अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघात मुस्लीम मतदारांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असून, मुस्लिमांच्या मतपेढीसाठी काँग्रेस व वंचितमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. मुस्लीम मतांसाठी दोन्ही उमेदवारांची जोरदार कसरत सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जातीय व मतविभाजनाचे समीकरण नेहमीच प्रभावी ठरणाऱ्या अकोला मतदारसंघात सुमारे १७ ते १८ टक्के मुस्लीम मतदार आहेत. काँग्रेसचे के. एम. अझहर हुसेन यांनी अकोल्यातून लोकसभेत प्रतिनिधित्व केले होते. मुस्लिमांची गठ्ठा मतदार संख्या लक्षात घेता काँग्रेसने गेल्या साडेतीन दशकांत १९८९, २०१४ व २०१९ मध्ये अल्पसंख्याक उमेदवार उभे केले होते. मात्र, तिन्ही वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यामध्ये अनुक्रमे २६.०४, २५.८९ व २२.७१ टक्के मते मिळाली. गेल्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसने मुस्लीम उमेदवार देऊन प्रकाश आंबेडकरांना पाडण्याची खेळी खेळल्याचा आरोप वंचितने १० वर्षांत सातत्याने केला. काँग्रेसने यावेळेस रणनीतीमध्ये फेरबदल करून मराठा उमेदवार रिंगणात उतरवला. अकोल्यात परंपरेनुसार तिरंगी सामना असून भाजपचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील व ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यात तुल्यबळ लढत होत आहे.

निवडणुकीच्या रिंगणात दोन प्रमुख पक्षांचे उमेदवार मराठा समाजाचे असल्याने हिंदू मतांचे ध्रुवीकरण निश्चित मानले जाते. याला लाभ व फटका कुणाला यावरून ठोकताळे बांधण्यात येत आहेत. दलित, ओबीसी, माळी, धनगर, आदिवासी, बंजारा आदी बहुसंख्य मतांची मतपेढी कुणाकडे वळते? हे देखील निर्णायक ठरू शकेल. काँग्रेस व वंचितच्या दृष्टीने मुस्लिमांची मते केंद्रस्थानी आहेत. गेल्या दोन निवडणुकांमध्ये मुस्लीम उमेदवारामुळे ही गठ्ठा मते काँग्रेसकडे वळली होती. आता काँग्रेसने मराठा समाजातून उमेदवार दिल्यामुळे मुस्लीम मतांचा कल कुणाकडे यावरून तर्कवितर्क लावले जात आहेत. मुस्लीम मतपेढी कायम ठेऊन इतर मते मिळवण्याचे काँग्रेसचे अतोनात प्रयत्न आहेत, तर मुस्लिमांची गठ्ठा मते मिळविण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी देखील प्रतिष्ठा पणाला लावली. त्यासाठी वंचितने डॉ. अभय पाटील यांच्या संघ परिवाराच्या पार्श्वभूमीच्या मुद्द्यावर देखील बोट ठेवले.

हेही वाचा – कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदींना म्हटले ‘नालायक’; ‘चंबू’वरुन राजकारण का तापलंय?

भाजपची बी-टीम असल्याचा आरोप-प्रत्यारोप काँग्रेस व वंचितकडून परस्परांवर केला जातो. वंचितने राज्यात चार मुस्लीम उमेदवार दिले, शिवाय काँग्रेसने मुस्लीम उमेदवार दिले नसल्याची टीका वंचितने केली. मुस्लिमांच्या मतांसाठी काँग्रेस व वंचित एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचे दिसून येते. मुस्लीम बहुल परिसरातील प्रचारावर अधिक लक्ष दिले जात आहे. मुस्लिमांमध्ये अंतर्गत छुपा प्रचारसुद्धा सुरू आहे. दोन्ही बाजूने डावपेच आखण्यात आले. मुस्लिमांचे मतविभाजन होणार असून कुणाकडे किती टक्के मते वळतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. या पार्श्वभूमीवर भाजपसुद्धा सतर्क झाला. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे.

हेही वाचा – उत्तर प्रदेशचा तुकडा पडणार? मायावतींचे पश्चिम उत्तर प्रदेशाचे आश्वासन

‘एआयएमआयएम’च्या भूमिकेमुळे किती बदल?

‘एआयएमआयएम’ पक्षाने अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा दिला. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘एआयएमआयएम’च्या उमेदवारापुढे वंचितने मुस्लीम उमेदवार दिल्याने हा मुद्दा चर्चेत आहेत. विधानसभेत बाळापूरमध्ये ‘एआयएमआयएम’च्या उमेदवाराला ४४ हजार ५०७ मते पडली होती. आता त्यांच्या भूमिकेमुळे अकोल्यातील समीकरणात किती बदल होणार, यावरून वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress and vanchit eye on the votes of muslims in akola print politics news ssb