पिंपरी : मागील चार वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जात असलेल्या पिंपरी-चिंचवडकरांना आणखी वर्षभर दररोज पाणीपुरवठ्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. सन २०२५ पर्यंत दिवसाआड पाणीपुरवठा कायम राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. दरम्यान, उन्हाळा सुरू झाल्याने अपुरे, कमी दाबाने पाणीपुरवठ्याच्या तक्रारींमध्ये वाढ होऊ लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढल्याने समान पाणीपुरवठ्याचे कारण देत महापालिका प्रशासनाने २५ नोव्हेंबर २०१९ पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. काही दिवसांसाठी सुरु केलेला असा पाणीपुरवठा चार वर्षे झाले, तरी कायम आहे. शहराचा लोकसंख्यावाढीचा वेग आणि भविष्यातील सन २०४५ पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन महापालिका आंद्रा व भामा आसखेड धरणातून २६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी आणणार आहे. त्या पाण्यावरील प्रक्रियेसाठी महापालिकेच्या वतीने चिखलीत आठ हेक्टर परिसरात जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. आंद्रा धरणातून निघोजे येथील बंधाऱ्यातून पाणी उचलून समाविष्ट भागातील नागरिकांना देण्यात येत आहे. परंतु, वाढत्या लोकसंख्येला पाणी कमी पडत असून, तक्रारींमध्ये वाढ होत आहे.

हेही वाचा – ‘महाराष्ट्रात अजित पवार पर्व सुरू’, शरद पवारांवर सुनील तटकरेंचा पलटवार

भामा-आसखेड धरणातून पाणी आणण्यासाठीच्या जलवाहिनीचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), वन, जलसंपदा विभागाच्या जागेतून होत आहे. त्यामुळे भूसंपादनास अडचणी येत आहेत. त्यातून मार्ग काढून कामाला गती दिली आहे. दर महिन्याला या कामाचा आढावा घेतला जात आहे. सन २०२५ पर्यंत काम पूर्ण होईल. तोपर्यंत पाणीपुरवठा एकदिवसाआडच सुरू राहणार आहे. वाढीव पाणी मिळाल्यानंतर दररोज पाणीपुरवठा करणे शक्य होणार असल्याचे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

दिवसाला ५९५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा

शहरवासीयांना पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. महापालिका दिवसाला पवनातून ५१०, चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रातून ७० आणि औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) १५ असे ५९५ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी उचलते.

हेही वाचा – “…ते पाप पृथ्वीराज चव्हाणांचे”, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचा गंभीर आरोप

दूषित पाणीपुरवठा

उन्हाळा सुरू होताच पाणीपुरवठ्याच्या तक्रारींमध्ये वाढ सुरू झाली आहे. शहराच्या विविध भागांतून कमी दाबाने, अपुरा, अनियमित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. तसेच आठवडाभरापासून वाकड रस्त्यावरील एकता कॉलनी, गणेश कॉलनी, मंगलनगर या भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.

चिखलीला नदीतील पाणी कमी झाल्यामुळे तक्रारी वाढल्या आहेत. दोन दिवसांत त्या कमी केल्या जातील. पवना धरणात ५८ टक्के पाणीसाठा असून, जूनअखेरपर्यंत पुरेल. त्यामुळे पाण्याची चिंता नाही, असे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता श्रीकांत सवणे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water problem for pimpri chinchwad people what administration says pune print news ggy 03 ssb