‘२०२४च्या निवडणुकीत तुम्हा सर्वांच्या सहकार्याने विश्वगुरूंच्या नेतृत्वात पक्षाला अपार यश मिळाले. विकासाच्या घोडदौडीत गेली पाच वर्षे कशी निघून गेली ते कळलेच नाही. पाच वर्षांपूर्वी आपल्या नागपूरच्या लाडक्या भाऊंनी १४ ते २४चा काळ फक्त ट्रेलर होता व आता पिक्चर सुरू झाला असे भाष्य केले होते. त्यामुळे आता या पाच वर्षातला पिक्चर कसा होता हे आता भाऊंच्याच तोंडून आपण ऐकणार आहोत.’ हे निवेदन संपल्यावर भाऊंनी ‘या ठिकाणी’ म्हणत सुरुवात करताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. त्याने उत्साहित होऊन ते बोलू लागले…
‘गेल्या पाच वर्षात देश चकचकीत व्हायला सुरुवात झाली. जुने डांबरी रस्ते उखडून सिमेंटचे रस्ते देशभर बांधले गेले. तरीही देशाच्या काही आदिवासी पाड्यांना रस्ता वापराची सवय नसल्याने ते कधी पायी चालतात तर कधी रुग्णांना खाटेवर बांधून आणतात. त्यांना हे रस्ते वापरण्याची सवय लावणे हे आपले पुढचे ध्येय असेल. २०१४ पूर्वी या देशात ना पुरेशी रेल्वेस्थानके होती, ना विमानतळ. जी होती ती मोडकळीस आलेली. तेव्हा लोक शिदोरी घेऊन पायी प्रवास करायचे. आता शेकडो स्थानके व तळांची उभारणी झाल्याने लोक विमान नाही तर वंदेभारतमधून वातानुकूलित प्रवास करतात. ही सवय साऱ्या देशाला लागल्याने रेल्वेचे सर्वसाधारण डबे मोडीत काढावे लागले. या काळात रोजगार निर्मितीत इतकी वाढ झाली की लोक दिवसा एक व रात्री दुसरी नोकरी करू लागले. गेल्या पाच वर्षात प्रत्येकाला घरकुल व त्यात शौचालय मिळाले. तरीही काही लोक सवयीचा भाग म्हणून उघड्यावर झोपतात. झोपडी सोडत नाहीत.