ठाणे येथील तुळशीधाम भागातील नळपाडा परिसरात सोमवारी दुपारी संजय चौहान या तरुणाने चुलतीवर आणि तिच्या पाच महिन्याच्या बाळावर चाकूने वार केल्याची घटना घडली. या घटनेत बालकाचा जागीच मृत्यू झाला तर त्याची आई गंभीर जखमी झाली. जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली असून याप्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी हल्लेखोर तरुणासह त्याच्या आईला अटक केली आहे.
तुळशीधाम भागातील नळपाडा परिसरात संगीता चौहान राहत असून शेजारीच त्यांची मोठी भावजय प्यारीदेवी चौहान राहते. संगीता यांना चार मुलींनंतर मुलगा झाला. तो पाच महिन्यांचा होता आणि त्याचे नाव हरिओम होते. या मुलामुळे प्यारीदेवीच्या मनात राग होता. तसेच संगीता आणि प्यारीदेवी यांच्यात उत्तर प्रदेशातील जमिनीवरून वाद सुरू होते. असे असतानाच संगीता यांच्या घराच्या माळ्यावर असलेली पार्टिशन भिंत तोडण्याचे काम प्यारीदेवी आणि तिचा मुलगा संजय करीत होता. त्याचा जाब विचारल्यामुळे संतापलेल्या संजय याने संगीता आणि तिचा मुलगा हरिओम या दोघांवर चाकूने वार केले. त्यात हरिओमचा मृत्यू झाला तर संगीता गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.