१६ मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या प्रचारास सुरुवात केली. भारताचे पंतप्रधानपद तिसऱ्यांदा मिळावे यासाठी नरेंद्र मोदी प्रयत्न करताना दिसत आहेत. ‘अब की बार चारसो पार’ अशी घोषणा देत आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवतानाच विरोधकांचे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यापासून नेमक्या कोणत्या विषयांवर बोलत आहेत, याबाबत ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने विश्लेषण केले आहे. काँग्रेस आणि गांधी घराण्यावर टीका, विकास, विश्वगुरू आणि २०४७ पर्यंत भारत विकसित करण्याचे वचन या विषयांवर पंतप्रधान मोदींनी वारंवार भाष्य केले असल्याचे दिसून आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

५ एप्रिल रोजी काँग्रेसने ‘न्यायपत्र’ या नावाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यावर टीका करताना हा मुस्लीम लीगची आठवण करून देणारा हा जाहीरनामा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले होते. तसेच या जाहीरनाम्याकडे ‘हिंदू-मुस्लीम’ दृष्टिकोनातून पाहत त्यांनी टीकाही केली. ते म्हणाले की, या जाहीरनाम्यामध्ये संपत्तीच्या फेरवाटपाची संकल्पना मांडलेली आहे. काँग्रेस पक्ष सत्तेवर आला, तर तो हिंदूंची संपत्ती ताब्यात घेईल आणि त्यातील अर्धी संपत्ती ‘घुसखोर’ आणि ‘अधिक मुले असलेल्यांना’ वाटून टाकेल. तसेच आरक्षणामध्ये मुस्लिमांनाही समाविष्ट करून मागासवर्गीय आणि ओबीसींचा हक्क हिरावून घेतला जाईल, असा दावाही मोदींनी केला.

हेही वाचा : ‘एवढ्या’ दागिन्यांची सरकारच करतंय चोरी; पंतप्रधानांचा कुणावर आरोप?

narendramodi.in या संकेतस्थळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे मजकूर उपलब्ध आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १७ मार्च ते १५ मेपर्यंत केलेल्या १११ भाषणांचे विश्लेषण ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने केले आहे. तिसऱ्यांदा सत्ता प्राप्त करण्यासाठी नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा सूर कशा प्रकारे बदलत गेला आहे, याचा खुलासा या विश्लेषणामधून होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या ४५ भाषणांमध्ये रोजगार या मुद्द्याचा उल्लेख केला आहे. मात्र, बहुतांश वेळेला हा उल्लेख सरकारी प्रकल्प आणि योजनांद्वारे निर्माण झालेल्या नोकऱ्यांच्या संदर्भात होता. नव्याने किती रोजगारनिर्मिती होईल, याविषयी त्यांनी भाष्य केलेले नाही. त्यांच्या पाच भाषणांमध्ये महागाईवर भाष्य होते. त्यांनी केंद्रीय योजनांच्या माध्यमातून महागाई नियंत्रणात ठेवली जात असल्याचे या भाषणांमधून म्हटले आहे.

१७ मार्च ते ५ एप्रिल (१० भाषणे)

केंद्र सरकारच्या योजना आणि विरोधकांचा भ्रष्टाचार या मुद्द्यांवर अधिक भर

१६ मार्चला आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून ते ५ एप्रिलला काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध होईपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणांमधील प्रमुख विषय हा केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना आणि भाजपा सरकार विकासासाठी करीत असलेले प्रयत्न हा होता. त्यांनी या काळात केलेल्या दहाही भाषणांत हाच सूर दिसून आला. त्यातील १० पैकी आठ भाषणांमध्ये त्यांनी भारताचे जगातील स्थान हे ‘विश्वगुरू’ होण्याच्या मार्गावर असल्याचे भाष्य ठळकपणे केले आहे. त्यांनी या १० भाषणांमध्ये विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. मात्र, हा हल्ला घराणेशाही, भ्रष्टाचार व गैरकारभार या मुद्द्यांपुरता मर्यादित होता.

याच भाषणांमध्ये त्यांनी वारंवार ‘चारसो पार’ची घोषणा दिली. अनेक भाषणांची सुरुवातच ‘अब की बार, चारसो पार’ या घोषणांनी करण्यात आली. या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला ४०० हून अधिक जागा मिळतील, असा आत्मविश्वास व्यक्त करणारी ही घोषणा आहे. १० पैकी आठ भाषणांमध्ये त्यांनी हा आत्मविश्वास व्यक्त केला. या निवडणुकीमध्ये राम मंदिर हा महत्त्वाचा मुद्दा ठरेल, असे बोलले जात होते. त्यांनी १० पैकी सहा भाषणांमध्ये राम मंदिराची उभारणी हे भाजपा सरकारचे मोठे यश असल्याचा उल्लेख केला आहे.

हिंदू-मुस्लीम आणि काँग्रेसवर टीका! पंतप्रधान मोदी कोणत्या मुद्द्यावर कितीदा बोलले? १११ भाषणांचे विश्लेषण

६ एप्रिल ते २० एप्रिल (३४ भाषणे)

काँग्रेसचा जाहीरनामा हा ‘मुस्लीम लीगचा जाहीरनामा’ असल्याची टीका

५ एप्रिल रोजी काँग्रेसचा जाहीरनामा प्रकाशित झाला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी राजस्थानमधील अजमेरमध्ये पंतप्रधान मोदींनी या जाहीरनाम्यावर टीका करीत म्हटले की, या जाहीरनाम्यावर मुस्लीम लीगची छाप आहे. त्यांनी ६ एप्रिल ते २० एप्रिलदरम्यान केलेल्या ३४ पैकी सात भाषणांमध्ये काँग्रेसचे ‘न्यायपत्र’ हे ‘मुस्लीम लीगचा जाहीरनामा’ असल्याची टीका केली.

त्यांनी अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाच्या सोहळ्यावर बहिष्कार टाकल्याचा उल्लेख करत देशातील विरोधक ‘हिंदूविरोधी’ मानसिकतेचे असल्याची टीकाही अनेकदा केली. आपल्या ३४ पैकी १७ भाषणांमध्ये हा उल्लेख दिसून आला. या सर्व भाषणांमध्ये त्यांनी २६ वेळेला रामाचा आणि राम मंदिराचा उल्लेख केला होता. त्यांनी या भाषणांमध्ये काँग्रेसवर भरपूर टीकाही केली होती. घराणेशाही आणि भ्रष्टाचार हे त्यातील प्रमुख मुद्दे होते. त्यांनी आपल्या भाषणांमध्ये २७ वेळेला काँग्रेसचा उल्लेख केला. या काळात केलेल्या भाषणांमध्ये विकास (३२ वेळा उल्लेख), कल्याणकारी योजना (३१ वेळा उल्लेख) व ‘विश्वगुरू’ (१९ वेळा उल्लेख) हे मुद्देही प्रमुख होते. मात्र, या काळात त्यांनी ‘चारसो पार’चा नारा देणे हळूहळू बंद केले. त्यांनी ३४ पैकी निव्वळ १३ भाषणांमध्ये ही घोषणा दिली आणि हळूहळू ही घोषणा देणे कमी करीत नेले.

२१ एप्रिल ते १५ मे (६७ भाषणे)

संपत्तीचे फेरवाटप आणि धर्मावर आधारित आरक्षणाचा मुद्दा

नरेंद्र मोदींनी २१ एप्रिल ते १५ मे या दरम्यानच्या काळात ६७ भाषणे केली. त्यापैकी ६० भाषणांमध्ये त्यांनी कल्याणकारी योजना आणि विकासाच्या मुद्द्यावर भाष्य केले. त्यांनी राम आणि अयोध्येतील राम मंदिराचा उल्लेख ४३ वेळा केला. ‘चारशेपार’चे लक्ष्य निश्चित करणारी घोषणा या काळातही फारशी दिसून आली नाही. त्यांनी ६७ भाषणांमध्ये फक्त १६ वेळा या संदर्भात तोकडे उल्लेख केले.

२१ एप्रिल रोजी राजस्थानमधील बांसवाडा येथे बोलताना नरेंद्र मोदींनी मुस्लिमांना उद्देशून ‘घुसखोर’ हा शब्द पहिल्यांदा वापरला. संपत्तीच्या फेरवाटपासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, काँग्रेस सत्तेवर आला, तर तुमची संपत्ती ताब्यात घेऊन, त्यातील अर्धी संपत्ती घुसखोरांना वाटून टाकेल. त्यांनी केलेल्या एकूण १११ भाषणांमध्ये १२ वेळा घुसखोर या शब्दाचा उल्लेख केला आहे. त्यांनी अनेक भाषणांमध्ये मंगळसूत्र हे हिंदू महिलांचे स्त्रीधन असल्याचा उल्लेख केला आहे. मात्र, हे मंगळसूत्र काढून घेतले जाईल, अशाच आशयाचा हा उल्लेख होता. त्यांनी पहिल्यांदा बांसवाडातील भाषणामध्येच मंगळसूत्र हिरावून घेतले जाण्याचा उल्लेख केला होता. त्यांनी एकूण ६७ भाषणांमध्ये २३ वेळेला हे वक्तव्य केले आहे.

हेही वाचा : लोकसभा निवडणुकीत किती मुस्लीम उमेदवारांना राष्ट्रीय पक्षांनी दिली उमेदवारी?

२१ एप्रिल ते १५ मे या काळात म्हणजेच दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर ते पाचव्या टप्प्यातील मतदानाच्या थोडेसे आधीपर्यंत केलेल्या एकूण ६७ भाषणांमध्ये ६० वेळेला त्यांनी ‘हिंदू-मुस्लीम’ मुद्द्यावर भाष्य केले आहे. काँग्रेस पक्ष सत्तेवर आला, तर तो मुस्लीम व्होट बँकेचे राजकारण करण्यासाठी संपत्तीचे फेरवाटप करील किंवा मागासवर्गीय आणि ओबीसींच्या वाट्यामध्येच मुस्लिमांना आरक्षण देईल, अशी भीती पसरवणारी ही वक्तव्ये आहेत. त्यांनी केलेल्या ६३ पैकी ५७ भाषणांमध्ये, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या सरकारांनी केलेला गैरकारभार आणि भ्रष्टाचार यांवर टीका होती.

महिला, तरुण, शेतकरी व गरिबांचा उल्लेख किती वेळा?

गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींनी एका भाषणामध्ये असे म्हटले होते की, त्यांच्या दृष्टीने महिला, तरुण, शेतकरी व गरीब या चारच जाती अस्तित्वात असून, तेच भारताचा विकास करतील. मोदींनी १११ पैकी ८४ भाषणांमध्ये गरीब या मुद्द्यावर भाष्य केले आहे. आपल्या १० वर्षांच्या सत्ताकाळात २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी सरकारने प्रयत्न केले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी शेतकऱ्यांचा उल्लेख ६९ भाषणांमध्ये, तर तरुणांचा उल्लेख ५६ भाषणांमध्ये केला आहे. त्यांनी आपल्या ८१ भाषणांमध्ये महिलांचा उल्लेख केला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi campaign speeches analysis lok sabha election 2024 vsh