहेत. हा आंबा किलोवर विकला जातो तर कोकणातील हापूस आंबा डझनावर विकला जातो. आवक निम्म्यावर आल्याने दरवाढ झाली आहे. यापूर्वी अक्षय्यतृतीयेला हापूस आंब्याचे विधिवत पूजन करून ते मुंबईत पाठविले जात. एक आंबा नैवेद्य म्हणून देवापुढे ठेवून हापूस आंबा खाण्यास सुरुवात केली जात असे. सर्वसामान्य मुंबईकर एप्रिलपासून हापूस आंबे खाण्यास सुरुवात करीत असे. यंदा मात्र घाऊक बाजारातच एक डझन हापूस आंब्यांची किंमत ४००-१५०० रुपयांवर पोहोचली आहे. ही किंमत हापूस आंब्याचा आकार आणि गुणवत्ता यावर अवलंबून आहे. किरकोळ बाजारात हाच आंबा अधिक महाग आहे. दरवर्षी सर्वसाधारपणे अक्षय्यतृतीयेला दोनशे ते आठशे रुपये प्रती डझनने हापूस उपलब्ध होतो, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. यंदा किमतीनी १० वर्षांतील उच्चांक गाठल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. कमी उत्पादनामुळे यंदा हापूस आंब्याचे बागायतदार आणि व्यापारी या दोघांवरही आर्थिक संकट कोसळले आहे. अक्षय्यतृतीयेला हापूसची आवक आणि मागणी वाढते. यंदा चित्र उलटे आहे. हापूसची आवक निम्म्याने घटली आहे. किंमत दुप्पट झाली आहे. त्यामुळे यंदा हापूस आंबा सर्वसामान्यांच्या आवक्याबाहेरच राहणार असे स्पष्ट दिसते. गेल्या १० वर्षांतील सर्वात कमी आवक यंदा झाली आहे. - संजय पानसरे, माजी संचालक व आंबा व्यापारी