आगामी लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी असताना काँग्रेस नेत्यांची भाजपात जाण्याची मालिका सुरूच आहे. महाराष्ट्र आणि झारखंड येथील काँग्रेस नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर आता गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुजरातमधील पाच वेळा लोकसभेचे सदस्य राहिलेले आणि सध्या राज्यसभेचे सदस्य असलेले नारन राठवा आणि त्यांचे पूत्र संग्रामसिंग राठवा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला आहे.

राठवा पितापुत्रांबरोबरच अहमदाबादचे काँग्रेस नेते धर्मेंद्र पटेल यांनीही काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला आहे. महत्त्वाचे म्हणजे वरील नेत्यांव्यतिरीक्त गेल्या दोन महिन्यात काँग्रेसच्या तीन आमदारांनीही पक्षातून बाहेर पडत भाजपाला जवळ केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत गुजरात काँग्रेससमोर मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – भाजपाच्या विरोधात आम आदमी पार्टीचे चार उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात; कोण आहेत सोमनाथ भारती?

गुजरात काँग्रेसचा आदिवासी चेहरा अशी ओळख असलेले राठवा हे यूपीएस सरकारमध्ये केंद्रीय मंत्री राहिले आहेत. त्यांना दिवंगत अहमद पटेल यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जाते. त्यांचे पक्षातून बाहेर पडणे हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. याचा फटका काँग्रेसला छोटा उदयपूर जिल्ह्यात बसण्याची शक्यता आहे.

यासंदर्भात बोलताना राठवा पिता-पुत्र या दोघांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. तसेच त्यांनी पक्ष नेतृत्वावर अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत. ”काँग्रेसच्या नेत्यांकडे नेतृत्व क्षमता नाही, त्यांच्याकडे निर्णयक्षमतेचाही अभाव आहे, त्यामुळे आम्ही पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे”, असे ते म्हणाले.

नारन राठवा यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जनता दलातून केली होती. त्यांनी १९८९ मध्ये जनता दलाच्या तिकिटावर पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा विजयही झाला. मात्र, त्यानंतर दोन वर्षांनी त्यांनी जनता दलातून बाहेर पडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पुन्हा ते लोकसभेवर निवडून आले. यूपीएच्या पहिल्या कार्यकाळात ते रेल्वे राज्यमंत्रीदेखील होते. मात्र, त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. रामसिंग रावठा यांनी त्यांचा पराभव केला. या पराभवानंतर काँग्रेसने त्यांच्याकडे संघटनेची जबाबदारी दिली. तसेच २०१८ मध्ये त्यांना राज्यसभेवर पाठवले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांत भाजपाला छोटा उदयपूर जिल्ह्यात उमेदवार निवडताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, आता राठवा यांच्या भाजपा प्रवेशामुळे भाजपाला या भागात उमेदवार निवडणे सोपे जाणार आहे. तसेच भाजपाला या भागात आपला प्रभाव वाढवण्यासही मदत होणार आहे. दुसरीकडे काँग्रेसकडे माजी विरोधी पक्षनेते सुखराम राठवा यांच्या रुपाने एक नेते आहेत. मात्र, या भागात त्यांचा म्हणावा तसा प्रभाव नाही.

हेही वाचा – राज्यसभा निवडणूक २०२४ : कर्नाटकमध्ये भाजपाच्या दोन आमदारांच्या मदतीमुळे काँग्रेसचा विजय? क्रॉस व्होटिंग करणारे आमदार आहेत तरी कोण?

दरम्यान, मागील काही दिवसांपासून नारन राठवा हे त्यांचे पूत्र संग्रामसिंग राठवा यांना भाजपाकडून लोकसभेचे तिकीट मिळावे, यासाठी भाजपाशी बोलणी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. संग्रामसिंग यांनी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत छोटा उदपूरमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता.

मंगळवारी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर नारन राठवा म्हणाले, “नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या राजकारणाने मी प्रभावित झालो आहे. केंद्र सरकारने छोटा उदयपूर जिल्ह्याच्या विकासासाठी दिलेल्या निधीबद्दल मी त्यांचे आभार मानतो.” तर संग्रामसिंग यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना काँग्रेसवर टीका केली आहे. ”२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही काँग्रेसने आपल्या कार्यपद्धतीत कोणताही बदल केला नाही. त्यांच्या नेतृत्वाकडे निर्णय घेण्याची क्षमता नाही. राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रेत व्यस्त आहेत. मात्र, त्यांच्या पक्षात न्याय राहिलेला नाही. काँग्रेस पक्षात तरुणांना संधीही दिली जात नाही”, असे ते म्हणाले. तसेच काँग्रेस सोडण्याचा निर्णय जड अंत:करणातून घेतल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली.