वर्धा : जातीय ध्रुवीकरणाची किनार असलेल्या वर्धा मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत असली तरी तेली विरुद्ध कुणबी हा पारंपरिक सामना पुन्हा रंगला आहे. एकेकाळी काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला आणि गांधी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्धा मतदारसंघात यंदा काँग्रेसचा उमेदवारच रिंगणात नाही. भाजपच्या उमेदवारावर झालेल्या कौटुंबिक आरोपांमुळे ही निवडणूक गाजली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्धा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमर काळे यांच्यात लढत होत आहे. खासदारकीची हॅटट्रिक पूर्ण करण्यासाठी रिंगणात उतरलेले भाजपचे रामदास तडस यांना प्रथमच नेतेपूत्राने कडवे आव्हान उभे केले आहे. वर्धा मतदारसंघात प्रामुख्याने तेली विरुद्ध कुणबी समाज अशी पारंपरिक लढत होते. तेली समाजातील तडस यांनी २०१४ मध्ये दत्ता मेघे यांचे पूत्र सागर मेघे, २०१९ मध्ये प्रभाराव यांच्या कन्या चारूलता टोकस या कुणबी समाजातील उमेदवारांचा पराभव केला होता. आता २०२४ मध्ये माजी मंत्री डॉ. शरद काळे यांचे पूत्र अमर काळे लढत होत आहे.

हेही वाचा – पक्ष बदलला की जुन्या नेत्यांना शिव्या देणं चुकीचं: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची टीका

यावेळेस उमेदवारी मिळणार की नाही, अशा शंकेत राहलेल्या तडस यांना जातीय पाया तारून गेला. तेली समाजातील राज्यातील एकमेव उमेदवारी म्हणून भाजपच्या पहिल्याच यादीत तडसांची उमेदवारी जाहीर झाली. अर्धी लढाई जिंकल्याचे समाधान तडस समर्थकांमध्ये उमटले होते. कारण विरोधात लढणार कोण ही बाब अंधारातच होती. काँग्रेसमध्ये लढण्यासाठी फारसे कोणी उत्सुक नव्हते. महाविकास आघाडीतील जागावाटपात ही जागा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या वाट्याला आली. पवार गटाने जिल्ह्यातील नेत्यांना डावलून काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना पसंती दिली. आदल्या दिवशी पक्षात प्रवेश आणि दुसऱ्या दिवशी काळे यांची उमेदवारी जाहीर झाली. जमिनीवर पाय असलेला, अफाट जनसंपर्काचा राजकीय मल्ल म्हणून परिचित रामदास तडस तर राजकीय शत्रू नसलेला, संपर्कात पक्का, सहज वावरणारा नेता म्हणून ओळख दिल्या जाणारे अमर काळे ही टक्कर सुरुवातीपासून चर्चेला वेग देणारी ठरली. आव्हान असल्याचे मान्य करत भाजपचे नेते कामाला लागले. तर मुळ काँग्रेसीच असणाऱ्या काळेंना पक्षाची उमेदवारी म्हणून राष्ट्रवादीची पण साथ लाभली.

भाजपने गेले वर्षभरापासून निवडणुकीची तयारी सुरू केली होती. उमेदवार कोणीही असो कमळाला मतदान होईल, अशी बांधणी तयार आहे. त्या तुलनेत अमर काळे यांच्या राष्ट्रवादी तसेच मित्रपक्षांकडे संघटना बांधणी शून्यवत असल्याचे चित्र आहे. या टप्प्यात मोदी हवे की नको, असे निवडणुकीचे ध्रुवीकरण करण्यावर भाजपने भर दिला. विविध पक्ष व संघटनांची मोट बांधून इंडिया आघाडी काळेंच्या मदतीला आहे. मोदी नको या एकाच पैलूवर हे एकत्र आले आहे. त्यामुळे व्यवस्थापन कुशल भाजप व भावनीक हिंदोळ्यावरील काँग्रेस आघाडी अशी लढत जय-पराजयाचे स्पष्ट संकेत देत नाही. या थेट दुहेरी लढतीत मतांचे विभाजन जातीय पैलूवर होण्याचे स्पष्ट संकेत पण दिसतात. लोकसभा क्षेत्रातील सहापैकी चार विधानसभा क्षेत्रात भाजपचे तर प्रत्येकी एक काँग्रेस व अपक्ष आमदार आहे.

हेही वाचा – केरळमध्ये तिरंगी लढतीचा फायदा भाजपलाच ५ पेक्षा जास्त जागा मिळतील! पक्षाचे प्रभारी प्रकाश जावडेकर यांचा विश्वास

प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात तडस यांच्या सूनेने केलेल्या आरोपांमुळे तडस यांना बचवात्मक भूमिका घ्यावी लागली. शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे या तडस यांच्या सूनेबरोबर पत्रकार परिषदेत उपस्थित होत्या. यातून तडस कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आले. मात्र, यातून तडस यांच्यावर खुलासे करण्याची वेळ आली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wardha lok sabha who will benefit from communal equations print politics news ssb